Devendra Fadnavis, Hitendra Thakur, Eknath Shinde Sarkarnama
विश्लेषण

Shinde-Thakur Yuti : एकनाथ शिंदे अख्खा पक्ष गळाला लावण्याच्या तयारीत! 'अप्पां'नी डाव उधाळला, छुपी युती अन् भाजपचीही कोंडी!

Eknath Shinde Hitendra Thakur BVA : वसई विरारच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदेंनी दिल्याचे वृत्त होते. मात्र, हितेंद्र ठाकूरांच्या रणनीतीमुळे नवी युती सुरू होणार असल्याची शक्यता आहे.

Roshan More

Vasai Virar Politics : एकनाथ शिंदें यांनी बहुजन विकास आघाडीला आपल्या पक्षात समाविष्ट करण्याचे वृत्त समोर आले. क्षीतिज ठाकूर यांना आमदारकी देत बविआचे शिवसेनेत विलीनीकरणाचा प्रस्ताव असल्याचे सांगितले जाते. मात्र, हितेंद्र ठाकूर हे आपला पक्ष एका आमदारकीसाठी शिवसेनेत विसर्जित करण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

वसई-विरार आणि पालघरच्या राजकारणात हितेंद्र ठाकूर 'अप्पा' म्हणून परिचित आहेत. महापालिका निवडणूकांमध्ये भाजपने मोठे मोठे बालेकिल्ले उद्धवस्त केले मात्र त्यांना 'वसई'चा किल्ला सर करता आला नाही. 'अप्पा पॅटर्न'ने भाजपला पराभवाचा झटका दिला अन् वसई-विरारमध्ये फक्त अप्पांची रणनीती चालते हे दाखवून दिले.

बविआने वसई-विरार महापालिकेत सत्ता मिळवली असली तरी भाजपची वाढत असलेली ताकद ही त्यांच्यासाठी भविष्यात डोकेदुखी ठरणार हे निश्चित. त्यातच राज्यात भाजपची सत्ता आहे त्यामुळे विकासकामांना बळ मिळेल याची शाश्वती नाही त्यामुळे बविआची वाटचाल थंड पडण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये बविआसाठी एकनाथ शिंदे हे नवसंजीवनी ठरण्याची शक्यता नाकरता येत नाही.

भाजपची ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वाढलेली ताकद ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखील डोकेदुखी ठरत आहे. भाजपने थेट स्थानिक स्वराज्य निवडणुकीतून आमदारकीसाठी ठाण्याच्या जागेवर सांगितलेला दावा शिंदेंसाठी देखील मोठा झटका आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांच्या 70 नगरसेवकांची ताकद शिंदेंसाठी महत्त्वाची ठरणार आहे. 'स्थानिक'साठी शिवसेनेचा दावा आणखी मजबूत करण्यासाठी बविआचे 70 नगरसेवकांचा महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळेच क्षीतिज ठाकूर यांना आमदारकीची ऑफर असून त्या माध्यमातून भाजपला रोखण्याचा डाव असल्याचे दिसून येते.

सत्तेत असलेली शिवसेना जर मदतीला आली तर महापालिकेतील विकासकामे, निधीचा प्रश्न मार्गी लागेल, याची जाणीव हितेंद्र ठाकूर यांना आहे. पुढील पाच वर्ष राजकारण करताना सत्तेत असलेल्या पक्षाची ताकद मिळत असेल तर ती नाकारण्याचे कारण नाही, असे देखील हितेंद्र ठाकूरांचे आजवरचे राजकारण सांगत आले आहे. मात्र, त्या बदल्यात ते पक्षच शिवसेनेत विसर्जीत करतील, असे म्हणणे खूप घाईचे ठरेल. शिवसेनेसोबत युती करत ते पुढील वाटचाल करतील विशेष म्हणजे ही युती छुपी असण्याचीच जास्त शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंनी विधान परिषद निवडणुकीच्या वेळी बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. मात्र, बच्चू कडूंनी आपला पक्ष एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विसर्जीत केला नाही. पक्षाचा प्रमुख शिवसेनेत गेल्याने पक्षाचे अस्तित्व संपले आहे. मात्र, यावर बच्चू कडू यांनी 'प्रहार' सामजिक संघटना म्हणून काम करेल, असे सांगून भविष्यातील मार्ग देखील मोकळा ठेवला आहे. त्याच प्रमाणे बहुजन विकास आघाडीचे विलीनीकरण शिवसेनेत न करता आपली गरज म्हणून हितेंद्र ठाकूर शिवसेनेसोबत जातील. शिंदेंच्या माध्यमातून निधी मिळवत विकासकामे करतील. विशेष म्हणजे दोघे एकत्र आले तर भाजपची वाढती घोडदौड रोखण्यात त्यांना यश येईल.

शिंदेंनी जाळे टाकले...

एकनाथ शिंदेंचे विधानसभा निवडणुकीनंतरचे राजकारण पाहिले तर ते आक्रमकपणे भाजप विरोधात एक एक माणूस गोळा करत आहेत. आपल्या पक्षातील नेत्यांना ताकद तर देत आहेत मात्र त्यांच्यावर पूर्णपणे विसंबून देखील राहत नाहीत. ठाकरेंच्या विरोधात बंड झाले तेव्हा जे सहकारी आपल्यासोबत आले ते भाजपने ताकद लावली तर आपल्याला सोडून जाणार नाहीत याची खात्री त्यांना दिसून येत नाही. त्यामुळेच नवीन चेहऱ्यांना संधी देत आपले एकनिष्ठ लोक तयार करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यातूनच राज्यसभेला ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देत त्यांनी वेगळा संदेश दिला.

विधान परिषदेसाठी शिवसेनेत रांग लागली असताना बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश घडवत त्यांना उमेदवारी दिली. विदर्भात पक्षवाढीसाठी कडू यांची ताकद शिवसेनेला मिळणार आहे. प्रहारच्या जाळ्याचा उपयोग त्यांना होणार आहे. आणि 'स्थानिक'मधून विधान परिषदेसाठी उमेदवारी निश्चित करत असताना वसई-विरारमध्ये सत्ता असलेल्या हितेंद्र ठाकूरांच्या बविआला जवळ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिंदेंनी जाळे टाकून भाजपच्या विरोधात रसद गोळा करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.

भाजपचे स्वप्न अपुरे राहणार...

भाजपला ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकहाती वर्चस्व हवे आहे. त्यासाठी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिकेत शिवसेनेच्या विरोधी भूमिका घेतली होती. कल्याण डोंबिवलीमध्ये ते एकत्र लढले असले तरी त्यांच्यात अंतर्गत स्पर्धा खूप होती.

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये तर दोन्ही पक्षांमध्ये टोकाचा वाद दिसून आला. पालघर जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत देखील ते एकमेकांच्या विरोधात उभे टाकले होते. भाजपचे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील वर्चस्व रोखण्याठी शिंदेंनी 'अप्पां'ना जवळ केले आहे. त्याच माध्यमातून भाजपचे स्वप्न अपुरे ठेवण्याचा त्यांचा डाव असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT