Mumbai municipal election analysis : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत ठाकरे बंधूंना पराभूत केले. मुंबई पहिल्यांदाच भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून याच पक्षाचा महापौरही होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच नेत्यांकडून त्याचा आनंद साजरा केला जात आहे. पण या विजयानंतरही नेत्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपने मुंबईत २२७ पैकी ८९ जागा जिंकल्या आहेत. तर मित्रपक्ष शिवसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. या युतीचे ११८ चे संख्याबळ महापालिकेत असेल. पण या निकालावर भाजपचे राज्य पातळीवर नेते समाधानी नाही. कारण हा विजय अपेक्षेप्रमाणे नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विरोधकांकडूनही भाजपला यावरूनच घेरले जात आहे.
केंद्रात, राज्यात आणि मागील चार वर्षांपासून मुंबईत प्रशासक असूनही भाजपला शंभरचा आकडाही पार करता आलेला नाही, अशी टोलेबाजी विरोधकांकडून केली जात आहे. मागील निवडणुकीत भाजपला ८२ जागा मिळाल्या आहेत, यावेळी त्यात केवळ सातची भर पडली आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजपची चांगली कामगिरी होत असताना मात्र मुंबईत नेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.
मुंबईत भाजपने ११० जागांचे टार्गेट ठेवले होते. पण ते गाठता आले नाही. त्यामुळे पक्षाकडून आता नेमकं काय चुकलं, याची चाचपणी केली जाऊ शकते. हिंदूस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, नेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मुंबईतील स्थानिक नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव, उमेदवार निवडीत त्रुटी आणि मराठी व मुंबईच्या अस्मितेच्या मुद्द्याला मोडून काढण्यात अपयश, ही मुख्य कारणे आहेत.
जागावाटपाच्या चर्चेदरम्यान भाजपने १५५ चे टार्गेट फिक्स केले होते. पण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसाठी वाढीव जागांसाठी हट्ट कायम ठेवल्याने भाजपला माघार घ्यावी लागली. भाजपने १५५ जागा लढविल्या असत्या तर १२५ चे टार्गेट निश्चित केले असते. पण शिंदे यांना ९० जागा द्याव्या लागल्याने भाजपला १३७ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे विजयाचे टार्गेट ११० पर्यंत खाली आणावे लागल्याचे नेत्याकडून सांगण्यात आले.
भाजपमधील स्थानिक नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, मागील निवडणुकीत पक्षाचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. निवडणुकीआधी अन्य पक्षातील ११ नगरसेवकांना प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे या नगरसेवकांचा आकडा ९३ वर पोहोचला होता. पक्षाला निवडणुकीत हा आकडाही पार करता आला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या संधीचे मोठ्या विजयात रुपांतर करता आले नाही, याबाबत मुंबईतील नेत्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे हिंदूस्थान टाईम्सच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
ठाकरेंची सभाही कारणीभूत
उद्धव आणि राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर झालेली सभाही कारणीभूत ठरल्याचे नेत्यांना वाटते. प्रामुख्याने या सभेत राज ठाकरेंनी केलेले मुंबई वाचवा, मराठी ओळख वाचविण्याचे आवाहन मराठी मतदारांना चांगलेच भावले. त्याचप्रमाणे अदानी ग्रुपच्या मुंबईतील वाढीबाबत केलेले प्रेझेन्टेशनही मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले. ठाकरे बंधूंनी मतदारांना याबाबत दिलेला संदेश थोपविण्यास पक्षाला कमी वेळ मिळाला, असेही नेत्यांचे म्हणणे आहे.
ठाकरेंच्या सभेनंतर महायुतीचीही शिवाजी पार्कवरच सभा झाली होती. पण सभेला अपेक्षित गर्दी नव्हती. याबाबतही नाराजीचा सूर उमटला होता. फडणवीस आणि शिंदे यांनी या सभेत ठाकरेंच्या नॅरेटिव्हला प्रत्युत्तर देण्याचे प्रयत्न केले, पण ते पुरेशे ठरले नाहीत. शिंदेंनाही मराठी मुद्द्यावरून ठाकरेंना रोखता आले नाही. मुंबईमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट ६४ टक्के राहिला आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत हा खूप कमी असल्याने नेते नाराज आहेत. दरम्यान, फडणवीस यांनी मात्र विजयाचा जल्लोष साजरा करताना महायुतीने ११९ जागा जिंकल्याचे सांगत १४ जागा या केवळ ७ ते १०० मतांच्या फरकाने हरल्याचे सांगितले. मागील तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेला एवढ्या जागा जिंकता आलेल्या नाहीत, असेही फडणवीस म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.