Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024 : शरद पवार, उद्धव ठाकरे संपले; मग PM मोदींच्या सभांचा धडाका कशासाठी?

अय्यूब कादरी

Maharashtra Political News : महाराष्ट्रात विरोधी पक्ष संपला आहे, शरद पवार संपले आहेत, उद्धव ठाकरे संपले आहेत, लोकसभा निवडणुकीच्या आधी सत्ताधारी नेत्यांच्या तोंडून अशी वाक्ये सातत्याने कानावर पडत होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटलेल्यांनी शरद पवारांवर टीका केली, त्या तुलनेत शिवसेनेतून फुटलेल्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेची प्रखरता कैक पटींनी अधिक होती.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीतील दोन महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष फोडण्यात भाजपला यश आले. काँग्रेस फुटली नाही, मात्र अनेक बड्या नेत्यांनी भाजपची वाट धरली. त्यामुळे विरोधक कमकुवत झाले. महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 मतदारसंघांत उमेदवार मिळतात की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र जागावाटप आणि उमेदवार निश्चितीत महाविकास आघाडीने बाजी मारली. याला सांगली मतदारसंघासारखे काही अपवाद आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, असा स्थानिक नेत्यांचा आग्रह होता. तो शिवसेनेला सुटला होता. त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील Vishal Patil यांनी सांगलीत बंडखोरी केली आहे.

महायुतीला नाशिकसारख्या मतदारसंघात अद्यापही उमेदवार जाहीर करता आलेला नाही. हा मतदारसंघ कोणाला सुटणार, हेही निश्चित झालेले नाही. अजितदादा पवारांच्या वाट्याला जितक्या जागा आल्या, त्यातील शिरूर आणि उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघात त्यांना इतर पक्षांतून उमेदवार आयात करावे लागले. महायुतीत सर्वाधिक ससेहोलपट झाली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या शिवसेनेची. भाजपच्या दबावामुळे त्यांना त्यांच्या दोन विद्यमान खासदारांची उमेदवारी कापावी लागली. नाशिकला काय होणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी शिंदेंना रद्द करावी लागली. यवतमाळ - वाशीमच्या पाचवेळच्या खासदार भावना गवळी यांनाही शिंदे यांनी उमेदवारी देता आली नाही.

महाविकास आघाडीने महायुतीला तोडीस तोड असे उमेदवार दिले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार Sharad Pawar , उद्धव ठाकरे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी ठिकठिकाणी सभा घेतल्या आहेत. महायुतीसाठी राज्यातील नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभांचा धडाका लावण्यात आला आहे. येत्या चार दिवसांत पंतप्रधान मोदी यांच्या राज्यात नऊ ठिकाणी सभा होणार आहेत. यापूर्वीही मराठवाड्यासह अन्य भागांत पंतप्रधान मोदी यांच्या सभा झाल्या आहेत. काँग्रेसकडून दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांच्या नांदेड मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारासाठीही पंतप्रधान मोदी यांना सभा घ्यावी लागली आहे.

कोणताही पक्ष कितीही शक्तिशाली असला तरी विजय मिळेपर्यंत तो लढत असतो. विरोधकाला कमकुवत समजून गाफील राहणे महागात पडू शकते. त्यामुळे मोदींनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे, यात आश्चर्य वाटायला नको. असे असले तरीही महाविकास आघाडी कमकुवत होईल, हा सत्ताधाऱ्यांचा अंदाज साफ खोटा ठरला आहे, हे नांदेडमध्ये मोदींना सभा घ्यावी लागली, यावरून स्पष्ट होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान मोदींच्या भाषणांमधून महागाई, बेरोजगारी, शेतमालाला भाव हे अत्यावश्यक, महत्त्वाचे प्रश्न गायब झाले आहेत. या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता ते जे मुद्दे मांडत आहेत, त्यामुळे त्यांना याआधी यश मिळाले आहे. या वेळी काय होईल, मोदींच्या दहा वर्षांच्या सत्तेनंतरही त्यांच्या भाषणात लोकांच्या जीवनमरणाचे प्रश्न येत नाहीत, हे लोकांना आवडेल किंवा नाही, हे पाहण्यासाठी निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. बहुतांश निवडणूक सर्वेक्षणांचा अंदाज पाहिला तर जमिनीवर वेगळी परिस्थिती आहे, अशी भीती तर महायुतीला वाटत नसेल ना, अशी शंका निर्माण झाली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT