Aurangabad Municipal Corporation News
Aurangabad Municipal Corporation News Sarkarnama
विश्लेषण

Aurangabad Municipal Corporation: निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्टाचाराचे आरोप ठाकरे गटाला महागात पडणार ?

Jagdish Pansare

Aurangabad Municipal Corporation News : औरंगाबाद महापालिका निवडणुक येत्या दोन-तीन महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना-भाजप विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी Aimim एमआयएमने जाळे टाकले आहे. २०१७ ते २०२० या काळात महापालिकेत शिवसेनेचे नंदकुमार घोडेले हे महापौर होते. खासदार इम्तियाज जलील यांनी नेमकी याच काळत झालेल्या ऐनवेळीच्या २२० ठरावांची माहिती आणि पुरावे जमा करत शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या एमआयएम पक्षाची नजर आता महापालिकेच्या सत्तेकडे लागली आहे. अडीच वर्ष खासदार म्हणून इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी शहर आणि जिल्ह्यात जम बसवायला सुरूवात केली आहे. (Shivsena) राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसकडून मुस्लिम वोट बॅंक बऱ्यापैकी एमआयएमकडे वळल्यामुळे येणाऱ्या महापालिकेत पक्षाच्या नगरसेवकांची संख्या वाढवून थेट महापौर पदावर दावा सांगण्याची एमआयएमची रणनिती आहे.

एमआयएमने पाच वर्ष महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम केले. यात विकासकामांपेक्षा वंदेमातरमला विरोध, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शोक प्रस्तावाा विरोध करत एमआयएमने आपण कित्ती कट्टर आहोत हेच दाखवण्याचा प्रयत्न केला. अनेकदा सत्ताधाऱ्यांच्या सुरात सुर मिसळत आपले हितही साध्य केल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु आता झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणत एमआयएमने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे हेच काल इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दिसून आले.

राज्यात सध्या शिंदे-फडणवीसांचे सरकार असणे आणि नेमकं शिवसेनेच्या महापौर पदाच्या काळातील ऐनवेळीच्या ठरावांचा दीडशे कोटींचा घोटाळा बाहेर येणे हा निव्वळ योगायोग नक्कीच नसावा. एमआयएमवर कायम भाजपची बी टीम असा आरोप केला जातो. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपला अप्रत्यक्षरित्या फायदा पोचवण्यासाठी एमआयएमने हे प्रकरण उकरून काढले की काय? असा सवाल केला जात आहे.

इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी, पिठासीन अधिकारी, नगरसचिव यांच्यावर संगनमताने गैरकायदेशीरपणे २२० ऐनवेळीचे ठराव घेऊन कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. विशेष म्हणजे असा काही घोटाळा झाला आहे तो शासनाकडून चौकशीचे आदेश येईपर्यंत उघड न करण्याची खेळी देखील खेळली. त्यामुळे सत्ताधारी विशेषतःशिवसेना गाफील राहिली आणि आता एमआयएमच्या आरोपांना प्रत्युत्तर देतांना पक्षाची अडचण होतांना दिसते आहे.

इम्तियाज जलील यांनी ज्या काळाचा उल्लेख आपल्या तक्रारीत केला होता, त्यावेळी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले हे महापौर होते. त्यामुळे इम्तियाज यांनी थेट घोडेले यांचे नाव घेतले नसले तरी त्यांनी आपणहून खुलासा करत एमआयएमवर बिनबुडाचे आरोप केल्याचा आणि आरोप सिद्ध न झाल्यास अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला. यावर एमआयएमकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. विशेष म्हणजे इम्तियाज यांच्या आरोपानंतर शिवसेनेकडून तत्कालीन महापौर घोडेले यांच्या व्यतिरिक्त ठाकरे गटाच्या अन्य कुठल्याही नेत्याने तोंड उघडलेले नाही हे विशेष.

दुसरीकडे भाजपचे माजी महापौर बापू घडामोडे यांनी देखील इम्तियाज यांनी उल्लेख केलेल्या काळामध्ये आपण महापौर नव्हतोच, त्यामुळे खुशाल चौकशी करा, अशी भूमिका घेत अंग झटकले आहे. घोडेले यांनी एमआयएम आणि खासदार इम्तियाज जलील यांना उद्देशून इतके दिवस तुम्ही गप्प का बसलात? तुमचे नगरसेवक काय करत होते? या प्रश्नांची देखील उत्तरे मिळणे अपेक्षित आहेत. एकंदरित इम्तियाज जलील यांनी फटाक्याची वात पेटवली आहे, आता त्याचा धमका किती मोठा होतो हे महापालिका प्रशासकांच्या चौकशी अहवालानंतरच स्पष्ट होईल.

औरंगाबाद महापालिकेवर एमआयएमचा झेंडा फडकवण्याचे इम्तियाज जलील यांचे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांना इतर पक्षांच्या मदतीची गरज लागणार आहे. वंचितने त्यांची साथ सोडल्यामुळे ते दुसऱ्या मित्राच्या शोधात आहेत. भाजपशी थेट हातमिळवणी शक्य नाही, मनसेची ताकद मर्यादित आहे, तर शिवसेना आघाडी करून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. अशावेळी महापालिकेवर सत्ता मिळवण्याचे एमआयएमचे स्वप्न कसे पुर्ण होणार? हा खरा प्रश्न आहे.

इम्तियाज यांनी शिवसेनेच्या महापौरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत ठाकरे गटाची अडचण निश्चितच वाढवली आहे. पण महापालिकेत होणाऱ्या प्रत्येक घटनेला जसा सत्ताधारी पक्ष जबाबदार असतो तसाच विरोधी पक्ष देखील असतो. त्यामुळे ऐनवेळीच्या ठरावांमधून दीडशे कोटींचा घोटाळा झाला, तर मग विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमचे नगरसेवक काय करत होते? याचे उत्तर देखील इम्तियाज जलील यांना जनतेला द्यावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT