<div class="paragraphs"><p>BJP</p></div>

BJP

 

Sarkarnama

विश्लेषण

महापालिकेतील पराभव भाजपच्या जिव्हारी; राज्य कार्यकारिणीत मोठे बदल, अनेकांना डच्चू

सरकारनामा ब्युरो

कोलकता : कोलकता महापालिकेच्या (Kolkata Municipal Corporation) निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसने (TMC) 144 पैकी 134 जागा जिंकत भाजपसह (B JP) काँग्रेस (Congress) आणि डाव्यांची (Left Parties) दाणादाण उडवली आहे. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. यामुळे भाजपने राज्य कार्यकारिणीत मोठे फेरबदल केले असून, अनेक बड्या नेत्यांना डच्चू दिला आहे.

भाजपने तडकाफडकी पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. पक्षाने नवीन राज्य कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यात अनेक बड्या नेत्यांना वगळण्यात आले आहे. याचवेळी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सुकांत मुजुमदार यांनी सप्टेंबर महिन्यात स्वीकारल्यानंतर फेरबदल होणे अपेक्षित होते. मात्र, महापालिका निवडणुकीमुळे ते लांबणीवर पडले होते. अखेर महापालिका निवडुकीतील दारुण पराभवानंतर याला मुहूर्त मिळाला आहे. पाच राज्य सरचिटणीसांपैकी खासदार लॉकेट चटर्जी आणि ज्योतिर्मय महातो या दोघांचे पद कायम राहिले आहे. अग्निमित्रा पॉल, दीपक बर्मन आणि जगन्नाथ चट्टोपाध्याय यांची आता सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे.

अग्निमित्रा पॉल यांच्या जागी तनुजा चक्रवर्ती यांची भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पक्षाचा लोकप्रिय चेहरा असलेले जयप्रकाश मुजुमजदार यांना उपाध्यपदावरून डच्चू देण्यात आला आहे. ते आता केवळ प्रवक्ते असतील. अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी अली होसेन यांच्या जागी चार्ल्स नंदी यांनी निवड झाली आहे. खासदार सौमित्र खान यांच्याकडून राज्य भाजयुमोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांना आता राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले आहे. नव्या समित्यांमध्ये 12 राज्य चिटणीस आणि 11 उपाध्यक्ष आहेत.

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने बाजी मारली आहे. विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवली. त्यानंतर आठ महिन्यांनी झालेल्या कोलकता महापालिका निवडणुकीतही ममतांनी विरोधकांना धक्का दिला. कोलकता महापालिकेच्या 144 जागांसाठी 19 डिसेंबरला मतदान झाले होते. तृणमुलने 144 पैकी 134 जागा जिंकल्या असून मागील निवडणुकीपेक्षा दहा जागा अधिक मिळवल्या आहेत. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत टीएमसीला 124 जागा मिळाल्या होत्या तर, भाजपच्या पदरात केवळ पाच जागा पडल्या होत्या. तसेच डाव्यांनाही पाचच जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजप व डाव्यांना मागील आकडाही टिकवता आला नाही. भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या असून डावे पक्ष व काँग्रेसला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. इतरांनी तीन जागा मिळाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT