Bharat Jodo Nyay Yatra. Sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे भारत जोडो 2.0 कोणाला देणार खरा न्याय?

सरकारनामा ब्युरो

सचिन देशपांडे

काँग्रेसचे पॉलिटिकल पंडीत भारत जोडो न्याय यात्रा ही राजकीय नसल्याचा दावा करत आहेत. असे असले तरी ही संपूर्ण यात्रा देशाच्या ज्या भागातून जाणार आहे, त्या ठिकाणी थेट भाजपाच्या खासदाराला धक्का देण्याच्या तयारीतून निघत आहे. भारत जोडो न्याय यात्रा ही आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळण्यासाठी असल्याचा दावा केला जात आहे.

ही यात्रा राजकीय नाहीच, असा काँग्रेसचा ठाम दावा आहे. त्यामुळे यायात्रेतून ‘व्होटर’ काँग्रेसच्या पारड्यात किती मतांचे दान टाकतातअर्थात न्याय देतात हे पाहण्यासारखे ठरेल. भारत जोडो न्याय यात्रेनंतर संबंधित मतदार संघांवर लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि निवडणुकीनंतर देखील यात्रेचा कसा, काय आणि किती परिणाम झाला, हे पाहण्यासारखे राहणार आहे.

राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय असलेली ही यात्रा ज्या मार्गांनी जाणार आहे, त्या त्या मार्गाचे ‘पॉलिटिकल मॅपिंग’ आता पुढील काळात निश्चित होईल. लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना काँग्रेसची मणिपूर ते मुंबई ही न्याय यात्रा मणिपुरातील थौबलपासून निघाली. राहुल गांधी यांनी ध्वजारोहण करीत यात्रेची सुरुवात केली.

काँग्रेसचा दावा आहे की, ही भारत जोडो न्याय यात्रा राजकीय नाही. पण, काँग्रेसच्या या यात्रेचा एकूण ‘रोडमॅप’ पाहिल्यावर ही राजकीयच यात्राच असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कन्याकुमारी ते श्रीनगर या पहिल्या भारत जोडो यात्रेच्या तुलनेत ही भारत जोडो न्याय यात्रा निम्म्या दिवसात प्रवास करणार आहे. या यात्रेत बसमधून राहूल गांधी यांचा प्रवास असेल. ‘न्याय का हक, मिलने तक’ अशी घोषणा या यात्रेतून दिली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘हिंदी बेल्ट’मध्ये ही यात्रा धमाकुळ घालेल काय, याची चिंता भाजपामध्ये व्यक्त केली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसने यात्रेतून सोयीस्करपणे त्यांच्या मित्र पक्षांच्या लोकसभा मतदार संघांना वगळत यात्रेचा मार्ग निश्चित केला आहे. काँग्रेसची ही यात्रा 15 राज्यातील जवळपास 100 लोकसभा मतदार संघातून जाणार असून विविध राज्यातील 330 विधानसभा मतदार संघ ‘कव्हर’ करेल. 110 जिल्ह्यातून जाणारी ही काँग्रेसची न्याय यात्रा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘गेम चेंजर’ ठरते काय, हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल.

उत्तर प्रदेशच का टार्गेट?

अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिर उद्घाटन सोहळा होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याचा सर्वाधिक ‘इम्पॅक्ट’ उत्तर प्रदेशात होईल. या उद्घाटन सोहळ्यानंतर काँग्रेसची न्याय यात्रा उत्तर प्रदेशात येणार आहे हे विशेष. लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशातून ही यात्रा जाणार आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. त्यापैकी 28 लोकसभा जागांवरुन ही यात्रा जाईल. यात्रेचा दौरा निश्चित करताना समाजवादी पार्टीच्या लोकसभा मतदार संघांना बायपास करत ही यात्रा भाजपाच्या मतदार संघातून जाणार आहे.

अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी, त्याच बरोबर स्मृती इराणी यांच्या अमेठी आणि सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदार संघात देखील यात्रा जाईल. लोकांच्या मनातील गोष्टी जाणून घेण्यासाठी ही यात्रा असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. असे असताना पश्चिम बंगाल मधील दहा लोकसभा मतदार संघातून यात्रेचा मार्ग असेल. यात्रेचा लोकसभेच्या 13 एससी आणि 17 एसटी मतदार संघातून दौरा निश्चित केला गेला आहे. संपूर्ण यात्रा मोठ्या प्रमाणात काँग्रेसने ‘टार्गेट’ केलेल्या 100 लोकसभा मतदार संघात स्वतःच्या न्यायासाठी जाणार हे मात्र नक्की.

महाराष्ट्रातील ‘ते’ नऊ मतदारसंघ

भारत जोडो न्याय यात्रेतून महाराष्ट्रातील थेट भाजपाबरोबरच्या शिंदे गटाला टार्गेट करण्यात आले आहे. यात्रा जात असलेल्या 10 लोकसभा मतदार संघापैकी 9 मतदार संघ हे भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. याच मतदार संघातून ही यात्रा नेण्यामागे विचारपूर्वक व्यूहरचना आखण्यात आली आहे. काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा शेवटची सभा देशाची आर्थिक राजधानी मुंबईत होईल. तब्बल 66 ते 68 दिवसांच्या प्रवासातून ही यात्रा मुंबईत पोहोचेल. यात्रेत महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदार संघात काँग्रेस वातावरणनिर्मिती करेल. 10 पैकी 6 मतदार संघात भाजपाचे खासदार आहे. या 10 मतदार संघापैकी केवळ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या एका आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या तीन खासदारांच्या मतदार संघातून ही यात्रा जाणार आहे.

भाजपच्या नंदूरबार येथील खासदार डॉ. हिना गावित, दिंडोरीतील भाजप खासदार डॉ. भारती पवार, धुळ्याच्या भाजपा खासदार सुभाष भामरे, नाशिकचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे, भिंवडीचे भाजपा खासदार कपिल पाटील, कल्याणचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, मुंबई उत्तर मध्य भाजपाच्या खासदार पूनम महाजन, मुंबई उत्तर पूर्वचे भाजप खासदार मनोज कोटक, मुंबई दक्षिण मध्यचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या लोकसभा मतदार संघातून यात्रा जाणार आहे. मुंबईत ही यात्रा 20-21 मार्च पोहोचेल.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT