Ganpat Gaikwad, Devendra Fadnavis Sarkarnama
विश्लेषण

Ganpat Gaikwad Firing Case : बंदुकीच्या धाकावर महाराष्ट्रात राज्य करता येणार नाही...!

Sachin Deshpande

Ulhasnagar Firing Case: उल्हासनगर येथे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस स्टेशनमध्ये शिंदे गटाच्या दोघा कार्यकर्त्यांवर केलेला गोळीबार ही अतिशय गंभीर बाब आहे. अशाप्रकारे सत्तारुढ आमदारच कायदा हातात घेत असतील तर राज्यात कायद्याचे राज्य नसल्याचे चित्र निर्माण करते. त्यात गृहमंत्री पद हे भाजपाकडे असल्याने लोकसभा निवडणुकीत त्याचा सर्वाधिक फटका भाजपाला बसण्याची चिन्हे आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करु, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असले तरी भाजपाच्या आमदारांचे हे कृत्य सामान्य जनतेत भीती निर्माण करणारे असेच आहे.

महाराष्ट्रात बंदुकीच्या धाकावर भाजपा(BJP) आमदारांना किंवा भाजपाला राज्य करता येणार नाही,राज्यातील जनता इतकी सुज्ञ नक्कीच आहे.लोकं कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा बिहार होऊ देणार नाही. महाराष्ट्रात बंदुकीच्या धाकावर जमिनीचे तोडगे काढण्याची नवी पध्दत, नवी तपास यंत्रणा, आणि भाजपा आमदारांची स्वतंत्र न्याय व्यवस्था स्थापन होऊच शकत नाही. असे झाल्यास राज्यातील महसूल यंत्रणाच भाजपाच्या ताब्यात द्यावी लागेल.

सामान्य जनतेची अचल संपत्ती भाजपा आमदार म्हणतील त्याच्या नावावर करुन द्यावी लागेल. महाराष्ट्रात भाजपाचे असे किती आमदार आहे जे रिव्हाॅल्व्हरच्या धाकावर जमीन, फ्लॅट, प्लाॅट, शेतीचा तंटामुक्ती करतात. याचा ही शोध तपास यंत्रणांनी घ्यावा. तपास यंत्रणांनी इतक्यावर न थांबता राज्यातील रेती माफिया, गुटखा माफिया आणि भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी भांडाफोड केल्याप्रमाणे जिल्ह्या-जिल्ह्यातील वरळी अड्डे, क्लब नष्ट करण्याची गरज आहे.

भाजपा आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांचा पोलिस स्टेशनमधील गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पोलिस स्टेशनमध्ये शिंदे गटाच्या दोघांवर गायकवाडांचा बेछूट गोळीबार सामान्य जनतेत भीतीचे वातावरण निश्चितच निर्माण करत आहे. राज्यातील सत्तारुढ गटातील हा वाद गोळीबारामुळे समोर आला. असे किती वाद सत्तारुढ महायुतीत शिजत आहे, ज्या वादांचा तोडगा हा गोळीबारातून बाहेर निघेल, अशी विचारणा आता होत आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत महायुतीत सर्वकाही ठिक नसल्याचे आरोपातून उघड केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कल्याणजवळील द्वारली गाव हद्दीतील जमिनीचा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड आणि प्रतिस्पर्धी शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यासह त्यांचे समर्थक पोलिस स्टेशनमध्ये बसले होते. त्याचवेळी अचानकपणे गणपत गायकवाड यांनी त्यांच्या जवळील रिव्हाॅल्व्हरमधून महेश यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केला.

आमदार गायकवाड समर्थकांनी थेट खुर्च्यांनी या दोघांवर हल्ला चढविला. पोलिस स्टेशनमध्ये झालेली ही सर्व घटना निषेध नोंदविण्यासारखी आहे. अशाप्रकारे बंदुकीच्या धाकावर महाराष्ट्रात राज्य करता येणार नाही हे जनतेने भाजपाला ठणकावून सांगण्याची गरज आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT