Devendra Fadnavis and Jayant Patil
Devendra Fadnavis and Jayant Patil Sarkarnama
विश्लेषण

सर्वांचा डीएनए एक; मग मागासांच्या आरक्षणाला विरोध का? : जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल

संतोष शेंडकर

कोल्हापूर : भाजप (BJP) फार अवघड पक्ष आहे. जे स्वतः काही करता येत नाही, त्यासाठी बुजगावणी उभी करतात. काल परवा एसटीच्या संपात एक बुजगावणं उभं केलं. आता दुसरं बुजगावणं महाराष्ट्रात भोंगा वाजवायला लागलंय. गेल्या २०१९ च्या निवडणुकीत सव्वा दोन टक्के मत त्यांना पडली होती, अशा शेलक्या शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजप व राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली. सगळ्या भारतातल्या जनतेचा डीएनए एक आहे, असं उशिरा का होईना त्यांना कळालं, ही चांगली गोष्ट आहे. पण मागास समाजाच्या आरक्षणांना विरोध का करता? असा सवालही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. (Everyone's DNA is one; So why oppose backward reservation? : Jayant Patil)

कोल्हापूर येथे पार पडलेल्या संकल्प सभेत जयंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. अर्थमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, राजेश टोपे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हा आदी मंत्र्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. धुळ्याची हिमानी वाघ व सुनील गव्हाणे या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचेही कौतुक केले.

गांधी, नेहरू, आंबेडकर यांच्या वाटेने चाललेला देश धर्मांधतेकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. बुध्दांचा व गांधींचा देश होता, ही परिस्थिती २०१४ नंतर बदलायला लागली आहे. जीना यांनी धर्माच्या आधारावर देश स्थापन केला. धर्मांधतेवर देश उभा राहिला, तर कसा रसातळाला जातो, याचं उदाहरण म्हणजे पाकिस्तान. सर्वधर्मसमभाव बाळगणारा भारत कुठे आणि पाकिस्तान कुठे. जातियवादी शक्ती सत्तेत बसल्या आणि सध्या राज्यात सुरू आहे, ते करत राहिल्या तर ही जात्यांध लोकं पाकिस्तानसारखी परिस्थिती आणतील, अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

शरद पवारांवर टिका करणं ही फॅशन झालीय. त्याशिवाय ते चर्चेत येत नाहीत. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे काहीजणांचे आहे. निवडणुकीवेळी समोर पहिलवान नाही, मी पुन्हा येणार असे ते म्हणत होते. आता भारतातल्या जनतेचा डीएनए एक आहे असं त्यांनी सांगितलंय. मी त्यांचं कौतुक करतो. उशिरा का होईना कळालं सगळ्यांचा डीएनए एक आहे. जर डीएनए एक असेल तर मागं राहिलेल्या समाजाच्या आरक्षणास विरोध का करता, ओबीसी समाजाच्या व मराठा सामाजाच्या आरक्षणाला विरोध का. तुमची कृती मागे राहिलेल्या लोकांच्या अडथळ्यांची आहे. जर डीएनए एक असेल तर सगळे अडथळे कसे दूर करायचे माहिती आहे ते दूर करा, असे आवाहन पाटील यांनी फडणवीसांना केले.

मनमोहनसिंग सरकारच्या काळात पेट्रोल साठ रूपये लिटर होतं ते सव्वाशेवर गेलंय. स्टील ऐंशीवर तर सिमेंट चारशेवर गेलंय. घर बांधणीचा खर्च वाढलाय. लोकांची माथी भडकवयाची आणि मूळ मुद्द्यावरून दुसऱ्या मुद्द्यावर न्यायचं ही त्यांची रणनिती आहे. मात्र आपण वज्रमूठ करावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेने जाणारा हा महाराष्ट्र आज शरद पवारांच्या मागे उभा आहे. तो दिल्लीपुढे कधीही झुकणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT