Nana Patole
Nana Patole sarkarnama
विश्लेषण

नाना पटोलेंनी 51 जणांचे राजीनामे घेऊनच शिर्डी सोडली...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : एक व्यक्ती-एक पद या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आणि पूर्णत्वासही नेला. प्रदेश काँग्रेसच्या शिर्डीत पार पडलेल्या दोन दिवसांच्या नवसंकल्प कार्यशाळेत त्यांनी पदाधिकाऱ्यांना याबाबत सुनावले होते. त्यांच्या आदेशानंतर पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पाठवून दिले. (51 congress office bearers follows one man one post rule)

यानुसार आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर शहराध्यक्षपदाचा, राजेंद्र मुळक यांनी नागपूर ग्रामीणच्या अध्यक्षपदाचा, सुरेश वरपुडकर यांनी परभरणीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आज शिर्डी येथे दिला. नाशिक शहरचे शरद आहेर यांचाही राजीनामा पडला. नसीम खान, वझाहत मिर्झा यांनी आधीच राजीनामे दिले होते. 51 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे येणे, हे मोठे यश असल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.

या शिबिराविषयी बोलताना पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील म्हणाले की राजकीय, सामाजिक मुद्द्यांसह विविध मुद्द्यांचा सखोल उहापोह करण्यात आला. या शिबिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली व त्यातून एक महत्वाचा दस्तावेज तयार झाला आहे. हा दस्तावेज जाहीरनाम्यासह विविध योजना राबवण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. काँग्रेस पक्ष लोकशाहीला माननारा पक्ष असल्याने या शिबिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी मोकळेपणाने व स्पष्टपणे मते मांडली व ती मते विचारात घेण्यात आली. अशा पद्धतीची लोकशाही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे का?

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व राज्याचे सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

समारोपप्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, दोन दिवसाच्या या शिबिरात उदयपूर घोषणापत्राची अमंलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून एक व्यक्ती एक पद नियमानुसार या शिबिरात ५१ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून ही पक्रिया पुढेही चालूच राहणार आहे. सहा विभागांनी केलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्याचे कामही केले जाणार आहे. सरकार व पक्ष संघटना यांच्यात समन्वय साधणे, संघटन वाढवणे यावरही विस्तृत चर्चा झाली आहे. केंद्रातील भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून शेतकरी आंदोलनावेळी शेतकऱ्यांचा नक्षलवादी, दहशतवादी आंदोलनजीवी म्हणून अपमान केला त्याचा निषेधही या शिबिरात करण्यात आला. फडणवीस सरकारने शिवाजी महाराजांच्या नावाने फसवी शेतकरी कर्जमाफी योजना राबवली व शिवाजी महाराजांचाही अवमान केला. महाविकास आघाडी सरकारने मात्र सत्ता येताच दिलेले आश्वासन पूर्ण करत सरसकट कर्जमाफी दिली. जनतेला दिलेला शब्द पाळला. हे सरकार शेतकरी, कामगार, दलित, वंचित समाजाच्या हिताचे रक्षण करणारे सरकार आहे.

यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, शिर्डी कार्यशाळेतील दोन दिवसाच्या मंथनातून जे सार निघाले आहे त्याचे एक दिशादर्शक पुस्तक बनू शकते. आता याची अंमलबजाणी करायची आहे. १०० दिवसांचा कार्यक्रम बनवावा लागणार आहेत. त्यानंतर त्याचा उपयोग आमागी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाला निश्चितच होईल. महाराष्ट्र राज्य स्वतंत्र होण्याअगोदर शिर्डीत यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक अधिवेशन पार पडले होतेय या अधिवेशनात त्यावेळचे मातब्बर नेते सहभागी झाले होते हे अधिवेशन काँग्रेससाठी लाभदायी ठरले तसेच हे अधिवेशनही काँग्रेस पक्षाला फलदायी ठरेल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त करून ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडावी यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT