Bhaskar Jadhav News| CM Eknath Shinde|
Bhaskar Jadhav News| CM Eknath Shinde|  Sarkarnama
विश्लेषण

भास्कर जाधवांनी न मागता सल्ला दिला खरा.. पण एकनाथ शिंदेच्या लक्षात येणार?

सरकारनामा ब्यूरो

भारतीय जनता पक्षाच्या (BJP Maharashtra) मनात नेमके काय आहे याचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शांतपणे करायला हवा, असा सल्ला शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणताना त्रास होतो हे आमदार रवी राणा यांचे वक्तव्य, शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केले हे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य या पार्श्वभूमीवर जाधव यांनी हा सल्ला दिला. आता भास्कररावांचा हा फुकटचा सल्ला एकनाथ शिंदे कितपत मनावर घेणार, याची उत्सुकता आहे.

जाधव म्हणाले, की त्यांचे सहकारी अशा प्रकारची वक्तव्ये करत असतील तर हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आहेच, पण एकनाथ शिंदे यांना विचार करण्याची गरज आहे. हे सरकार भाजपच्या हातातील कठपुतळी बनले आहे, अशी टीका जाधव यांनी केली. दिवा शहरात शिवसेनेच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी जाधव बोलत होते. या कार्यक्रमास कल्याण लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख सुभाष भोईर, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, वैशाली दरेकर, कविता गावंड, अंकिता पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते.


भास्कर जाधव शिंदे गटाला उद्देशून पुढे म्हणाले, की दहीहंडी उत्सवात तुम्ही भाजपच्या नेत्यांचे फोटो बॅनरवर लावले होते, पण एका तरी भाजप नेत्याने शिवसेनाप्रमुखांचा किंवा आनंद दिघे यांचा फोटो बॅनरवर लावला होता का? यावरून तुम्ही भाजपच्या पाठीमागे फरपटत जात आहात. तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे, अशी टीका जाधव यांनी केली. नगरपालिका, महापालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. पुन्हा नव्याने प्रभागरचना होणार आहे. आधी झालेली प्रभागरचना, वॉर्डरचना, पडलेले आरक्षण पुन्हा बदलत आहे. तेव्हाचे नगरविकास मंत्री आणि आताचे एकच आहेत, पण स्वतःच स्वतःचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे हे सरकार भाजपच्या हातातील कठपुतळी बनले आहे, अशी टीका त्यांनी केली. आताच्या मंत्रिमंडळाने घेतलेला एक तरी असा निर्णय दाखवावा, जो भाजपला अपेक्षित नाही. सगळे निर्णय हे भाजपच्या हिताचे घेतले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी हे सेनेला संपवत होते असे ते म्हणतात. ते तर आपल्या विरोधातच होते, पण यांनी आपल्यासोबत राहून शिवसेना संपवण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला, असे म्हणत जाधव यांनी भाजपवर निशाणा साधला. बरोबर राहून कसा धोका द्यायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे बदललेले निर्णय आहेत, असेही जाधव म्हणाले.

उद्धव-राज एकत्र आले तर आनंदच
उद्धव ठाकरेंना येऊ देत, त्यांनी साद घातली तर बघू, असे विधान शर्मिला ठाकरे यांनी उद्धव व राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत केले आहे. यावर जाधव म्हणाले, शर्मिला ठाकरे काय बोलल्या हे मी ऐकले नाही. कुणाच्या घरगुती विषयावर बोलणे हे योग्य नाही, पण आज उद्धव ठाकरेंना सर्व बाजूंने घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्या वेळेला त्यांच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा राहू पाहतोय. अशा वेळेला जर त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक कुठल्याही प्रकारचा पूर्वीचा राग मनात न ठेवता उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहिले, तर त्याचा निश्चितपणे माझ्यासारख्या सामान्य माणसाला आनंदच होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT