Vikhe Patil, Atul Save, Girish Mahajan, Ravindra Chavan Sarkarnama
विश्लेषण

BJP Politics : आमदारांनो, आता खासदार व्हा..!

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

Maharashtra Political News :

काहीही झाले तरी लोकसभा निवडणूक जिंकायचीच, असा निर्धार भाजपने केला आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्रात 'मिशन 45' चे लक्ष्य ठेवले आहे. त्याचवेळी हमखास विजयासाठी भाजपने काही हुकमी एक्के तयार ठेवले आहेत. या एक्क्यांना विधानसभेऐवजी संसदभवनाचे दरवाजे उघडण्याची तयारी भाजपने केली आहे.

सलग तिसऱ्यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जिंकण्यासाठी महाराष्ट्र हातात हवा, याची जाण भाजपला आहे. म्हणून 'मिशन महाराष्ट्र'चा प्लॅन करत 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने (BJP) ठेवले आहे. त्यासाठी काही आमदारांना खासदार होण्याची तयारी करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या प्लॅननुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्लीत नुकतीच एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आमदार-मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), गिरीश महाजन (Girish Mahajan), अतुल सावे (Atul Save), राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil), हर्षवर्धन पाटील (Harshavardhan Patil), राम सातपुते (Ram Satpute) उपस्थिती होते. या सर्वांना खासदारकीच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे सर्व आमदार तसेच मंत्री त्यांच्या भागात वजनदार असून आर्थिक ताकदीबरोबर या सर्वांकडे मनुष्यबळ तसेच कट्टर कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपची शिवसेनेसोबत युती होती. त्यावेळी त्यांना 23 जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेना 19 जागी विजयी झाली होती. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने भाजपसमोर मोठे आव्हान आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असली तरी त्यांना 48 पैकी निम्म्या जागा जिंकताना मोठी कसरत करावी लागणार आहे, असा अंदाज सांगितला जात आहे. यामुळे आता ताकदवान आमदारांना खासदारकीच्या मैदानात उतरवण्याशिवाय भाजपसमोर पर्याय उरलेला दिसत नाही.

चार विधानसभा, एक क्लस्टर!

भाजपने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने क्लस्टरनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. तीन ते चार विधानसभा मतदारसंघाचं एक क्लस्टर असे भाजपचे प्लॅनिंग आहे. भाजपच्या या रणनीतीमागे आणखी काही विशेष कारणेही असू शकतात. लोकसभा क्षेत्रानुसार तिथले वर्तमान राजकीय समीकरण काय? भाजपची स्थिती कशी आहे? निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपचे बलस्थान काय? कोणत्या कच्च्या दुव्यांकडे लक्ष द्यायचे आहे? याचा सखोल आढावा घेतला जात आहे.

...इसलिए तो सब मोदी को चुनते हैं!

लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून नवा नारा देण्यात आलाय. 'सपने नहीं हकीकत बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते हैं' असा नवा नारा आता भाजपकडून देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने सार्वत्रिक निवडणुकीत स्वबळावर दोनदा बहुमत मिळवले आहे. 2014 मध्ये पक्षाने 'अच्छे दिन आने वाले हैं' असा नारा दिला होता. तर 2019 मध्ये 'फिर एक बार मोदी सरकार' या टॅग लाईनने प्रचार केला होता.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT