Vidhansabha winter Session
Vidhansabha winter Session  Sarkarnama
विश्लेषण

Vidhansabha winter Session : नागपूर थंडीने गारठण्यापूर्वीच काँग्रेसला भरली हुडहुडी !

Sachin Waghmare

VIdhansabha winter session : राज्यातील काँग्रेसचे (congress) नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांत मोठी मरगळ आलेली पाहावयास मिळत आहे. त्यामुळे एकेकाळची आंदोलन करणारी मंडळी हीच का असा प्रश्न पडला आहे. विशेषतः आजपर्यंत हिवाळी अधिवेशनात काँग्रेसकडून विविध मोर्चे व आंदोलने करून विदर्भातील विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरून पदरात काही तरी पाडून घेण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाल्याचे चित्र दिसत होते. मात्र, हे अधिवेशन अवघ्या पाच दिवसांवर आल्यानंतरही विदर्भातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री यशोमती ठाकूर ही मंडळी गप्प का ? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे.

आगामी हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरला होत आहे. विशेषतः काँग्रेसचे मोठ्या संख्येने आमदार विदर्भातून निवडून आले आहेत. त्यामुळे या प्रश्नाविषयी सभागृहात आवाज उठविण्याची जबाबदारी असताना त्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न ही नेतेमंडळी करीत आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या दोन दिवसांतच लागणार आहे. त्या निकालाचा परिणाम अधिवेशनावर हॊणार असल्याने सर्वांचे लक्ष या अधिवेशनाकडे असणार आहे.

घेरण्याची संधी असताना काँग्रेस गप्पच

राज्याच्या विविध भागांत गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असला तरी मदतीची घोषणा करण्यासाठी आधी सर्व जिल्ह्यांचे पंचनामे करून एकत्रित प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांच्या मदतीवरून घेरण्याची संधी असताना काँग्रेस गप्प का असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

एकही मोर्चाचे आयोजन नाही

राज्यात काँग्रेसला चांगले वातावरण आहे. हिवाळी अधिवेशनकाळात सरकारच्या विरोधात एकही मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले नाही. यापूर्वी काँग्रेसने मोर्चे काढून सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. यापूर्वी अधिवेशनकाळात राज्य सरकारविरोधात काँग्रेसने संघर्ष यात्रा काढली होती. जनआक्रोश मोर्चा काढला होता. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay Waddetivar) ही मंडळी गप्प का ? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित

या अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारला घेरण्याची नामी संधी काँग्रेसकडून दवडली जात असल्याची चर्चा रंगली आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्गाचे अधिवेशनातील घोषणांकडे लक्ष लागले आहे. त्याशिवाय विविध विधेयके या काळात संमत होणार असल्याने हे अधिवेशन गाजणार आहे. मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय या अधिवेशनात अपेक्षित आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटलांनी दोन वेळा उपोषण करून आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यासाठी 24 डिसेंबरची डेडलाइन दिली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाला संधी असताना याकडे दुर्लक्ष होत आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT