Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
विश्लेषण

Narendra Modi-Amit Shah : मोदी-शहांची ही वादळापूर्वीची शांतता म्हणायची का? संसदेत घमासान, दोघांचेही मौन...

Parliament BJP Congress Rahul Gandhi : भाजपच्या दोन खासदारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राहुल गांधींनी त्यांना धक्का दिल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Rajanand More

New Delhi : पहिली घटना – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयीच्या एका विधानावरून काँग्रेसकडून देशभरात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर 24 तासांच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियात पोस्ट करत शहांची पाठराखण केली. शहांनीही पत्रकार परिषद घेत काँग्रेसला प्रत्युत्तर दिले.

दुसरी घटना - संसदेच्या आवारात गुरूवारी भाजप आणि काँग्रेसचे खासदार आमनेसमाने आले. त्यावेळी झालेल्या कथित धक्काबुक्कीमध्ये भाजपचे दोन खासदार खाली पडले आणि जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका महिला खासदारांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले. पण त्यावर ना शहांची प्रतिक्रिया आली ना मोदींची.

दोन्ही घटनांच्या केंद्रस्थानी अमित शहा आहेत. राज्यसभेत त्यांनी आंबेडकरांविषयी केलेल्या विधानानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंगळवारी त्यांनी राज्यसभेत केलेल्या विधानानंतर मागील दोन दिवस विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात आणि आवारातही जय भीमचा नारा देत शहांना घेरण्याचा प्रयत्न केला.

संसदेत गुरूवारी भाजपनेही काँग्रेसला प्रत्युतर देण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला. दोन्ही पक्षांच्या आंदोलनादरम्यान नको ते घडले. भाजपचे दोन खासदार खाली पडून जखमी झाले. त्यांना राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप भाजपने काल आहे. तर एका महिला खासदाराने राहुल यांच्यावर गंभीर आरोप केले. भाजपने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर काही तासांतच त्यांच्या गुन्हाही दाखल करण्यात आला. काँग्रेसनेही भाजप खासदारांची तक्रार दिली असून अदयाप गुन्हा दाखल झालेला नाही.

मोदी-शहांची प्रतिक्रिया नाही!

बुधवारी काँग्रेसच्या आंदोलनानंतर मोदींनी तातडीने सोशल मीडियात पोस्ट करत शहांचे समर्थन करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. शहांनीही सायंकाळी पत्रकार परिषद घेत तातडीने काँग्रेसच्या आंदोलनाला उत्तर दिले. अशाप्रकारे दोन्ही नेत्यांकडून पहिल्यांदाच असे प्रत्युत्तर दिसले. पण आपल्याच पक्षाचे दोन खासदार रुग्णालयात उपचार घेत आहेत, महिला खासदाराने विरोधी पक्षनेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत, त्यावर मात्र दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. ना सोशल मीडियात, ना माध्यमांसमोर.

लोकसभेमध्ये गुरूवारच्या घटनेवरून शुक्रवारी भाजपकडून काहीतरी बोलले जाईल, निषेध केला जाईल, अशी शक्यता वाटत होती. पण तसे काहीच घडले नाही. काँग्रेसकडून मात्र जयभीमचा नारा दिला जात होता. विशेष म्हणजे यावेळी सभागृहात नरेंद्र मोदीही उपस्थित होते. कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच अधिवेशन गुंडाळण्यात आले.

मोदी-शाह यांची ही चुप्पी वादळापूर्वीची शांतता आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर राज्यसभेच्या एका महिला खासदारांनीही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता भाजप संसदीय आणि कायदेशीर आयुधांचा वापर करून राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अडचणी वाढवणार, असेच दिसते. त्याचप्रमाणे काँग्रेसला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी पुढील काळात भाजपचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले तर नवल वाटायला नको. तसेच मोदी-शाह गुरूवारच्या घटनांवर कधी आणि काय बोलणार, याकडेही लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT