NDA Politics : बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. जन सुराज पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपला धक्का दिला. विधानसभा निवडणुकीनंतर सात महिन्यांतच झालेल्या या निवडणुकीतील पराभवानंतर आता विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. त्याला भाजपनेही प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे.
बांकीपूर निवडणूक का महत्वाची?
बांकीपूर हा भाजपचा मागील तीन दशकांपासूनचा बालेकिल्ला होता. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा, यासाठी ते मतदारसंघात तळ ठोकून होते. मात्र, त्यानंतरही पराभव झाल्याने भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे.
भाजपच्या पराभवानंतर विरोधकांनी थेट एनडीए सरकारवर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसांतच राज्यातील लोक सरकारच्या कारभाराला त्रासली असल्याची टीका आरजेडीकरून करण्यात आली आहे. तर प्रशांत किशोर यांनीही मुख्यमंत्री स्रमाट चौधरी यांच्या शिक्षणाकडे बोट दाखवत जनतेने त्यांच्याविरोधात कौल दिल्याची टीका केली आहे.
एकीकडे विरोधकांकडून भाजपच्या पराभवाचा आनंद साजरा केला जात असताना भाजप नेत्यांकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी २००९ च्या पोटनिवडणुकीच आठवण करून देत विरोधकांना धडकी भरविली आहे. ते म्हणाले आहेत की, आम्ही निवडणुकीचा निकाल मान्य करतो. पण या निकालाने कुणीही अतिउत्साही होऊ नये. २००९ मध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने १७ जागांवर पोटनिवडणूक लढविली होती. त्यापैकी १२ जागांवर पराभव झाला होता. पण २०१० च्या निवडणुकीत आम्ही ८९ टक्क्यांच्या स्ट्राईक रेटने बिहारमध्ये विजय मिळविला होता. त्यामुळे एका विजयाने आनंदून जाऊ नये.
काय आहे इतिहास?
बिहारमध्ये २००९ मध्ये १७ जागांवर पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत एनडीएचा दारूण पराभव झाला होता. आरजेडीने या निवडणुकीत दमदार कामगिरी करत सरकारचे टेन्शन वाढविले होते. ही निवडणूक विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट मानली जात होती. त्यात एनडीएचा पराभव झाला होता. विशेष म्हणजे त्यावेळी नितीश कुमार यांचा राज्यात मोठा करिष्मा होता.
बिहारमध्ये २०१० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जेडीयूने १४१ तर भाजपने १०२ जागांवर उमेदवार उतरविले होते. लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील आरजेडीचे १६८ तर रामविलास पासवान यांच्या एलजेपीचे ७५ उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढवत सर्व २४३ जागांवर निवडणूक लढली. ही निवडणूक एनडीए, आरजेडी आणि एलजेपी तसेच काँग्रेस अशी तिरंगी झाली होती.
काही महिन्यांपूर्वीच झालेल्या पोटनिवडणुकीत जबर धक्का बसलेल्या एनडीएने या निवडणुकीत तब्बल २०६ जागा जिंकत विरोधकांचा सुपडा साफ केला होता. जेडीयूने ११५ तर भाजपने ९१ जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली होती. या निवडणुकीत विरोधकांना ५० ही जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी ऐतिहासिक ठरली होती. बांकीपूरमधील पराभवानंतर भाजप नेत्यांकडून आता विरोधकांना या निवडणुकीचा हवाला देत एकप्रकारे त्यांच्या आनंदावर पाणी फिरविले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.