RAY Nagar Project Sarkarnama
विश्लेषण

RAY Nagar Project : स्वप्नपूर्ती आडममास्तरांची... भाजपला गॅरंटी निवडणुकीतील मतांची...!

Vijaykumar Dudhale

Solapur News : तब्बल १४ वर्षांचा संघर्ष... सततचा पाठपुरावा... आंदोलने... निवेदने... आणि अनेक नेत्यांचे उंबरठे झिजवून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी असंघटित कामगारांच्या जीवनात हक्काचे घर मिळवून देत आनंदोत्सव भरला. मास्तरांच्या अथक परिश्रमातून सोलापूरच्या कुंभारी येथील रे-नगर येथे कामगारांसाठी तब्बल १५ हजार घरे उभारली आहेत. कामगारांना हक्काचे छप्पर मिळावे, यासाठी आडममास्तरांनी आपल्या आयुष्यातील १४ वर्षे या प्रकल्पासाठी खर्ची केली; पण त्याचे क्रेडिट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने पळविले. आडम यांच्या स्वप्नातील घरांवर मोदी पर्यायाने भाजपला निवडणुकीत मतांची गॅरंटी वाटू लागली आहे. (BJP took credit for Narsaiya Adam's work in Ray Nagar)

कुंभारी येथे ३६५ एकर क्षेत्रांवर ८३४ इमारती आणि ३० हजार घरे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणार आहेत. त्यातील पंधरा हजार घरे तयार झाली आणि आडममास्तर यांची स्वप्नपूर्ती झाली. या घरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी रोजी लोकार्पण झाले.

कामगारांच्या वसाहतीच्या लोकार्पण हा भव्यदिव्य सोहळा भाजपसाठी ‘व्होट कॅश’ करणारा वाटत असला तरी त्यामागे माजी आमदार आडम यांचे मोठे कष्ट आहेत, हे दुर्लक्षित करून चालणार नाही. मास्तरांनी आयुष्यात पाहिलेले सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले. मात्र, त्याचे श्रेय दुसरेच कोणीतरी घेऊन गेला, अशी अवस्था शुक्रवारी माजी आमदार आडम यांची झाली होती.

सोलापूर शहरातील असंघटित कामगारांना आपल्या हक्काचे छप्पर मिळावे, यासाठी माजी आमदार नरसय्या आडम यांनी प्रयत्न सुरू केले. हा प्रकल्प वास्तवात येणे, अशक्य असेल, अधिकाऱ्यांनी सांगून प्रस्तावच फेटाळून लावला. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून हा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी गुंडाळला. पण, आडममास्तर यांनी शरद पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरूच ठेवले.

केंद्रीय गृहनिर्माण सचिव गवई यांनी या प्रकल्पास मंजुरी आणि १४ जून २०१३ रोजी आदेश निघाला. त्यानंतरही काँग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तो प्रकल्प नाकारला. त्यावरून सोलापुरात मोर्चा, आंदोलने, हलगीनाद करीत रान पेटवले. पण, शरद पवारांच्या रेट्यामुळे काँग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना या प्रकल्पाला मंजुरी द्यावी लागली. पण, जागा खरेदीसाठी केवळ दहा हजार रुपयेच देण्याचे मान्य केले. पवारांची भेट घेऊन त्यांनी सर्व हकीकत झाली. त्यांनी सरकारी हिश्श्याबाबत हमी घेतली.

मोदीलाटेनंतर महाराष्ट्रातही भाजपच सरकार आले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी वाटा देण्याचे जाहीर केले. पण, रे-नगर ही योजना शहर भागासाठी आहे, कुंभारी हा भाग ग्रामीण भागात येतो, असे सांगून तत्कालीन केंद्रीय सचिव नंदिता चटर्जी यांनी प्रकल्प बाजूला ठेवला. तत्कालीन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगूनही चटर्जीचा नकार कायम होता. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2016-17 मध्ये लखनऊला हा प्रकल्प दाखवला आणि ते चकीत झाले. त्यांनी संपूर्ण माहिती घेतली आणि प्रकल्पाला वेग आला. पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते 9 जानेवारी 2019 रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आणि 19 जानेवारी 2024 रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण झाले.

खरं तर हा प्रकल्प मंजूर करण्यासाठीच आडममास्तर यांना अनेकांचे उंबरठे झिजवावे लागले. अनेक ठिकाणी नकार पचवावा लागला. पण त्यांनी असंघटित कामगारांसाठी अपमान आणि प्रसंगी हेटाळणीही पचवली. पण त्यांनी कामगारांना त्यांचे हक्काचे घर मिळवून दिले. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आडममास्तरांनी काँग्रेसपासून भाजपपर्यंतच्या अनेक नेत्यांच्या घरांचे उंबरे झिजवले. हा प्रकल्प पूर्ण झाल्याने त्यांच्या आयुष्यातील स्वप्नपूर्ती झाली. मात्र, आडमांची स्वप्नपूर्तीवरून भाजपला मतांची हमी वाटू लागल्याचे कार्यक्रमस्थळी दिसून आले.

सोलापूर शहरात माकपचे आणि विशेषतः आडममास्तरांचे फोटो असतील, असे वाटत असताना संपूर्ण शहरभर आणि कार्यक्रमस्थळीही महायुतीचे नेते आणि मोदी यांचेच फोटो दिसत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे क्रेडिट माजी आमदार आडममास्तर यांना जाणार नाही, याची पुरेपूर खबरदारी भाषणात घेतली. आडममास्तरांनी केलेल्या प्रयत्नांचा साधा उल्लेखदेखील मोदी यांनी केला नाही. याचे सोलापूरसह राज्यभरातील नेत्यांना आश्चर्य वाटले. याबाबत शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना ही गोष्ट अधोरेखित केली. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैसे थे असलेल्या आडममास्तरांच्या तब्येतीबाबत भाष्य केले. ते अनेक सोलापूरकरांना आवडले नाही, त्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती.

आडममास्तरांनी मांडलेल्या मुद्याकडे दुर्लक्ष...

रे-नगरमधील घरांसाठी कामारांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजमाफी करावी, असंघटित कामगारांना दहा हजार रुपये पेन्शन सुरू करण्यात यावी. रे-नगरमध्ये सौरप्रकल्प बसवावेत, त्यातून घरांना मोफत वीज द्यावी. तसेच, सुरत-चेन्नई ग्रीन कॅरिडॉरसाठी बार्शी ते अक्कलकोटदरम्यान भूसंपादन करण्यात येणार आहे. त्याला कर्नाटक सरकारच्या धर्तीवर मोबदला देण्यात यावा, अशी मागणी केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सर्व उपस्थित असतानाही त्यांनी त्याबाबत चकारशब्दही न काढल्याने आडम यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, याही मुद्यावर संषर्घाची तयारी त्यांनी बोलून दाखवली.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT