Devendra Fadnavis-Vidhan Parishad BJP Candidate  Sarkarnama
विश्लेषण

Vidhan Parishad Election : फडणवीसांनी सोशल इंजिनिअरिंगला दिला प्रादेशिक समतोलाचा टच!

Vijaykumar Dudhale

Mumbai, 01 July : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आज (ता. १ जुलै) आपले पाच उमेदवार जाहीर केले. त्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करताना भाजपने सामाजिक समतोलही साधला आहे. लोकसभा निवडणुकीत हातातून निसटलेली ‘ओबीसी व्होट बॅंक’ पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न या उमेदवारीच्या माध्यमातून झाल्याचे दिसून येते. प्रादेशिक समतोल साधताना पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप देण्यात आले असून सहापैकी चार जागा मिळाल्या आहेत. मराठवाडा आणि विदर्भाला प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान आणि निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारांना उद्यापर्यंत (ता. 2 जुलैपर्यंत) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तत्पूर्वी एक दिवस अगोदर भाजपने (BJP) विधान परिषदेचे आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके आणि सदाभाऊ खोत यांचा भाजपकडून तिकिट जाहीर झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. खोत हे मित्रपक्षाचे उमेदवार आहेत.

भाजपच्या उमेदवारांमध्ये तीन ओबीसी, एक मराठा आणि एका एससी प्रवर्ग अशी सामजिक समतोल राखणारी संधी दिली आहे. त्यातून भाजपने ‘ओबीसी व्होट बॅंके’ला पुन्हा एकदा चुचकारले आहे. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रावर तीन जागा देऊन विशेष प्रेम दाखवून दिले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात मागील लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेकडे सोलापूर, माढा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, पुणे, मावळ या सात जागा होत्या. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ सातारा, हातकणंगले, पुणे, मावळ याच चारच जागा मिळाल्या आहेत. भाजपला तीन जागा गमावाव्या लागल्या आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात नव्याने पक्षाची बांधणी करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

मराठा आरक्षणाचा सर्वाधिक फटका बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत व्हावे लागलेल्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देऊन राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. मात्र, विधान परिषदेवर घेऊन त्यांना सत्तेचे कोणते पद मिळणार, हा प्रश्नच आहे. कारण विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मंत्रिपदावर संधी मिळाली, तरी ते औट घटकेचेच ठरण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील मराठा समाज आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपवर अगोदरच नाराज आहे. पंकजा मुंडे यांना डावलून ओबीसी समाजाची नाराजी वाढू नये, याची काळजी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देऊन केल्याचे दिसून येते. लोकसभेच्या निकालानंतर बीडमध्ये सामाजिक अशांतता दिसून येत आहे. पण, पंकजा यांना संधी देऊन ती कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे.

BJP Candidate List

विधान परिषदेवर या पाच जणांना देण्यात आलेली संधी विधानसभा निवडणुकीत किती उपयोगी ठरते, हे पाहण्यासाठी आपल्याला विधानसभेच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे. मात्र, विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने ओबीसी व्होट बॅंक पुन्हा एकदा घट्ट करण्याचा प्रयत्न चालवल्याचे दिसून येते.

पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेचे पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी शरद पवार गट : शिरूर, माढा, बारामती

काँग्रेस : सोलापूर, कोल्हापूर, सांगली (काँग्रेसला पाठिंबा)

शिवसेना शिंदे गट : मावळ, हातकणंगले

भाजप : पुणे, सातारा

मागील निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात युतीला सात जागा मिळाल्या होत्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT