Atul Save Sarkarnama
विश्लेषण

Atul Save Beed : बीडमधील शेतकरी दुष्काळात होरपळला; पण पालकमंत्री अतुल सावेंना घाम फुटेना !

Beed Guardian Minister : पालकमंत्री असूनही सावेंनी तीन महिन्यांपासून बीडच्या भूमिवर पाय ठेवला नाही

Sunil Balasaheb Dhumal

Beed Political News : पावसाने ओढ दिल्याचा सर्वात मोठा फटका मराठवाड्याला बसतो. मराठवाड्यातील बीड जिल्ह्याला दुष्काळाच्या झळांना वारंवार सामोरे जावे लागले आहेत. अशा वेळी पालकमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावून, लोकांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा असते. दरम्यान, तीन महिन्यांपासून दुष्कळाच्या झळात बीड होरपळत असताना पालकमंत्री अतुल सावे यांना घाम फुटत नसल्याची टीका होऊ लागली आहे. बीडचे पालकमंत्री बदलाची चर्चा असली तरी सध्या पद आपल्याकडे आहे, याची जाण ठेवून सावेंनी काम करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (Latest Political News)

पावसाने पाठ फिरवल्याने बीड (Beed) जिल्ह्यातील खरीप पिके करपली असून शेतकरी होरपळून निघाला आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. या परिस्थितीतही पालकमंत्र्यांना आपल्या कर्तव्याची जाण आणि शेतकऱ्यांबाबत जराही संवेदना असल्याचे दिसून येत नसल्याचे बोलले जाते. पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचे सरकार आणि पालकही. सावे यांनी मात्र तीन महिन्यांपासूनच बीडच्या भूमिवर पाय ठेवलाच नाही. यामुळे बीडला कुणी पालक आहे की नाही, असा प्रश्नच उपस्थित केला जाऊ लागला आहे.

बीडला अतुल सावे यांच्यापूर्वीही जिल्ह्याबाहेरचे पालकमंत्री लाभले होते. दिवंगत दिग्विजय खानविलकर, विक्रमसिंह पाटणकर, बबनराव पाचपुते आदींनी बीडचे पालकमंत्रिपद सांभाळलेले आहे. अतुल सावेंची १३ महिन्यांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाली आहे. त्यांनी मात्र जिल्ह्यातील लोककल्याणासाठी ठोस असे निर्णय घेतल्याचे दिसून आले नाही. पालकमंत्री सावे यांच्या बीडच्या धोरणांवरून वर्षभरापासून जिल्ह्याला सरकार आहे का, असाच प्रश्न उपस्थित करून टीका होऊ लागली आहे. (Maharashtra Political News)

गेल्या वर्षी जिल्ह्यावर पावसाने अवकृपा केली होती. त्यानंतर सततचा पाऊस व अतिवृष्टीने हाहाकार उडाला होता. त्यावेळीही (Atul Save) अतुल सावेंनी 'फॉर्मेलिटी' म्हणून छत्रपती संभाजीनगरहून जवळ असलेल्या गेवराईच्या हद्दीत येऊन पाहणीचा फार्स केला होता. जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असून येथे दररोज एक शेतकरी मरणाला जवळ करत आहे. यावर पुढाकार घेऊन आजपर्यंत सावेंनी कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. उलट त्यांच्या अखत्यारित असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपातील ‘नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या’ तक्रारी भाजप आमदार आणि नेत्यांनी थेट उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीसांकडे केल्या आहेत. मात्र, त्यालाही सावेंनी जुमानले नाही.

दरम्यान, आता जिल्ह्यात पावसाची ओढ, पेरणीसाठी खत-बियाण्यांची उपलब्धता आहे का, याचा त्यांनी आढावा घेतलेला नाही. खरिपातील सोयाबीन, कपाशी, तूर, बाजरी, मका, उडीद, मूग आदी पिके वाया गेली आहेत. तलावांतील उपयुक्त पाणीसाठा केवळ १२ टक्क्यांवर आला आहे. बीडमध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असताना जिल्ह्यातील स्थिती जाणून घेण्यास पालक म्हणून सावे तयार नाहीत. त्यांनी उपाययोजनांचा कुठलाही आढावा घेतलेला नाही.

सत्तेत राष्ट्रवादीचा अजित पवार गट सहभागी झाल्यामुळे सावेंकडून या पदाची जबाबदारी काढून घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच जिल्हा नियोजन समितीची बैठकही लांबल्याची चर्चा आहे. मात्र, सध्या तरी आपल्याकडे कागदोपत्री का होईना पद असल्याची जाण ठेवून अतुल सावेंनी अधिकार वापरून लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT