Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi sarkarnama
विश्लेषण

भाजपला तिखट उत्तर द्या, असा सल्ला संजय राऊतांनी दिला खरा.. पण मंत्र्यांना वेगळीच धास्ती

ज्ञानेश सावंत

मुंबई : ठाकरे सरकारवरील भारतीय जनता पक्षाच्या आरोपांना तडाखेबाज उत्तर देऊन मोकळे होण्याचा सल्ला शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला दिला खरा; पण 'जुन्या' आघाडीच्या काळातील कारभार उघड होण्याचे भीतीने दोन्ही काँग्रेसचे काही मंत्री भाजपला अंगावर घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोप-प्रत्यारोपांतून विपरित घडण्याची चिंता या मंत्र्यांना असल्यानेच ते जेमतेम आणि सोय पाहूनच भाजपच्या टिकेला तोंड देण्याची शक्यता आहे. सरकारवरील आरोप हाणून पाडण्याची भिस्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मोजक्याच नेत्यांवर राहणार आहे. त्यात शिवसेनेला ताकदीने लढावे लागणार आहे. सत्तासंघर्षातून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप, तक्रारी, चौकशा आणि थेट कारवायांचे सत्र सुरू आहे. या मोहिमेतून सरकार कोसळण्याची आशा भाजपला असल्याचे बोलले जात आहे. तर कारवायांना तोंड देत सरकार म्हणजे, महाविकास आघाडी भक्कम ठेवण्यात तिन्ही घटक पक्षांना यश आले आहे. त्यामुळे कातावलेल्या भाजपने मंत्र्यांची यादी करीत, त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशा आणि कारवाईचा मार्ग अवलंबल्याचे दिसत आहे.

राज्यात गेले वर्षभर रोज नव्या आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगू लागला आहे. भाजपविरोधात आक्रमक असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आरोपांना उत्तरे देण्याची समज सरकारमधील मंत्र्यांना दिली आहे. 'नुसतेच मंत्रीपदाच्या खुर्चीत बसून न राहाता आरोपांना उत्तरे द्या. ही कामे आम्ही दोन-तीन मंडळीच करीत असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. यात शिवसेनेची जबाबदारी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून राऊत आणि अन्य काही मंडळी करीत आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक हे भाजपला जशास तसे उत्तर देत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात वगळता अन्य कोणी आक्रमकपणे पुढे येताना दिसत नाही.

या तिन्ही पक्षांच्या तुलनेत विरोधकांमधील आमदारापासून बडे नेतेही रोज नवनव्या बाबी उकरून काढत, ठाकरे सरकारला घेरत आहेत. परिणामी विरोधकांच्या जिभेला धार येत असल्याचे स्पष्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने या सरकार आणि भाजपमधील चढाओढ वाढत जाणार आहे. त्यात चौकशा कारवाया वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांपासून सर्वच मंत्र्यांना आता ताकदीने बोलावे लागण्याची गरज राऊत यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मंत्र्यांना सडेतोड भाषेत उत्तरे देण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याचे दिसत आहे.

देशाच्या राजकारणात प्रचंड दबदबा असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यात कोणत्या स्थानिक नेत्यांवर फारसे बोलत नाहीत. एखाद्या विषयांत अमुक नेता तेवढ्या क्षमतेचा नसल्याचे सांगून पवार विरोधी नेत्यांवर बोलण्यास टाळतात. मात्र, अलीकडच्या काळात पवारही आक्रमक झाल्याचे दिसत आहे. पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या दोन आमदारांच्या कारभारावर तोफ डागत पवार यांनी यापुढच्या काळात कठोर शब्दांत हल्ला चढविण्याची रणनीती अवलंबिल्याचे दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT