Narendra Modi And Chhatrapati Shivaji Maharaj.jpg Sakarnama
विश्लेषण

Narendra Modi: PM मोदी अन् शिवराय..! शिवस्मारकाचं भूमिपूजन ते राजकोट किल्ल्यावरील कोसळलेला पुतळा

Datta Deshmukh

Beed News : सत्तेवर येताना भाजपने महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि देऊ मोदींना साथ अशी आरोळी ठोकली. कोट्यावधी शिवप्रेमींनी मतांचे दान भाजपच्या झोळीत टाकले. महाराष्ट्रातील युतीच्या नेत्यांसह राज्यात आल्यानंतर प्रत्येकवेळी मोदींच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असणारच.

पण, त्यांनी जलपूजन आणि भूमिपूजन केलेले अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारकाची अद्याप वीटही का चढली नाही आणि त्यांनी 8 महिन्यांपूर्वी अनावरण केलेला शिवरायांचा पुतळाही चार दिवसांपूर्वी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) हीच शिवाजी महाराजांवरील भक्ती का, असा प्रश्‍न शिवप्रेमींना सतावत आहे.

मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे महायुती आणि भाजपचे शिलेदार देत असलेली उत्तरे कोणत्याही शिवप्रेमींना पटणारी नाहीत. देशातील पंतप्रधानांसारख्या महत्वाच्या व्यक्तीने एखाद्या ठिकाणाचे भूमिपूजन, उद॒घाटन किंवा अनावरण करणे ही साधी बाब नाही. त्यात महाराज महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील कोट्यावधी शिवप्रेमींचे श्रद्धास्थान आहेत. त्यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे असे समर्थन होऊच शकत नाही. त्यातला कुठलीही तर्कसंगती नाही.

केवळ सत्ता आणि मेजॉरिटीच्याा जिवावर ‘रेटून बोल’ ही रणनीती आहे. तसा, पुतळा कोसळणे हा अपघात असला तरी त्याची निर्मिती, उभारणी आणि पंतप्रधानांसारख्या व्यक्तीच्या हस्ते अनावरण करायचे असल्याने त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तांत्रिक बाबी साध्या सुध्या असत नाहीत. असे सगळी प्रक्रिया झाल्यानंतर पुतळा कोसळतो आणि मग त्याचे विशुद्ध पद्धतीने समर्थन केले जाते. हे फक्त सत्तेच्या जिवावरच हे कोणालाही सांगायची गरज नाही.

मोदी आणि शिवाजी महाराज यांच्याबाबत शेकडो उदाहरणे आहेत. अगदी रायगडावर महाराजांसमोर ध्यानाला बसलेले मोदीही महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यांच्या समर्थक नेत्यांकडून त्यांची त्या तोडीने तुलनाही करण्याचे केविलवाणे प्रयत्न झाले आहेत. दरम्यान, आणखी महत्वाचे म्हणजे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक. तमान शिवप्रेमींच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर, अनेक आंदोलनानंतर राज्यात महायुतीचे 2014 साली सरकार आल्यानंतर यासाठी आंतरराष्ट्रीय शिवस्मारक समितीची स्थापना करण्यात आली. याच निवडणुकीत भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आणि देऊ मोदींना साथ अशी घोषणा केली होती.

विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आपल्या फेसबुक अकाऊंटवर ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ अशी घोषणा देऊन भारतीय जनता पक्षाने निवडणुक लढली व जिंकलीही. हे यश म्हणजे शिवछत्रपतींचा आशिर्वादच आहे. आता सरकार चालवितानाही आम्हाला शिवछत्रपतींचा आशिर्वाद हवा आहे’ अशी पोस्ट लिहलेली आजही कायम आहे. त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठीही ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ नावानेच पीक कर्जमाफी योजना घोषीत केली. परंतु, नियम व अटींच्या मेखा मारुनच. असो.

शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदी स्मारकाची मागणी लाऊन धरणारे व यासाठी विधिमंडळ आणि रस्त्यावरची लढाई लढलेल्या दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांना समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. सरकार स्थापनेच्या दोन वर्षांनी म्हणजे 24 डिसेंबर 2016 साली खुद्द पंतप्रधानांनी अरबी समुद्रात जाऊन जलपूजन केले आणि शिवस्मारकाचे भूमिपूजनही केले.

तसा तो काळ निवडणुकीच्या तोंडावरचा नव्हता. पण भूमिपुजनालाही कारण होतेच. कारण, त्यापूर्वी 2016 च्या ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत महाराष्ट्रभरातील प्रत्येक जिल्ह्यांत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक माेर्चे निघाले होते. त्यामुळे समाजाला दाखविण्यासाठी काही योजनांसह शिवरायांच्या स्मारक हा ठोस मुद्दा होता. आता या घटनेला आठ वर्षे लोटत आहेत. पण, शिवस्मारक दूर अगदी स्मारकाची एक वीटही चढली नाही.

दुसऱ्यांदा सरकार सत्तेवर आले आणि आता तर या स्मारक समितीच्या कार्यालयाचीही पुरती दुरावस्था झाली आहे. दिवंगत मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनीही याबाबत तीव्र भावना व्यक्त करुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहले. आता स्मारकाबाबत भाजप आणि महायुतीचे नेते न्यायालयाकडे बोट दाखवत आहेत.

परंतु, पंतप्रधानांसारखी व्यक्ती जलपूजन, भूमिपूजन करणार असताना प्रोटोकॉलनुसार सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण व्हाव्याच लागतात. जर त्या केल्या नसतील तर मग शिवप्रमेंची शुद्ध फसवणूकच केली असे म्हणण्यास वाव आहेच. आठ वर्षानंतरही जर सर्व परिस्थिती जैसे थे असेल तर पंतप्रधानांच्या कृतीला देशात अशी किंमत का, असा सवालही समोर येतो. शिवाजी महाराज कोट्यवधी शिवभक्तांची आस्मिता आहे.

राजकारण करण्यासाठी, निवडणुकांच्या फंड्यासाठी अनेक गोष्टी आहेत. पण, किमान शिवरायांना तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि महायुतीने असा वापर करु नये अशीच प्रत्येक शिवभक्तांची इच्छा आहे. सत्तांतराला तीन वर्षे झाले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या तोंडी रोजच शिवरायांचे नाव आहे. आता निवडणुकीपूर्वी एकदा तरी शिवस्मारकाबाबत महाराष्ट्राला ठोस सांगावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT