MVA alliance dispute : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधुम सुरू असली तर सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. अद्याप राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली नसली तरी पुढील काही दिवसांत निवडणुकीचे बिगुल वाजेल, हे निश्चित. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, यावेळची निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. युती, आघाडीच्या राजकारणाने ही निवडणूक खऱ्या अर्थाने ढवळून निघणार आहे.
मुंबईतील निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठाकरे बंधूंच्या पक्षांची मोट बांधण्याच्या काम जोरदारपणे सुरू आहे. जागावाटपाची प्राथमिक फेऱ्याही सुरू असल्याचे समजते. या वाटाघाटी सुरू असतानाच काँग्रेसने प्रामुख्याने राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्यास प्रखऱपणे विरोध करत सुरूवातीला एकला चलोची भूमिका घेतली. त्यानंतर आता पक्षाचे नेते बुधवारी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले. त्यांना आपल्यासोबत यावे, यासाठी काँग्रेसचे नेते आग्रही होते. आता ही भेट केवळ त्यांच्यासोबत आघाडीसाठी होती की आणखी काही, हे येणारा काळच सांगेल.
शरद पवार यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या प्रयोगातील त्यांची भूमिका आणि आगामी ठाकरे बंधूंच्या युतीनंतरची राजकीय स्थितीनंतरच्या घडामोडींमध्येही पवारांच्या निर्णयाला महत्व प्राप्त झाले आहे. मुंबईत पवारांच्या पक्षाची फारशी ताकद नसली तरी ठाकरे बंधूंसोबत जाण्यास काँग्रेसला राजी करण्यात त्यांचा शब्द महत्वाचा ठरू शकतो. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन महाविकास आघाडी अस्तित्वात आणण्यासाठी काँग्रेसचे नेतृत्व राजी नव्हते. राज्यातील काही नेत्यांनीही त्याला विरोध केला होता. त्यामुळे दिल्लीदरबारी या आघाडीबाबत निर्णय होत नव्हता.
काँग्रेस नेत्यांच्या मनातील चलबिचल त्यावेळी उघडपणे दिसून येत होती. पण अखेर शरद पवार यांचे राजकीय डाव यशस्वी ठरले आणि काँग्रेसला सोबत घेत त्यांनी महाविकास आघाडी अस्तित्वात आणली. यावेळीही काँग्रेसने मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध केला आहे. याबाबत शरद पवारांच्या पक्षाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र, पक्षाची ताकद पाहता ते ठाकरे बंधूंसोबत जायची त्यांची तयारी असू शकते.
मुंबईत काँग्रेसची ताकद काही भागापुरतीच मर्यादीत आहे. पक्षाचा केवळ एक खासदार तर तीन आमदार आहेत. यापैकी दोन मुस्लिम आमदार आहेत. त्यामुळे मनसेला सोबत घेऊन उत्तर भारतीय मतदारांना न दुखावण्याची पक्षाची भूमिका असावी. आज शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या भेटीबाबत माहिती देताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, लोकशाही आणि संविधान मानणारे आम्ही पक्ष यावेळी एकत्र निवडणूक लढवावी ही आमची अपेक्षा आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही इथल्या नागरी समस्या जसे ट्रॅफिक, खराब रस्ते, शिक्षण, पाणी, प्रदूषण ,महापालिकेतील भ्रष्टाचार या विषयांवर झाली पाहिजे. ही निवडणूक धर्म, जात, भाषा यावर नको. कारण मुंबई हे असे शहर आहे जिथे देशातील सगळ्या राज्यातून लोक येतात, सगळ्यांचा या शहरातील विकासात हातभार आहे.
वर्षा गायकवाड यांनी मनसे का नको, हे स्पष्टच सांगितले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यासोबत २०१९ पासून असलेल्या काँग्रेसला अचानक धर्म आणि जातीची आठवण झाली, हे पटत नाही. भाषेचा मुद्दा सोडला तर उद्धव ठाकरे हेही नेहमीच हिंदूत्वाची भूमिका मांडतात. मात्र, काँग्रेसने त्यांच्यासोबत संसार थाटला होता. आता ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काँग्रेसला जात-धर्माची आठवण का झाली? यामागे आणखी एक कारण असू शकते. दोन्ही ठाकरे बंधूंच्या जागावाटपामध्ये काँग्रेसला अपेक्षित जागा मिळणार नाही, अशीही भीती असेल. काँग्रेसचे खच्चीकरण होईल, उत्तर भारतीय मतदार, मुस्लिम मतदार दूर जातील, अशीही भीती काँग्रेस नेत्यांना असेल.
काँग्रेसची ही भीती रास्त असली तरी बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची झालेली धुळधाण पाहता पक्षाला मुंबईत उत्तर भारतीय मते किती मिळतील, हाही प्रश्नच आहे. मुंबईत खरी लढत ठाकरे बंधू विरूध्द महायुती अशीच होणार आहे. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास ही निवडणूक तिहेरी होईल. पण या आघाडीची ताकद फारशी नसेल, हेही तितकेच खरे आहे. ठाकरेंची शिवसेना दुभंगली असल्याने त्यांचीही ताकद कमी झाली आहे. त्यांनाही मनसेसोबत काँग्रेसची साथ मिळाल्यास बळ मिळू शकते. पण यामध्ये शरद पवारांची भूमिका महत्वाची ठरले.
ठाकरे बंधू-काँग्रेस-शरद पवार अशी आघाडी झाल्यास महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. मुंबई महापालिकेत २२७ जागा आहेत. मागील निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. पण ९० चा आकडा पार करता आला नव्हता. भाजपला त्यांच्यापेक्षा २ जागा कमी म्हणजे 82 जागा मिळाल्या होत्या. आता एकनाथ शिंदेंची शिवसेना त्यांच्यासोबत असेल. त्यामुळे निश्चितच भाजपची ताकद वाढली आहे. परिणामी ठाकरेंसाठी ही लढाई सोपी नाही. याची जाणीव त्यांनाही असेल. त्यामुळे काँग्रेसने एकला चलोचा नारा दिल्यानंतर अग्रलेखातून पुन्हा त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून करण्यात आला होता. मुंबईत पुढील काही दिवसांत मोठा राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये काँग्रेस शरद पवारांसोबत आघाडी करणार की महाविकास आघाडी आणखी विस्तारणार, हे लवकरच स्पष्ट होईल. त्यात पवार महत्वाची भूमिका बजावतील, हे निश्चित.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.