KCR-Bhagirath Bhalke Sarkarnama
विशेष

KCR On Bhagirath Bhalke : भगीरथ भालकेंसाठी खास विमान का पाठविले होते?; केसीआर यांनी सांगितले कारण…

सरकारनामा ब्यूरो

Solapur : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरमधील नेते भगीरथ भालके यांच्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी खास विमान पाठविले होते. त्याबाबत भारत राष्ट्र समितीचे प्रमुख राव यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, भगीरथ भालके हे आमच्या पक्षात येत आहेत, म्हटल्यावर आम्ही विमान पाठविले होते, त्यात कोणती मोठी गोष्ट आहे. (Why was a plane sent for Bhagirath Bhalkae?; KCR told reason…)

बीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव (KCR) यांनी भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना हैदराबादला येण्यासाठी विमान पाठविले होते. त्याची राज्यात मोठी चर्चा झाली होती. विशेष म्हणजे भगीरथ यांचे पिताश्री (स्व.) भारत भालके (Bharat Bhalke) यांच्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही विमान पाठविले होते, त्यामुळे त्याची सोलापूर जिल्ह्यात चर्चा रंगली होती. त्याबाबत राव यांना विचारण्यात आले होते.

ते म्हणाले की, भगीरथ भालके यांच्यासाठी पाठविलेले विमान हे आमच्या पक्षाचे स्वतःचे विमान आहे. पक्षात लोक येत आहेत, म्हटल्यावर त्यांच्यासाठी आम्ही विमान पाठविले, त्या काय मोठी गोष्ट आहे. राजकीय पक्षाच्या लोकांनी खासगी विमानाने फिरलं नाही पाहिजे का? आजही मी पक्षाच्या खासगी विमानानेच आलो आहे. त्यात कोणती नवी गोष्ट आहे. परदेशात तर शेतकऱ्यांकडेही विमान आहे, तीच परिस्थिती आम्हाला भारतात आणायची आहे.

देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात आहेत, त्यातही तेलंगणा बॉर्डरजवळील यवतमाळ जिल्ह्यात त्याचे प्रमाण मोठे आहे. ते पाहून आम्ही महाराष्ट्रापासून कामाला सुरुवात केली आहे. आमच्या पक्षाचा नाराच हा आहे की अबकी बार, किसान सरकार. त्यामुळे आम्ही त्या प्रश्नावर काम करणार आहोत, असेही त्यांनी महाराष्ट्रात पक्षाच्या कामाबाबत सांगितले.

आमच्याकडेही महाराष्ट्रापेक्षा जास्त आत्महत्या होत होत्या. मात्र, आम्ही त्यावर उपाय योजना केल्या, त्यामुळे आमच्याकडील आत्महत्या थांबल्या आहेत. तेलंगणामधील लोक पूर्वी मुंबई आणि भारतभर कामासाठी जात होते. मात्र, आमचे संपूर्ण लोक आज परत तेलंगणात आले आहेत. याशिवाय देशातील १४ राज्यातील लोक आमच्याकडे कामासाठी येतात. महाराष्ट्रात जर बीआरएस पक्षाचे सरकार आले, तर महाराष्ट्र आणि विदर्भात तेलंगणासाखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे राव यांनी स्पष्ट केली.

महाराष्ट्रात बीआरएस निवडणूक लढविण्यामुळे महाविकास आघाडीच्या धर्मनिरपेक्ष मतांमध्ये विभागाणी होणार नाही का. या प्रश्नावर चंद्रशेखर राव म्हणाले की, आमच्यामुळे कोणावर परिणाम होणार आहे आणि कोणावर होणार नाही, याच्याशी आम्हाला काही देणघेणं नाही. जनतेच्या फायद्याचे काम आम्ही करत राहणार आहोत, असेही के. चंद्रशेखर राव यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT