Bharti Pawar, Raosaheb Danve, Kapil Patil, Pankja Munde Sarkarnama
विश्लेषण

BJP Analysis : भाजपचे चार मंत्री 'डेंजर झोन'मध्ये, कुठे कांदा, कुठे मराठा आरक्षण रडवणार

अय्यूब कादरी

Maharashtra Lok Sabha Results : भाजपने रिंगणात उतरवलेले दोन केंद्रीय मंत्री आणि दोन राज्यमंत्री पिछाडीवर पडले आहेत. कांदा निर्यातबंदी, मराठा आरक्षणाचा वाद आणि विरोधी पक्षांची फोडाफोडी या मंत्र्यांच्याही अंगलट येणार, असे चित्र दिसत आहे.

महाराष्ट्राला फोडाफोडी, गद्दारी आवडत नाही. मिशन 45 पूर्ण करण्यासाठी विरोधी पक्षांची फोडाफोडी, विरोधी नेत्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावला. इतके सारे करून राज्यातील काही मंत्र्यांना रिंगणात उतरवले खरे, मात्र मतदारांकडून भाजपला (Bjp) सडेतोड उत्तर मिळाल्याचे दिसत आहे. भाजपने रिंगणात उतरवलेले राज्यातील दोन आणि केंद्रातील दोन मंत्री बॅकफुटवर आले आहेत.

दिंडोरी मतदारसंघ सुरवातीपासून चर्चेत राहिला. या मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार या केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी सुरवातीला पक्षातून विरोध झाला. दिंडोरी मतदारसंघाच आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. दिंडोरी मतदारसंघात 80 टक्के क्षेत्र काद्यांचे आहे.

सरकारने गेल्यावर्षी अनाठायी भीतीमुळे कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आणि या मतदारसंघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पोटावर पाय पडला. या शेतकऱ्यांची आर्त हाक सरकारच्या कानावर पडली नाही. निर्यातबंदी कशी चुकीची आहे, हे भारती पवार याही केंद्रीय नेत्यांना पटवून देऊ शकल्या नाहीत.

या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची जाहीर सभा झाली. त्या सभेत मोदी यांनी कांद्याच्या प्रश्नावर एकही शब्द उच्चारला नाही. एका शेतकऱ्याने कांद्याला भाव द्या, अशा घोषणा त्यांच्या समोर दिल्या, मात्र मोदी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्या शेतकऱ्याला सभास्थळावरून ताब्यात घेण्यात आले.

काहीही झाले तरी मतदार आपल्या पाठिशी राहतील, असा भाजपचा त्यामागे विश्वास होता. आपल्याला गृहीत धरून चालणार नाही, हे मतदार दाखवून देणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. भारती पवार यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांच्याशी होत आहे.

भारती पवार (Bharati Pawar) यांच्यासह राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि रावसाहेब दानवे हेही बॅकफूटवर आल्याचे दिसत आहे. मुनगंटीवार यांच्यावर काँग्रेसच्या भारती पवार यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नव्हतीच, असे विधान मुनगंटीवार यांनी एक्झिट पोलनंतर केले होते. भिवंडी मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे वरचढ ठरत आहेत.

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या जालना मतदारसंघावर मराठा आरक्षणाचा प्रभाव आहे. काँग्रेसनेही दानवे यांच्या तोडीस तोड असलेले कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे. दानवे यांच्याप्रमाणेच काळे यांचाही जनसंपर्क दांडगा आहे. कांदा, मराठा आरक्षण, भाजपने केलेली पक्षांची फोडाफोडी या बाबी या मंत्र्यांच्याही अंगलट येत असल्याचे चित्र दिसत आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT