Sharad Pawar and Uddhav Thackeray
Sharad Pawar and Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीत मतभेदाची ठिणगी; पवार - ठाकरेंमध्ये बिनसल्याची चर्चा!

सरकारनामा ब्यूरो

Political News : गेल्या काही दिवसांपासून रिफायनरी प्रकल्पावरुन सुरू असलेला वाद चिघळला आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तर काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आता राज्यातील राजकारण देखील तापलं आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आता बारसू रिफायनगरी प्रकल्पावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी परस्परविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीच्या फुटीची चर्चा सुरू झाली आहे.

"बारसू प्रकल्प करताना लोकांना विश्वासात घेऊन रिफायनरी आंदोलकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत", असा सल्ला शरद पवार यांनी सरकारला दिला. मात्र, ठाकरे गटाने बारसू प्रकल्पाला तीव्र विरोध केला. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चाही जोरात सुरू आहेत. तर काही दिवसांपूर्वी अजित पवार हे मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

त्यातच आता बारसू प्रकल्पावरून पवार आणि ठाकरे यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर आलेत. त्यामुळे बारसू प्रकल्पावरून पवार आणि ठाकरेंमध्ये बिनसले तर नाही ना? तसेच त्यांच्या प्रकल्पाबाबतच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या फुटीचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

बारसू प्रकल्पाबाबत पवारांची भूमिका काय?

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बारसू प्रकल्पाबाबत शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी आपली भूमिका मांडली होती. पवार म्हणाले होते, "बारसू रिफायनरी प्रकल्प घाईत करू नका. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांबरोबर चर्चा करा. त्यांना विश्वासात घेऊनच पुढचा निर्णय घ्या", असं म्हणाले होते.

बारसू प्रकल्पाबाबत ठाकरेंची भूमिका काय?

बारसू प्रकल्पाबाबत भूमिका मांडताना खासदार संजय राऊत म्हणाले होते, "शरद पवार यांची देखील पत्रकार परिषद मी ऐकलेली आहे. ते म्हणाले आहेत की, स्थानिकांना विश्वासात घ्या. त्यांच्याशी चर्चा करा. उद्धव ठाकरे यांनी देखील आमची भूमिका स्पष्ट केली आहे. ठाकरे यांनी दिल्लीचा आग्रह असल्याने बारसूच्या जागेचा पर्याय सूचवला होता. पण जर स्थानिकांची इच्छा नसेल तर याठिकाणी देखील प्रकल्प नको हीच आमची भूमिका आहे", असं राऊत म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटाने बारसू प्रकल्पाबाबत भूमिका मांडताना तीव्र विरोध दर्शवला. तर बारसू प्रकल्पाबाबत शरद पवारांनी मात्र, मवाळ भूमिका घेतली असल्याचे दिसून आले. तर पवार यांच्या भूमिकेवर बोलताना चर्चा करायची म्हणजे नेमके काय? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला. त्यामुळे पवार आणि ठाकरे गट यांच्यातील मतभेद समोर आल्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडणार का?, अशा चर्चा रंगल्या आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT