Shivsena UBT Kolhapur Sarkarnama
विश्लेषण

Shivsena UBT : गेमवर गेम! कोल्हापूर शिवसेनेतील हे वाद नवे नाहीत, इथं प्रत्येकाने एकमेकांचा काटा काढलाय

Kolhapur Shivsena UBT : 15 ते 20 वर्षांपूर्वी याच जिल्हाप्रमुख पदावरून शिवसेनेत ठिणगी पडली होती. सुरेश साळोखे आमदार असताना विनायक साळोखे आणि कै. रामभाऊ चव्हाण यांच्यात याच पदावरून खासबाग येथील शिवसेना कार्यालयात हाणामारी झाली होती.

Rahul Gadkar

Kolhapur : कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील जिल्हाप्रमुख म्हणून रविकिरण इंगवले यांची निवड करण्यात आल्यानंतर शिवसेना फुटली. शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्यासह दक्षिण विधानसभा प्रमुख हर्षल सुर्वे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता, पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता केलेली निवड आम्हाला मान्य नसल्याचं सांगत या दोघांनीही राजीनामा दिला. मात्र जिल्हाप्रमुख पदावरून कोल्हापुरातील शिवसेनेत असलेला हा वाद नवा नाही. आतापर्यंत जिल्हाप्रमुख पदावरून प्रत्येक नेत्याने एकमेकांचा काटा काढला आहे. त्यामुळेच आजही शिवसेनेला दोन गटात पाहता येतं.

15 ते 20 वर्षांपूर्वी याच जिल्हाप्रमुख पदावरून शिवसेनेत ठिणगी पडली होती. सुरेश साळोखे आमदार असताना त्यांच्या काळात विनायक साळोखे आणि कै. रामभाऊ चव्हाण यांच्यात याच पदावरून खासबाग येथील शिवसेना कार्यालयात हाणामारी झाली होती. त्यावेळी जिल्हाप्रमुख रामभाऊ चव्हाण हे झाले. त्याचवेळी शहर प्रमुख म्हणून संजय पवार यांची निवड करण्यात आली होती. तर सध्याचे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे विद्यार्थी घटनेतून पुढे आले होते. मात्र नंतरच्या काळात विधानसभा निवडणुकीत रामभाऊ चव्हाण यांना कोल्हापूरमधून उमेदवारी हवी होती. मात्र त्यावेळी त्यांना डावलण्यात आले.

त्यामुळे नाराज झालेल्या रामभाऊ चव्हाण यांनी शिवसेनेला रामराम ठोकत आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षातून निवडणूक लढवली. त्याचवेळी जिल्हाप्रमुख म्हणून संजय पवार यांची निवड करण्यात आली. पण नंतरच्या काळात पक्षवाढ शाखा बांधणी त्यावरून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि संजय पवार यांच्यात बिनसले. तब्बल दहा वर्षे हे दोन गट स्वतंत्र कार्य करत राहिले. शिवसेनेतील संजय पवार गट आणि क्षीरसागर गट असे दोन गट अस्तित्वात होते.

इतर पक्षातील संघर्ष पेक्षा या दोन गटातीलच संघर्ष अधिक शिवसेनेसाठी धोक्याचा ठरला. त्याचा फायदा इतर पक्षातील नेत्यांनी उचलला. आमदार राजेश क्षीरसागर यांनी संजय पवार यांना शह देण्यासाठी दुर्गेश लिंग्रस, यांना आपल्या बाजूने घेतले. मात्र त्यानंतरच्या काळात ही लिंग्रस आणि शिरसागर यांच्यात बिनसले. त्याच संधीचा फायदा घेत पवार यांनी घेत लिंग्रस यांना सोबत घेतले. यावेळी त्यांना शहर प्रमुख पदाचा शब्द देण्यात आला होता.

मात्र आमदार राजेश क्षीरसागर यांनी रविकिरण इंगवले यांना सोबत घेऊन इंगवले यांना शहर प्रमुख केले. पुन्हा एकदा क्षीरसागर हे संजय पवार यांच्या वरचढ ठरले. पण नंतरच्या काळात इंगवले आणि शिरसागर यांचे देखील खटके उडाले. रविकिरण इंगवले यांनी संजय पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. त्यामुळे शिवसेनेतील आमदार क्षीरसागर गट एकाकी पडला. अंतर्गत मतभेद झाल्यामुळे हे दोन गट एकमेकांचे राजकीय शत्रू बनले.

पण राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर शिंदेंच्या सोबत राहण्याचा आमदार राजेश क्षीरसागर यांनी निर्णय घेतला. तर संजय पवार रविकिरण इंगवले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला. यानंतरच्या काळात देखील क्षीरसागर यांच्यावर टीका करण्याची संधी पवार आणि इंगवले यांनी कधीच सोडली नाही. पण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर संजय पवार आणि शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांच्यातच खटके उडाले.

इकडे महायुतीत क्षीरसागर गेल्याने शिवसेनेला चांगले दिवस आले. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील अंतर्गत मतभेदामुळे दुफळी निर्माण झाली. जिल्हाप्रमुख पदावरून इंगवले आणि संजय पवार यांच्यात पुन्हा एकदा अंतर्गत संघर्ष सुरू झाला. त्यात इंगवले यांनी संजय पवार यांच्यासह अनेकांना पक्षीय विरोधकांना अस्मान दाखवले.

ठाकरेंच्या शिवसेनेला वर्चस्ववादाचा कलंक

ठाकरेंच्या शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या जिल्हाप्रमुख शहराध्यक्ष पदावरून इतर पक्षांच्या विरोधात लढा देण्यापेक्षा एकमेकांच्यातच लढा सुरू राहिला आहे. अंतर्गत मतभेद, यातील वर्चस्ववाद हाच कळीचा मुद्दा प्रामुख्याने राहिला आहे. त्याला आर्थिक गोष्टीही कारणीभूत आहेत. त्यामुळे पक्षातील वर्चस्व वाद पुण्यासाठी मी म्हणेल तीच पूर्व दिशा, सोईस्कर भूमिका शहराध्यक्ष शहर प्रमुखांनी घेतलेली दिसते. त्यामुळे त्यांना हे मान्य नव्हतं त्यांनी स्वतंत्र चूल मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

इंगवले यांना आप्पांचा आशीर्वाद

आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेतील त्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्यामागे आप्पा नावाचा हात आहे. मातोश्री आणि कोल्हापूर यांच्यातील मधला दुवा म्हणजे आप्पा होय. आतापर्यंत जे जे जिल्हाप्रमुख झाले त्यांच्यामागे आप्पांचा हात होता. आप्पांनी सेटिंग लावली की काम झाले. हीच भावना इतर पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. काही दिवसांमध्ये संजय पवार आणि या आप्पांचे अंतर्गत मतभेदामुळे बिनसले. त्यामुळे आप्पांनीच थेट पवार यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आप्पांच्या मदतीने इंगवले यांनी थेट मातोश्री गाठली. आणि मातोश्रीचा आशीर्वाद घेत कोल्हापुरातील जिल्हाप्रमुख बनले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT