Dhananjay Munde
Dhananjay Munde Sarkarnama
विश्लेषण

Assembly Session : ...अन्‌ मुख्यमंत्री शिंदे धावतच विधानसभेत पोचले!

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आज विधानसभेत २९३ चा ठराव मांडत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही सभागृहात उपस्थित नव्हते. त्याला विरोधी पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी आक्षेप घेतला. मंत्री लॉबीत बसले असून या सरकारला जनतेच्या प्रश्नाचे गांभीर्य नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. याबाबत जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले यांनीही नाराजी व्यक्त केली. तेवढ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात दाखल झाले आणि २९३ ठराव विरोधी पक्षनेत्यांनी पुन्हा मांडायला सुरुवात केली. (...And Chief Minister Shinde rushed to the Legislative Assembly!)

धनंजय मुंडे म्हणाले की, दोन्ही सभागृहाची प्रथा, परंपरा आहे. विरोधी पक्षनेते २९३ चा ठराव मांडताना मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहायला पाहिजे. मुख्यमंत्री नसतील तर उपमुख्यमंत्र्यांनी हजर राहिले पाहिजे. मागच्या काळात उपमुख्यमंत्री नव्हते, फक्त मुख्यमंत्रीच होते. त्यावेळी सभागृहाचे नेते वरच्या सभागृहात थांबायचे. पण, आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही सभागृहात उपस्थित नाहीत. अशी जर प्रथा परंपरा सुरू झाली तर कसं व्हायचं.

सभागृहात सध्या फक्त सहकार मंत्रीच आहेत. हे अतिशय चुकीचे आहे. अशा पद्धतीने विराधी पक्षनेत्यांसह विरोधी बाकावरील सदस्यांचा सन्मान डावलला जात असेल तर या सदनात विरोधी पक्षांनी का बोलायचे? सरकार काही करणार नाही. सगळे मंत्री लॉबीत बसले असून सरकारला राज्यातील परिस्थितीचे आणि सभागृहाचे काहीही गांभीर्य नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही याबाबतचे गांभीर्य नाही, अशी टीका मुंडे यांनी केली.

नगरपालिका, महानगरपालिकेचा प्रस्ताव आहे. विरोधी पक्ष या महानगरांमधील जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडत आहे. सरकार जर हे गांभीर्याने घेत नसेल तर अध्यक्षांनी सरकारला निर्देश द्यावेत. सभागृहाचे डेकोरम ठेवले पाहिजे. या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आल्याशिवाय पुढचे प्रस्ताव स्थगित करावेत, अशी मागणीही मुंडे यांनी केली.

ही प्रथा नाही : नाना पटोले

नाना पटोले म्हणाले की, ही प्रथा परंपरा नाही. शहरी आणि ग्रामीण भागातील प्रश्नासंदर्भातील विरोधी पक्षाचा ठराव आहे. पण सरकार त्यासंदर्भात गंभीर नाही. तेवढ्यात मुख्यमंत्री धावतच सभागृहात आले. (या वेळी दोन्ही बाजूकडून गोंधळ झाला.)

पहिलं बाकडं कायम मोकळं असतं : अजित पवार

अजित पवार म्हणाले की, अधिवेशन सुरू झाल्यापासून सरकारला गांभीर्य नाही. भोंगळ कारभार सुरू आहे. कुणीही गंभीर नाही. पहिलं बाकडं कायम मोकळं असतं. आम्हीही सरकार चालवलं आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

कसं वागायचं ते तुम्हीच ठरवा : जयंत पाटील

विरोधी पक्ष बोलत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उपस्थित राहण्याचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे. ते येईपर्यंत आम्ही बोलत नाही. कसं वागायचं ते तुम्ही ठरवा, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडले

मागचे मुख्यमंत्री कधी सभागृहात यायचे : भातखळकर

मुख्यमंत्र्यांनी खेद व्यक्त करावा, अशी मागणी जयंत पाटील करत आहेत. मात्र, मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री सभागृहात कधी असायचे. ते मंत्रालयत नव्हते, तसेच सभागृहात नव्हते. हेही त्यांनी लक्षात असू द्यावे, असा टोला अतुल भातखळकर यांनी विरोधी पक्षाला लगावला.

मी सकाळी नऊपासून मी सभागृहात असायचो : पवार

भातखळकर यांच्या आरोपा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, भातखळकर नीट आठवा. गरज असायची, तेव्हा मुख्यमंत्री असायचे. ते नसतील तेव्हा हा अजित पवार सकाळी नऊपासून सभागृहात बसून असायचे. तुमच्या प्रत्येकाला सकारत्मक प्रतिसाद द्यायचो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT