Pune News : दहीहंडीच्या निमित्ताने ठाण्यातील टेंभीनाका परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेजण एकत्रित आले होते. यावेळी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेना एकच असल्याचे सांगत एकोप्याचे दर्शनही घडवले. त्यामुळे येत्या काळात ठाण्यातील भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सुरु असलेली गटबाजी थांबेल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते व वनमंत्री गणेश नाईक यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनता दरबारची मोहीम सुरूच ठेवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ठाणे दौऱ्यानंतरही गणेश नाईक यांनी या एकोप्याच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले आहे.
महायुतीमध्ये ठाण्यावरून नेहमीच रस्सीखेच दिसून येते. गेल्या काही दिवसापासून गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेविरोधात मोहीमच उघडली आहे. ठाणे व नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यसमोर ठेवून गणेश नाईक यांनी ठाण्यात सर्वत्र जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी ठाण्यात बैठका घेऊन अधिकाऱ्याना सूचना देत आहेत. त्यामुळे महायुतीमधील मित्र पक्ष नाराज झाले आहेत. नाईक यांची 'एकला चलो'ची भूमिका पाहून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे.
ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराचे ठिकाण बदलून ठाण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या राम गणेश गडकरी सभागृहात गणेश नाईक (Ganesh Naik) यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी नाईक यांच्यावर 'साठी बुद्धी नाठी' अशी केलेली टीका गणेश नाईक यांच्या चांगलीच जिव्हारी लागलेली दिसत आहे. त्यामुळेच नाईक यांनी शुक्रवारी ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी जनता दरबार आयोजित करून एकनाथ शिंदेंची कोंडी केली आहे.
पालघर येथील एका कार्यक्रमावेळी 'एकनाथ शिंदे यांना गेल्या अडीच वर्षाच्या कारकीर्दीत मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती. पण मिळालेले टिकवता यायला हवे', असे वक्तव्य केले होते. त्यामुळेच त्या वक्तव्याचा समाचार घेतानाच खासदार म्हस्के यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद चव्हाटयावर आला आहे.
त्यातच दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली होती. नाराज असल्याची चर्चा होत असतानाच दहीहंडीच्या निमित्ताने ठाण्यातील टेंभीनाका परिसरात सीएम फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेजण एकत्रित आले होते. यावेळी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वादावर पडदा टाकताना भाजप-शिवसेना एकच असल्याचे सांगत एकोप्याचे दर्शनही घडवले होते. मात्र नेते एकत्र आले तरी ठाण्यातील दोन्ही पक्षाचे एकत्रीत दिसत नाहीत.
सीएम फडणवीस यांच्या ठाणे येथील दौऱ्यानंतर भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी दरी जाणवत आहे. आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुका दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत मनोमिलन होण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करीत आगामी निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष 'एकला चलो'च्या भूमिकेत दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.