
Delhi assembly election 2025 : अकरा वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून पुढे आलेल्या एका सर्वसामान्य व्यक्तीने पक्ष तयार केला. सर्वसामान्य कार्यकर्ता ते दिल्लीचे मुख्यमंत्री असा अरविंद केजरीवाल यांचा प्रवास लक्षवेधी असाच होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून केजरीवाल पुढे आले. अण्णा हजारे राळेगणसिद्धी सोडून लोकपाल विधेयकासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषणाला बसले.
अखेर मोठ्या मनधरणीनंतर अण्णांचे उपोषण सुटले आणि केजरीवाल यांनीही राळेगणसिद्धीशी फारकत घेऊन त्यांनी दिल्लीत राज्य सरकार स्थापन केले, असा आजपर्यंतचा केजरीवाल यांचा प्रवास राहिला. एकेकाळी केजरीवाल हे ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांना गुरु मानत होते. मात्र, कालांतराने त्यांच्यातील संबंध ताणले गेले. या ताणलेल्या संबंधाचा फटका केजरीवालांना बसला असून त्यामुळे त्यांना दिल्ली विधानसभेतील सत्तेतून पायउतार व्हावे लागले.
काही काळ सरकारी नोकरीत असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी 2011 मध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या संपर्कात आले. त्यांनी लोकपाल कायद्यासाठी इंडिया अगेंस्ट करप्शन ग्रुपची (IAC) स्थापना केली होती. 16 ऑगस्ट 2011 पासून ते दिल्लीत रामलीला मैदानात अण्णा हजारे यांच्यासह उपोषणाला बसले. हे आंदोलन 28 ऑगस्टपर्यंत चालले. त्यावेळी या आंदोलनात किरण बेदी, कुमार विश्वास, संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. अरविंद केजरीवाल (Arvind Kejrival) त्याकाळी झालेल्या अण्णा हजारे यांचे आंदोलन व त्यानंतरच्या घडामोडीत मुख्य चेहरा ठरले होते.
या आंदोलन काळात अण्णा हजारे यांच्या पाठीमागे अरविंद केजरीवाल सावलीप्रमाणे उभे राहत होते. उपोषणावेळी पत्रकार परिषदेत काय बोलायचे याचे नियोजन देखील तेच करत होते. एवढेच नव्हे तर पत्रकार परिषदेवेळी अण्णाच्या कानात देखील एकदा मुद्दा मांडून त्यावर सल्ला मसलत करीत होते. त्यामुळे त्याकाळी दिल्लीत गाजलेलया अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनात केजरीवाल यांची वेगळीच छाप होती.
त्याकाळी दिल्लीत झालेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा फायदा अरविंद केजरीवाल यांनी चांगल्या पद्धतीने करून घेतला. त्याकाळी त्यांनी भ्रष्टचार विरोधातील लढा दिल्लीत त्यानंतर ही सुरूच ठेवला. त्यामध्ये खंड पडू दिला नाही. त्यातूनच अरविंद केजरीवाल यांनी 2 ऑक्टोबर 2012 रोजी राजकीय पक्ष गठित केला. 24 नोव्हेंबर 2012 ला आम आदमी पक्ष (AAP) असे त्याचे नामाकरणही केले. यावरुन पहिल्यांदा केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांची नाराजी ओढावून घेतली होती. अण्णा हजारे यांचा त्याच वेळी पक्ष स्थापनेला विरोध होता. मात्र, केजरीवाल यांनी अण्णाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत काम सुरूच ठेवले.
त्यावेळी केजरीवाल म्हणाले होते, आम्हाला राजकारणात येण्यास भाग पाडले गेले. आम्हाला राजकारण समजत नाही. आम्ही या देशातील सामान्य लोक आहोत. भ्रष्टाचार आणि महागाईने हैराण झालो आहेत, असं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. त्यानंतर दिल्लीच्या दोन वेळच्या निवडणुकांमध्ये जवळपास ९० टक्के जागांवर विजय मिळवला. पंजाबमध्ये बहुमताचे सरकार स्थापन केले. गोवा, गुजरातमध्येही आमआदमी पक्षाचे आमदार निवडून आले आणि कोणताही राजकीय अनुभव नसेला पक्ष राष्ट्रीय पक्ष बनला. लोकसभा निवडणुकीत मात्र आम आदमी पक्षाला फारस यश मिळाले नाही.
केजरीवाल यांनी त्यानंतर पार पडलेल्या 2013 मधील दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवली. त्याला देखील अण्णा हजारे यांनी विरोध दर्शवला होता. या निवडणुकीत केजरीवाल यांच्या पक्षाने अभुतपूर्व विजय मिळवला होता. या नवख्या पक्षाने चांगलीच कमाल केली. त्यांनी काँग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा देखील पराभव केला. काँग्रेसनेच त्यांना बाहेरुन पाठिंबा दिल्याने केजरीवाल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यानंतर दोन वर्षातच काँग्रेसने सरकारचा पाठींबा काढून घेतला. त्यानंतर 2015 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत केजरीवाल आम आदमी पक्षाने सर्वाधिक 67 जागा खिशात घातल्या.
त्यानंतर 2020 मध्ये भाजपने त्यांना पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडले. पण आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीत 70 मधील 62 जागांवर विजय मिळवला. 16 फेब्रुवारी 2020 रोजी, ज्या रामलीला मैदानावर त्यांनी कधीकाळी उपोषण केले होते. त्याच मैदानावर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. येथे पर्यंत सर्व काही सुरळीत सुरु होते. मात्र, त्यानंतर सर्व फासे उलटे पडण्यास सुरुवात झाली.
अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर मद्य धोरण खुले केल्याने अण्णा हजारे यांनी या मद्य धोरणास स्पष्टपणे विरोध केला होता. मुळात अण्णा हजारे हे गांधीवादी विचारांचे होते. नवी दिल्लीत त्यांचा शिष्य केजरीवाल हे दारूचे दुकाने वाटतात, हे समजताच त्यांचा संताप अनावर झाला. अण्णा हजारे यांनी याबाबत केजरीवाल यांना चार पत्रे पाठवली होती. त्यांनी या मद्य धोरणास उघडपणे विरोध केला होता. मात्र, त्याकाळी केजरीवाल यांनी अण्णांच्या पत्राकडे दुर्लक्ष केले. या पत्राचे उत्तर सुद्धा त्यांनी दिले नव्हते. त्यामुळे पूर्वीपासून बिघडलेल्या संबंधात आणखी भर पडली.
मुख्यमंत्री केजरीवाल त्यानंतर चार कोटी रुपये किंमतीच्या बंगल्यामध्ये राहायला गेल्यानंतर जाताच अण्णा हजारे यांनी परत एकदा पत्र पाठवून निषेध केला होता. मात्र, त्याकडे ही त्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यातच नवी दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना मद्य घोटाळाप्रकरणी प्रथम अटक होताच अण्णा हजारे यांनी पुन्हा केजरीवाल यांच्याशी पत्रव्यवहार करून मद्य धोरण रद्द करा, असे मागणी केली. परंतु आपच्या मंत्र्यांवर या मद्य परवाना धारकांचा प्रचंड दबाव असल्याने मद्य धोरण पुढे तसेच सुरू राहिले.
दरम्यान, अण्णा हजारे मुख्यमंत्री केजरीवाल त्यांच्या पत्राला दाद देत नसल्याचे लक्षात येताच नवी दिल्लीच्या राज्यपालांनाही पत्र पाठवून लक्ष वेधले. हे मद्य धोरण म्हणजे मद्य घोटाळा आहे. हे गेले चार महिन्यांपासून सुरू आहे. नवी दिल्लीतील मद्य व्यापाऱ्यांना परवाने देताना काही बंधनही राहिले नव्हते. विशेष म्हणजे या मद्य धोरणांची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने देखील केली होती.
या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने केजरीवाल यांच्याविरुद्ध नऊ वेळा समन्स बजावले. आपचा जन्मच मुळी भ्रष्टाचार विरोधासाठी झाला होता. एखाद्या शासकीय यंत्रणेने दोन वेळा समन्स बजावून हजर न होणे यामुळे साहजिकच दिल्लीतील जनतेची केजरीवाल यांच्याबद्दल नाराजी वाढत गेली. त्यातच केजरीवाल यांना अटक करण्यात आली. अटक करूनही केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नव्हता.
त्यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेनंतर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सातत्याने त्यांच्यावर टीका केली होती. ‘मी त्यांना असे धोरण बनवू नये असे सांगितले होते. आमचे काम अबकारी धोरण बनवणे नाही. यातून त्यांना जास्त पैसे कमावतील असे वाटत होते म्हणून त्यांनी हे धोरण बनवले. मला वाईट वाटले, त्यामुळे मी दोनदा पत्रे लिहिली. एकेकाळी माझ्यासोबत काम करून दारूविरोधात आवाज उठवणारा केजरीवाल यांच्यासारखा माणूस अबकारी धोरण बनवत आहे याचे मला वाईट वाटले. दारू वाईट आहे हे अगदी लहान मुलालाही माहीत असते. त्यांच्या कर्माचे हे फळ आहे, अशी टीका अण्णा हजारे यांनी केली होती.
केजरीवाल यांच्या अटकेमुळे आम आदमी पक्ष चांगलाच संतापला होता. त्यातच अण्णा हजारे यांनी केलेली टीका पक्षाला चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यानंतर आपकडून अण्णा हजारे यांच्यावरच हल्लाबोल करण्यात आला. अण्णा हजारे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कधीही काहीही बोलत नाहीत. त्यांचे वक्तव्य दुःखद आहे, अशी टीका केली होती.
त्या काळातच लोकशाही मानणाऱ्या अण्णा हजारे यांनी स्पष्ट भूमिका घेतली. ७२ तासांच्या पुढे सामान्य माणूस पुढे जेलमध्ये असेल तर त्याचे पद अधिकार काढून घेतले जातात. परंतु येथे तर केजरीवाल हे तुरुंगातून दिल्लीचा कारभार पाहत होते. त्यामुळे केजरीवाल व अण्णा हजारे यांच्यातील दरी दिवसेंदिवस रुंदावतच गेली. त्याचा फटका केजरीवाल यांना बसला आहे. दुसरीकडे केंद्रात भाजपचे सरकार राज्यात आपचे सरकार यामध्ये तणाव भरपूर होता. त्याचा फटका केजरीवाल यांना बसला असून त्यामुळेच त्यांना दिल्लीतील सत्तेवर पाणी सोडावे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.