Delhi Vidhan Sabha Elections : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने यश मिळवलं आहे. आप आदमी पक्ष आणि काँग्रेसचा पुरता धुव्वा उडाला आहे.
सत्ताधारी आम आदमी पक्षाचा दिल्लीत झालेल्या पिछेहाट कशामुळे याची मीमांसा केली जाऊ लागली आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई लढताना अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या पक्षाला भ्रष्टाचारांच्या आरोपामुळे मतदारांनी सत्तेतून पायउतार केले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 2013 मध्ये भ्रष्टाचारांच्या आरोपांविरुद्ध काँग्रेसविरुद्ध (Congress) देशभर रान पेटवले. दिल्लीच्या रामलीला मैदानावर अण्णांनी केलेल्या उपोषणानं देश पेटून उठला. या भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढ्यात अण्णांबरोबर अरविंद केजरीवाल उभे राहिले. अण्णांचे उपोषण संपल्यावर अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात उडी घेतली.
दिल्लीतील (Delhi) अण्णांच्या चेहऱ्याचा झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी राजकारणातील भ्रष्टाचार थांबण्यासाठी राजकारणातच उतरावे लागले, असे म्हणत दिल्लीच्या मैदानात आम आदमी पक्षाची घोषणा केली. 2013 मध्ये दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाने 28 जागा जिंकल्या. अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघात तीने वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांचा पराभव केला. तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसला फक्त आठ जागा जिंकता आल्या. भाजपला त्यावेळी सर्वाधिक 31 जागा मिळाल्या. परंतु भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने ‘आप’ला पाठिंबा दिला आणि अरविंद केजरीवाल यांनी दिल्ल्याच्या मुख्यमंत्रिपदाची पहिली शपथ घेतली.
अरविंद केजरीवाल यांनी 2015 मध्ये भ्रष्टाचारी कायदा लागू करण्याची तयारी केली. काँग्रेस या मुद्यावर आक्रमक झाली अन् केजरीवाल सरकारचा काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला. केजरीवाल यांच्या 'आप'चे सरकार कोसळले. 2015ला 'आप'ने 70 पैकी 67जागा जिंकल्या. याचवेळी तीन वेळा दिल्लीच्या सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला भोपळा मिळाला. देशात मोदी पर्व सुरू असतानाच, 2020 मध्ये 'आप'ने पु्न्हा जोरदार मुसंडी मारत, 62 जागा मिळवल्या. यावेळी काँग्रेसच्या पदरात पुन्हा भोपळा पडला.
2025मध्ये भाजपने तब्बल 27 वर्षांनंतर भाजप दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली आहे. सत्ताधारी 'आप' आणि भाजपमध्ये लढत झाली. यावेळी तिसऱ्यांदा काँग्रेसच्या हाती भोपळा आला आहे. सत्ताधारी 'आप' आणि भाजपमध्ये, अरविंद केजरीवाल यांनी 2013 मध्ये दिल्लीतून राजकारणात प्रवेश करताना ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर लढाईला सुरवात केली त्याच भ्रष्टाचाराने 2025 मध्ये त्यांची सत्ता गिळंकृत केली.
2015 आणि 2020च्या निवडणुकीत 'आप'ने दिल्लीत मोठा विजय मिळवला. या काळात 'आप'ने दिल्लीत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात प्रभावी काम केले. वीज अन् पाणी पुरवठ्यात सबसिडी देत दिल्लीकरांना मोहिनी घातली. यातून दिल्लीकरांच्या आपेक्षा वाढल्या. लोकसभा निवडणुकीत भाजपने देशपातळीवर यश मिळवले. पण, दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न होते. यातून 'आप'विरुद्ध भाजपचा राजकीय संघर्ष सुरू झाला. या संघर्षात 'आप' घेरली गेली. यातून दिल्लीकरांच्या आपेक्षा पूर्ण करण्याचे राहून जाऊ लागले. दिलेली आश्वासने अपूर्ण राहू लागली.
यातच केंद्रातील भाजपने 'आप'च्या कामकाजात अडथळे निर्माण करण्यास सुरवात केली. सत्ताधारी आप दिल्लीकरांना हे ठासून सांगण्यात दंग झाली. पण दिल्लीतील मतदारांनी 'आप'च्या या कारणांकडे आणि आरोपांकडे सबब म्हणून पाहू लागली. सत्तेच्या दहा वर्षांत काहीच देणेघेणे राहिले नाही, अशी धारणा यातून दिल्लीतील मतदारांची झाली. केंद्राशी 'आप'चा संघर्ष सुरू असतानाच भाजपने 'डबल इंजिन'च्या आश्वासनाची दिल्लीतील मतदारांना भुरळ घातली. मतदारांना आकर्षित केले आणि हा निकाल तेच प्रतिबिंबित झाले.
दिल्लीच्या निवडणुकीत अरविंद केजरीवालविरुद्ध भाजप, असा संघर्ष सुरवातीपासून पाहायला मिळाला. भाजपने त्यांचा हल्ला 'शीश महाल'वर केंद्रीत केला. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदावर असताना मुख्यमंत्री निवासस्थानाचे नुतनीकरण केले. केजरीवाल यांच्या याच खर्चावर भारताचे नियंत्रक तथा महालेखा परीक्षक यांनी अहवालात ताशोरे ओढले. भाजपच्या आपवरील हल्ल्याच्या दारूगोळ्याची एकप्रकारे ही भरच पडली. कॅगच्या तपासणीत नूतनीकरणावर प्राथमिक अंदाजानुसार 7.91 कोटी रुपये खर्च होता. 2020 मध्ये काम मंजूर झाल्यावर हे 8.62 कोटींवर गेले. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने 2022 मध्ये काम पूर्ण केले, तोपर्यंत खर्च 33.66 कोटी रुपयांवर गेले. आपने भाजपवर 'शीश महाल'च्या आरोपांवर 'राजमहाल' प्रतिहल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जीवनशैलीवर आरोप चढवला. भाजपला पंतप्रधानांचे निवासस्थान दाखवण्याचे धाडस करावे, असे आव्हान दिले. परंतु भाजपने पद्धतशीरपणे अरविंद केजरीवाल यांच्या 'शीश महाल'ची मोहीम मतदारांमध्ये राबवली. त्यातून या मोहिमेचा चांगलाच प्रभाव पडला. विशेषत: स्वच्छ राजकारणाच्या 'आप'च्या वचनाविरुद्ध अन् व्हीआयपी जीवनशैली काढून टाकण्याच्या केजरीवाल यांच्या दाव्यांविरुद्ध 'शीश महाल'ची भाजपची खेळी प्रभावी ठरली.
'आप' आणखी एका मुद्यावर चांगलीच घेरली गेली. दारू धोरणातील भ्रष्टाचारांचा आरोप! हा दारू घोटाळा देशपातळीवर गाजला. यातून आप दारू धोरण रद्द करावे लागले. दारूच्या बाटल्यांवर 'एकवर एक फ्री', अशी ऑफर आणली होती. भाजपने अरविंद केजरीवाल सरकारवर "दिल्लीला दारुड्यांचे शहर बनवण्याचा" आरोप केला. मात्र 'आप'ने मद्य धोरणातील आरोप सातत्याने नाकारले. यातच भर म्हणून काय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील या धोरणावरून अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. या घोटाळ्याची केंद्रीय यंत्रणांनी चौकशी केली. यात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि संजय सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांना तुरुंगात जावे लागले. सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर, त्यांनी उपमुख्यमंत्री पद सोडले आणि आपला त्यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करावे लागले. त्यानंतर केजरीवाल यांना अटक झाली आणि पाच महिने ते तुरुंगात राहिले. अनेक प्रमुख नेत्यांच्या अटकेने 'आप' बॅकफूटवर गेली. परिणाम 2025 च्या निवडणुकीत 'आप'चा पराभव झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.