Eknath Shinde  Sarkarnama
विश्लेषण

Mahyuti News : लोकप्रिय योजनांवर ‘शिंदेशाही’ स्वार!

Mahayuti CM Eknath Shinde News : महायुतीत भाजप, राष्ट्रवादीपेक्षा एकनाथ शिंदेंची शिवसेना जोरात असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. शिवसेनेचे मंत्री, नेते, कार्यकर्ते तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही ‘हम कुछ कम नही’, ‘लढगें और जिंतेंगे,’ म्हणत आहेत.

प्रकाश पाटील patilisprakash@gmail.com

CM Eknath Shinde : पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि तेही एकनाथ शिंदेंच. हे जोरकसपणे या पक्षाचे नेते सांगत आहेत. ज्या लोकप्रिय सरकारी योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केल्या आहेत. त्यावर स्वार होण्याचा प्रयत्न शिंदे यांची शिवसेना करीत आहेत. आता शेतकरी, ज्येष्ठांसाठी तीर्थ क्षेत्र यात्रा तसेच लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

दहिहंडीपाठोपाठ राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झाला. या उत्सवात राजकीय शक्तीप्रदर्शन दिसले. सर्वच पक्ष दोन्ही उत्सवात सहभागी होताना दिसले. गणेशात्सव संपला की खऱ्या अर्थाने लोकशाही उत्सवास सुरवात होणार आहे. कधीही राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू शकते. त्या प्रतीक्षेत लोक आहेत. विद्यमान महायुती सरकार आणि विरोधी लोकशाही आघाडी मैदानात उतरलेली दिसेल. महायुतीत भाजप, राष्ट्रवादीपेक्षा एकनाथ शिंदेंची शिवसेना जोरात असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. शिवसेनेचे मंत्री, नेते, कार्यकर्ते तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही ‘हम कुछ कम नही’, ‘लढगें और जिंतेंगे,’ म्हणत आहेत.

आमदार मतदारसंघात

यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य असे आहे की ‘शिवसेना विरूद्ध शिवसेना’ असा सामना जनतेला पाहता येईल. मुख्यमंत्री शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाई, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील आदी आघाडीवर लढताना दिसत आहेत. एकीकडे हे नेते काँग्रेस-राष्ट्रवादी ऐवजी उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाला लक्ष्य करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच अजित पवारांच्या पक्षालाही ते सोडत नाहीत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘ज्येष्ठांसाठी तीर्थयात्रा योजना’ तसेच ‘मुख्यमंत्री कृषी सौर योजने’चे श्रेय स्वत:कडे खेचण्याचा प्रयत्न शिवसेना करताना दिसत आहे. वास्तविक अशा लोकप्रिय योजना एखादे सरकार जाहीर करीत असते. आज राज्यात महायुतीचे सरकार आहे आणि त्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आहेत. शिवसेना या दोघांपेक्षा मुख्यमंत्री कसे जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत हे राज्यातील जनतेला सांगण्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रयत्न करीत आहेत.

निवडणूक तोंडावर असल्याने प्रत्येक आमदार आपला मतदारसंघात आहे. लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) आहे हे कसे सांगितले जाते हे पाहायचे असेल मंत्री शंभूराज देसाई यांच्या विधानाकडे पाहावे लागेल. देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की लाडकी बहीण योजनेनंतर मी अनेक गावांना भेटी दिल्या आहेत. जेथे जातो तेथे लोक ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. त्यांची आमच्यासाठी भेट आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे आणि एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार आहेत हे सांगण्यासही ते विसरत नाही. तर दुसरीकडे बारामती आणि काही जिल्ह्यात लाडकी बहीण योजना ही अजित पवार यांची असल्याचे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते सांगताना दिसत आहेत. भाजपपेक्षा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या योजनेवरून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुख्यमंत्री म्हणून प्रभाव

गेल्या दोन वर्षांपासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत. या दोन वर्षांचा विचार जर केला तर यापूर्वी त्यांनी कोणतीही लोकप्रिय योजना जनतेसाठी आणली नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर मात्र लाडकी बहीण, तीर्थयात्रा योजना, मुख्यमंत्री कृषी सौरउर्जा योजना आणून महिला, शेतकरी आणि ज्येष्ठांना स्वत:कडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे. बहिणींसाठी दीड हजार महिन्याला देण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला असला तरी त्यांचे कट्टर विरोधक खासदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे शिंदे यांच्यावर टीकेचे प्रहार करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून शिंदेंना लक्ष्य करताना म्हटले की राज्यात महायुतीचे सरकार जाणार आहे. लोकशाही आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे पुढे लाडकी बहीण योजनेचे दीड वरून तीन हजार रूपये करू.

आपण कष्टकरी, शेतकरी वर्गाचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्नही शिंदे हे करताना दिसत आहेत. आजपर्यंत वर्षावर गणपतीची आरती रथीमहारथींच्या हस्ते होत आली आहे. याला छेद देत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनाही वर्षावर बोलवून आरतीचा मान दिला. शेवटी मुख्यमंत्री म्हणून शिंदेंचा प्रभाव पडतोच हे नाकारून तरी कसे चालेल.

मतांचा जोगवा मिळेल ?

सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेनेकडे (Shivsena) पाहिले तर असे लक्षात येते की महायुती सरकारने ज्या महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच जनतेमध्ये त्याचे मार्केटींग कसे करता येईल हे पाहात आहेत. लोक या योजनेमुळे सत्ताधारी पक्षाच्या झोळीत मताचा जोगवा टाकतील, असा विश्वास शिंदे यांना वाटत असला तरी ते सोपेही नाही.यापूर्वीच्या सरकारी योजनांकडे दृष्टिक्षेप टाकल्यास असे लक्षात येते की लोकप्रिय योजनांमुळे एखादे सरकार सत्तेवर येईलच हे सांगता येत नाही.

शिंदे सरकारने (Shinde Government) महत्त्वाच्या योजना आणल्या. त्याचा गाजावाजाही झाला. पण, तिकडे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि ते कसे बॅकफूटवर गेले हे लक्षात घेतले पाहिजे. पण पुढचा मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच आणि तेही एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री बनणार हे जोरकसपणे या पक्षाचे नेते सांगत आहेत. ज्या लोकप्रिय सरकारी योजनांच्या निवडणुकीच्या तोंडावर जाहिराती केल्या आहेत त्यावर स्वार होण्याचा प्रयत्न शिंदे यांची शिवसेना करीत आहे. आता शेतकरी,ज्येष्ठ नागरिक, तसेच लाडक्या बहिणी एकनाथ भाऊंच्या मागे खरेच उभ्या राहातात का ? हे पाहावे लागेल. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही लाडक्या बहिणीवरून शिंदे सरकारला सुनावले आहे. बहिणीला दीड हजार देतात, मेव्हण्याला आरक्षण का देत नाही, असा हल्लाबोल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT