Vinay Kore, Sadabhau Khot Sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024 : वाजवा रे वाजवा! घटकपक्ष बनले वाजंत्री, लोकसभेआधी महायुतीत वाढली खदखद

Mahayuti : महायुतीमध्ये जवळपास 16 पक्ष असून निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यातील खदखद समोर येऊ लागली आहे.

Anil Kadam

Sangli News : आम्ही काय बँडवाले आहोत काय, आम्हाला लग्न सराई सुरू झाल्यावरच बोलविले जाते, हे विधान होते रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांचे. महायुतीच्या मेळाव्यातच त्यांनी आपली खदखद मांडली होती. केवळ त्यांच्या रयत आघाडीची ही अवस्था नसून, महायुतीतील सर्वच घटकपक्षांची तशीच अवस्था असल्याचे चित्र आहे. लवकरच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. केंद्रात आणि राज्यात आपलाच पक्ष येणार असे प्रत्येक पक्षाला वाटत असले तरी भाजप मात्र देशात आणि राज्यात वेगळाच अजेंडा राबवत आहेत. त्यामुळे घटक पक्षांना न्याय मिळणार का? या कारणामुळे अस्वस्थता पसरल्याचे चित्र दिसत आहे. (Lok Sabha Election 2024)

राज्यात सत्ताधारी महायुतीच्या (Mahayuti) विरोधात महाआघाडी अशी लढत होणार आहे. महायुतीमध्ये जवळपास 16 घटकपक्षांचा समावेश आहे. यामध्ये आरपीआय आठवले गट, रयत क्रांती संघटना आणि जन सुराज्यशक्ती, संघटना या प्रमुख पक्षांचा समावेश आहे. 1995 पासून भाजपने (BJP) आपले हातपाय राज्यात पसरायला सुरूवात केली, शिवसेनेला (Shiv Sena) सोबत घेवून 1995 मध्ये भाजप-शिवसेना सरकार राज्यात पहिल्यांदा सत्तेत आले. त्यावेळी भाजपने शिवसेनेचा उपयोग शिडीसारखा करून घेतला. आज शिवसेनेची अवस्था काय आहे, हे संपूर्ण राज्याला माहित आहे. भाजपला ज्या ज्या वेळी गरज पडली त्यावेळी त्यांनी राज्यातील घटकपक्षांना चुचकारले, प्रसंगी त्यांना विधान परिषदेवर घेवून आमदारकी दिली. केवळ आमदारकी दिली नाही तर मंत्रिपदही दिले.

2014 च्या मोदी लाटेत कोल्हापूर जिल्हयातील स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपबरोबर गेली. याचा फायदा राजू शेट्टींना झाला, लोकसभेवर (Lok Sabha) ते प्रचंड मतांनी निवडून आले. पुढे विधानसभेलाही स्वाभिमानीचा फायदा भाजपने करून घेतला. स्वाभिमानीचे स्टार प्रचारक सदाभाऊ खोत यांनी राज्यात भाजपचे वातावरण चांगलेच तापवले, त्याचा फायदा सदाभाऊंना आमदारकी मिळण्यात झाली. पुढे सदाभाउंना मंत्रिपदही मिळाले, त्यांच्याबरोबर महादेव जानकर, विनायक मेटे यांनाही आमदारकी आणि मंत्रिपदाची लॉटरी लागली. रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले, त्यावेळी भाजपसोबत केवळ शिवसेना हाच मोठा पक्ष होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या रूपाने भाजपलच्या गोटात आला आहे. राष्ट्रवादीचीही तीच अवस्था झाली आहे. अजित पवार यांनी पक्ष फोडून भाजपशी सलगी केली आहे. काँग्रेसची अवस्था राज्यात फारच केविलवाणी आहे. आजच्या घडीला राज्यात एकही काँग्रेसचा खासदार नाही. बाकीच्या घटकपक्षांचीही तीच अवस्था आहे. भाजपला केवळ लोकसभेला घटक पक्षांची गरज आहे. आता मूळ प्रश्न आहे तो या घटकपक्षांना खरोखर न्याय मिळणार काय. कारण शिंदे गट आणि अजित पवार गट आणि भाजप हे गेल्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले होते.

आता पहिली पंचाईत आहे ती, उमेदवारी देण्याची. कारण शिंदे गट आणि अजित पवार गट यांना त्यांच्या ताकदीच्या जोरावर लोकसभेत तिकीट द्यावे लागणार आहे. यामध्ये भाजपमध्ये मोठी नाराजी पसरण्याची शक्यता आहे. उदाहरण द्यायचे झाले तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाटणीला आहे. येथे विद्यमान खासदार धैर्यशील माने आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत जागा सोडावी लागणार आहे. परंतु येथे भाजपतर्फे प्रकाश आवाडे यांचे पूत्र राहूल आवाडे, माजी आमदार हाळवणकर, रयत आघाडीचे सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी मागितली आहे. यांचे कमी की काय विरोधी राजू शेट्टी यांनाही भाजपने चुचकारल्याची चर्चा आहे. त्यामुळे केवळ घटक पक्षच नाही तर भाजपमधील नेतेही नाराज होण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, माजी मंत्री सदाभाऊ योत यांची रयत क्रांती शेतकरी संघटना, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार विनय कोरे यांची जनसुराज्य शक्ती यांची ताकद आहे. त्यांच्या ताकदीचा वापर भाजपने वेळोवेळी करून घेतला आहे. सध्या राजू शेट्टी या महायुतीपासून दूर आहेत. परंतु त्यांनाही भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून उमेदवारीसाठी फोन जात आहेत. शेट्टींनी याचा इन्कार केला असला तरी अजून पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. सदाभाऊंनाही खासदारकीचे स्वप्न पडू लागले आहेत. त्यामुळे त्यांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

आता यामध्ये भर पडली आहे ती शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची. या दोन्ही गटांनाही आमदार, खासदारकीचे स्वप्ने पडू लागली आहेत. या घटकपक्षांनी गेल्या आठवड्यात झालेल्या मेळाव्यात आपली व्यथा बोलून दाखवली आहे. सदाभाऊंनी तर आम्ही काय बँडवाले आहोत काय. केवळ लग्नसराईतच आम्हाला बोलावले जाते, मुंगीही हत्तीचा पराभव करू शकतो, असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यामुळे घटकपक्षांची अवस्था महायुतीमध्ये काय आहे, हे दिसून येते.

लहान पक्षांची गरज संपली

शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे प्रादेशिक पक्ष भाजपसोबत गेल्याने लहान पक्षांचे काय असा प्रश्न आहे. सदाभाऊंची रयत क्रांती संघटना, महादेव जानकर यांचा रासप, आरपीआय आठवले गट हे एकेकाळी भाजपच्या खास मर्जीतले होते. त्यांना सत्तेत सामावून घेउन त्यांना खूश करण्याचा प्रयत्न झाला होता. कारण त्यावेळी भाजपला लहान-लहान पक्षांची गरज होती. परंतु आता ही गरज संपली की काय, असेच चित्र आहे. सत्तेत सहभागी होवून या पक्षांनी आपले उपद्रव्य मूल्य गमावून बसले आहेत. त्यांची भिती आता कोणालाच उरली नाही. मोठ्या पक्षांवर दरोडा पडत असताना लहान पक्षांना विचारतो कोण, अशी अवस्था त्यांची सध्या झाली आहे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT