Maratha Reservation Protest News Sarkarnama
विश्लेषण

Jalna Maratha Protest : मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं, सतराव्या दिवशी सरकारला यश..

Jagdish Pansare

Maratha Reservation News : गेल्या सतरा दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे उपोषण अखेर आज संपले. २९ आॅगस्ट रोजी जरांगे यांनी आपल्या आठ सहकाऱ्यांसोबत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवालीत उपोषण सुरू केले होते. (Jalna Maratha Protest News) १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि या आंदोलनाने उग्ररुप धारण केले. राज्यभरात लाठीहल्ल्याचे पडसाद उमटले आणि अंतरवालीचे आंदोलन राज्य पातळीवर पोहचले.

दरम्यान, जरांगे पाटील व त्याच्या सहकारऱ्यांची समजूत काढण्यासाठी मंत्रीमंडळ जरांगेच्या दारी एकदा दोनदा नाही तर चारवेळा येऊन गेले. पण आधी जीआर आणि मग माघार अशी भूमिका घेत जरांगे यांनी सरकारी शिष्टमंडळाला माघारी धाडत आपण भूमिकेवर ठाम असल्याचे दाखवून दिले होते. (Maratha Reservation) संकटमोचक गिरीश महाजन, संदीपान भुमरे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जून खोतकर हे जरांगे यांची मनधरणी करत होते. सरकारने एक पाऊल मागे घेत मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला. (Jalna) लाठीहल्ल्यानंतर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, ते मागे घेण्याची तयारी दर्शवली.

त्यामुळे जरांगे उपोषण मागे घेतील, असे वाटत होते. पण निजामकाली वंशावळीची अट रद्द करून सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी करत जरांगे यांनी पुन्हा सरकारची कोंडी केली. (Eknath Shinde) चार दिवसांची डेडलाईन संपल्यावर जरांगे यांनी पुन्हा सलाईन, पाणी घेणे बंद केले आणि सरकारचा पुन्हा श्वास कोंडला. महिनाभराची मुदत द्या, निर्णय घेतो असा निरोप पुन्हा सरकारकडून आलेल्या शिष्टमंडळाने जरांगे यांना दिला.

तोही त्यांनी मान्य केला, पण एक महिन्यानंतर सगळ्यांना प्रमाणपत्र द्यावे लागेल, उपोषण मागे घेतो पण मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे, ही अट घातली. ती ही मान्य झाली, काल मुख्यमंत्री येणार म्हणून अंतरवाली सराटीत तयारी झाली आणि अचानक दौरा रद्द झाला. सरकार आपली चेष्टा करतयं का? असा सवाल जरांगे यांनी माध्यमांसमोर केला. दरम्यान रात्री उशीरा मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भुमरे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तब्बल तीन तास जरांगे यांच्याशी चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांची भूमिका पटवून दिली. ती पटल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली. जरांगेंचा हा निर्णय जेव्हा मुख्यमंत्र्यांना कळाला तेव्हाच, आज सकाळी त्यांचे हेलिकाॅप्टर मुंबईहून अंतरवालीला जाण्यासाठी झेपावले. सतरा दिवसांपासून झालेली कोंडी फोडण्यात अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारला यश आले. अंतरवालीत सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री दाखल झाले. जरांगे यांच्याशी आधी पंधरा मिनिटे चर्चा केली आणि ज्युस पाजत त्यांचे उपोषण संपवले. मुख्यमंत्री आज उपोषण संपवूनच माघारी परतणार असा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.

जरांगे यांचे उपोषण किती प्रमाणिक आहे, आणि आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काय प्रयत्न करत आहोत, हे शिंदे यांनी उपस्थितांना सांगत महिनाभरात मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्राबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. याशिवाय मराठा समाजाला मिळालेले आरक्षण जे सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, ते कसे टिकेल यासाठी देखील प्रयत्न करू, असा शब्द शिंदे यांनी दिला. त्यामुळे सतरा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सरकारविरोधात कुठलीही घोषणाबाजी न होता, विरोध न दर्शवता मागे घेतले गेले.

सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या प्रयत्नांचे तर हे यश आहेच, पण अंतरवालीत येऊन मुख्यमंत्र्यांनी जो विश्वास जरांगे पाटील, त्यांचा सहकारी आणि राज्यातील मराठा समाजाला दिला तोही तितकाच महत्वाचा होता. मराठवाडा मुक्तीसंग्रमा दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरात होणारी मंत्रीमंडळ बैठक आणि ध्वजारोहण यापुर्वी हे उपोषण मागे घेतले जावे, यासाठी सरकारने आपली प्रतिष्ठापणाला लावली होती. त्यामुळे गेल्या सतरा दिवसांपासून गजबजलेली अंतरवाली सराटी आता किमान एक महिना तरी शांत राहणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT