Vijay Shivtare Sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election News : लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिंदे-पवार गट भिडले !

Sachin Waghmare

Baramati News : लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या दोन दिवसांतच होणार आहे. त्यापूर्वीच राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी कुणाला मिळणार इथपासून ते कोण कुठून लढणार, याबाबत विविध चर्चा सुरू असताना दुसरीकडे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारा बारामती लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आहे.

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात मात्र या निमित्ताने राजकीय शिमगा सुरू झाला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात शिवराळ भाषेचा वापर केला आहे. त्यामुळे उन्हाळ्याची सुरुवात होत असतानाच राजकीय वातावरण तापले आहे.

शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी बुधवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर त्यांची भूमिका जाहीर केली. या वेळी त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवराळ भाषेत आरोप केले. हे आरोप त्यांना शोभणारे नव्हते. (Lok Sabha Election News)

या वेळी शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटताना त्यांच्या तोंडी न शोभणारी भाषा वापरली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही, ५० वर्षे आम्ही तुम्हाला निवडून देतो आहे. ‘तू कसा निवडून येतोस तेच पाहतो’, असे म्हणणाऱ्या अजित पवार यांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा इशारा दिला. त्यांनी केलेल्या या आरोपामुळे महायुतीमध्ये आतापर्यंत सर्व काही सुरळीत चालले आहे असे वाटत असतानाच शिवतारेंच्या अशा वागण्याने ठिणगी पडली आहे. त्यामुळे महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गट यानिमित्ताने आमने-सामने आले आहेत.

दुसरीकडे या वेळी शिवतारे यांनी टीका करताना सुनेत्राताई पवार यांचे काय सामाजिक कार्य आहे? त्यांना बारामतीच्या लोकांनी मतदान केले पाहिजे? असा वादग्रस्त प्रश्न उपस्थित केला. याचा समाचार घेताना, २०१४ मध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान होते? तरी पण कल्याण मतदारसंघातील जनतेने मतदान करताना, विचारायला हवे होते का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी उपस्थित करीत शिवराळ विजय शिवतारे यांच्याविरोधात शिवसेना कोणती कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे या प्रश्नांचे स्पष्टीकरण काय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही दिवसांपूर्वीच शिवतारे यांनी बारामती लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कल्याण मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा इशारा माजी खासदार आनंद परांजपे यांनी दिला होता. त्यामळे हा वाद पेटणार याचा अंदाज आला होता. मात्र, त्याकडे महायुतीमधील तीनही पक्षाने दुर्लक्ष केल्याने आता हा वाद शिगेला पोहाेचला आहे.

दुसरीकडे या वादात आता विजय शिवतारे यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाने जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवरून एक पोस्ट करीत शिवतारेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंना आवरावे. त्यांनी बोलण्यात कळस केला आहे. महायुतीसोबत राहून जर अजितदादांविरुद्ध बोलण्याचा उन्मत्तपणा कोण करणार असेल, तर आमचाही नाईलाज होईल, अशा शब्दांत सुनावत मिटकरी यांनी या वादात उडी घेतली आहे.

दुसरीकडे या सर्व प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी आता महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपने पुढाकार घेतला आहे. याबाबत महायुतीच्या घटक पक्षाची लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असून, त्या बैठकीत या वादावर चर्चा होणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. त्यासोबतच या प्रकरणी शिवसेना नेते विजय शिवतारे यांची बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढण्याची घेतलेली भूमिका बदलतील, असा विश्वास व्यक्त करीत या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष घालणार आहेत.

येत्या दोन दिवसांत फडणवीस हे विजय शिवतारे यांची भेट घेऊन या वादावर तोडगा काढतील, असा विश्वास ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mhajan) यांनी दाखवला आहे. त्यामुळे आता महायुतीमधील तीन घटक पक्ष समन्वय राखण्यासाठी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

या सर्व दिवसभरातील प्रकारानंतर विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी चर्चा करण्यासाठी उद्या मुंबईला बोलावले असल्याचे समजते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिवराळ भाषा करणाऱ्या विजय शिवतारे यांना मुख्यमंत्री काय सुनावणार व महायुतीमध्ये पडलेल्या ठिणगी कशी शांत करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

R

SCROLL FOR NEXT