Maratha influence and Maharashtra Politics :  Sarkarnama
विश्लेषण

Maratha influence and Maharashtra Politics : मराठी माणसाचा मुद्दा अजितदादांनी उचलला; राज ठाकरेंवर मात करणार?

अय्यूब कादरी

Maharashtra Politics : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी माणसाला हीन वागणूक मिळण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठी माणसाच्या मुद्द्यावर झाली होती. कालांतराने भाजपच्या नादी लागून शिवसेनेचा मराठी माणूस हा मुद्दा काहीसा बाजूला पडला आणि हिंदुत्ववाद हा मुख्य मुद्दा बनला.

राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि त्यांनी मराठी माणसाचा मुद्दा हाती घेतला. त्यांनीही सातत्याने धरसोड वृत्ती दाखवली. दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील गुजराती सोसायटीत एका मराठी महिलेला मुंबईत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. शिवसेना, मनसेने या प्रकाराचा निषेध केलाच आहे, त्यात या वेळी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेतली आहे. याद्वारे राज ठाकरे यांच्यावर मात करून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसह राज्यभरात आपला पाया मजबूत करण्याची तयारी अजित पवार यांनी सुरू केली आहे.

एका मराठी माणसाने मुलुंडमधील एका गुजराती सोसायटीत कार्यालयासाठी जागा पाहिली होती. सोसायटीने मराठी माणसाला जागा देण्यास नकार दिला. एवढेच नव्हे, तर मराठी माणसाला आमच्या सोसायटीत परवानगी नाही, असे सांगत महिलेला दमदाटी केली. या मराठी महिलेने समाजमाध्यमांत व्हिडिओ व्हायरल करून आपली व्यथा मांडली. त्यानंतर मनसेने संबंधित सोसायटीच्या व्यवस्थापनाला हिसका दाखवल्यानंतर त्यांनी माफी मागितली.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही या प्रकाराचा निषेध केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनपेक्षितपणे यात उडी घेतली. राज्यात कोठेही मराठी माणसाचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली. अशा प्रकारांची गंभीर दखल घेण्यात येईल. छत्रपती शिवरायांच्या भूमीत असे प्रकार होत असतील तर ती लाजिरवाणी बाब आहे, असे सांगत त्यांनी संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मुस्लिम आरक्षणाबाबतही वक्तव्य केले होते. याद्वारे त्यांनी आपल्या पक्षाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. शिवसेनेने मराठी माणसाचा मुद्दा सौम्य करून हिंदुत्ववादाचा स्वीकार केला. राज ठाकरेंच्या मनसेने काही वर्षे मराठी माणसाचा मुद्दा जोरात लावून धरला होता. मध्यंतरी त्यांच्या धरसोड वृत्तीचे म्हणजे कधी मोदी, भाजपवर टीका करायची, कधी त्यांचे समर्थन करायचे, असे प्रकार पाहायला मिळाले. मध्येच त्यांनीही आपण प्रखर हिंदुत्ववादी असल्याची वक्तव्ये केली होती.

महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी मशिदींवरील भोंग्यांचा हा मुद्दा लावून धरला होता. ते सरकार कोसळून महायुतीचे सरकार आल्यानंतर राज ठाकरे शांत झाले. अशा प्रकारांमुळे राज ठाकरे यांची विश्वासार्हता संपुष्टात येऊ लागली आहे. मराठी माणसाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. राज ठाकरे फक्त स्वतःची सोय पाहतात का, अशी चर्चा होत असते.

शिवसेना आणि मनसेने ट्रॅक बदलल्यामुळे मुंबईत मराठी माणसाच्या हक्कांबद्दल आवाज उठवणाऱ्यांची पोकळी निर्माण झाली आहे. अचूक वेळ साधत अजित पवार यांनी ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. केवळ मुंबईच नव्हे तर राज्यात कुठेही मराठी माणसाचा अपमान सहन करणार नाही, हे अजित पवार यांचे वक्तव्य सूचक आहे, ते शिवसेना, मनसेच्या मराठी माणसाच्या व्याप्तीच्या पलीकडचे आहे. राज्यभरातील मराठी माणसाच्या अस्मितेला कुरवाळून अजित पवार हे सतत भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरे यांना मात देण्याच्या प्रयत्नात आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर आपण काहीसे बाजूला फेकले गेल्याची भावना मुस्लिम समाजात निर्माण झाली आहे. मुस्लिम समाजाला देण्यात आलेल्या ५ टक्के आरक्षणाचे पुढे काय झाले, याबाबत महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेल्या शिदे-फडणवीस सरकारने ब्र ही काढला नव्हता. शिवाय शिवसेनेत फूट पडून उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यापासून मुस्लिम समाजात त्यांच्याबाबत प्रचंड सहानुभूती आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांनाही मोठी सहानुभूती मिळत आहे. अर्थातच, कसलेले राजकारणी असलेल्या अजित पवार यांना याची नक्कीच जाणीव आहे. त्यामुळेच त्यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उचलला आहे. फोडाफोडी आणि सत्ताकारणात गुंतलेल्या शिंदे-फडणवीस यांचे या समाजाकडे मराठी माणसाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, हे अजित पवार जाणतात. काकांपासून ते दूर झाले असले तरी राजकारण कसे करावे याचे धडे त्यांनी त्यांच्यापासून घेतलेले आहेत.

२०२४ मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे १४५ आमदार निव़डून येतील आणि ते मुख्यमंत्री होतील, असे अमोल मिटकरी नुकतेच म्हणाले आहेत. काहीशा अतिशयोक्तीमुळे लोकांनी त्यांचे वक्तव्य नेहमीप्रमाणे गांभीर्याने घेतले नसेल, मात्र अजित पवारांच्या हालचाली त्याच उद्देशाने सुरू असल्याचे लक्षात येईल. राज ठाकरेच नव्हे, तर शिंदे-फडणवीसांवरही अजित पवार मात करू शकतात का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

घरे मुस्लिमांनाही मिळत नाहीत...

एखादे संकट दुसऱ्याच्या दारी आहे, ते आपल्या दारी नाही म्हणत त्याकडे दुर्लक्ष करण्याची समाजाची वृत्ती आहे. संकट आपल्या दारी आले की त्याची भीषणता कळायला लागते. अनेक शहरांत मुस्लिम समाजातील नागरिकांना घरे मिळत नाहीत. धर्मावरून हा मुद्दा आता आहारावर आला आहे. आहारावर आला की त्याची झळ केवळ मुस्लिमांनाच नव्हे, सर्वांनाच बसू लागली आहे. वेळीच हे प्रकार रोखण्याची गरज आहे. राजकीय नेत्यांनी मतांचे राजकारण बाजूला ठेवून असे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत; अन्यथा ज्यांच्यासाठी म्हणून ते राजकारण करत आहेत, त्यांच्यावरही आता असे प्रसंग उद्भवू लागले आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT