Praniti Shinde, Chandrakant Patil
Praniti Shinde, Chandrakant Patil  Sarkarnama
विश्लेषण

Praniti Shinde News : प्रणिती शिंदेंचा 'हौसला सातवें आसमान पर', म्हणून काय ज्येष्ठांचा अवमान करायचा का ?

अय्यूब कादरी

Solapur News : सोलापूरच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौऱ्यात भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा उल्लेख करताना मर्यादेचे पालन केले नाही. प्रणिती यांच्या एकूण व्यक्तिमत्वाबाबत ही बाब हानिकारक ठरण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात कोणता नेता कधी काय बोलेल, याचा नेम राहिलेला नाही. थोडेसे यश काय मिळाले, नेत्यांचा नूर पालटून जातो. त्यांच्या वागण्या-बोलण्यात फरक पडू लागतो. बोलताना तोल सुटतो. महाविकास आघाडीतील नेतेही याला अपवाद राहिलेले नाहीत.

सोलापूरच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचाही असाच तोल सुटला आणि आपल्यापेक्षा ज्येष्ठ असलेले राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांचा त्यांनी अवमानकारक उल्लेख केला. (Praniti Shinde News)

प्रणिती शिंदे यांनी कठिण परिस्थितीवर मात करत विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढणे समजण्यासारखे आहे, मात्र आपल्यापेक्षा ज्येष्ठांचा नकळतपणेही अवमान करण्याची परवानगी त्यामुळे मिळत नाही.

माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या प्रणिती या कन्या आहेत. 'सुशील मनाचा रसिक नेता' अशी सुशीलकुमार शिंदे यांची देशभरात ओळख आहे. सुशीलकुमार यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक चढ-उतार पाहिले. अनेक अपमान सहन केले, अनेक पराभवही सहन केले. त्यांच्या पत्नी म्हणजे प्रणिती यांच्या मातोश्री उज्ज्वला शिंदे यांनाही एकदा पराभव सहन करावा लागला.

सुशीलकुमार शिंदे यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले. त्यांच्यावर वैयक्तिक टीकाही झाली. हातातोंडाशी आलेले मुख्यमंत्रिपद त्यांच्यापासून एकदा हिरावले गेले. इतके सारे होऊनही सुशीलकुमार यांच्या तोंडून एखाद्या नेत्याबद्दल कधीही आक्षेपार्ह शब्द बाहेर पडले नाहीत. त्यांनी कायम संयम पाळला. हे प्रणिती शिंदे यांनाही माहित आहे. त्यांनी वडिलांकडून हे शिकून घ्यायला हवे होते.

प्रणिती शिंदे या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा विजयी झाल्या आहेत. एका निवडणुकीत तर त्यांनी अत्यंत कठीण प्रसंगांवर मात करत विजय मिळवला. त्या निवडणुकीत 'एमआयएम'च्या उमेदवारामुळे त्यांचा विजय होणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. राजकीय कौशल्याच्या बळावर त्यांनी विजय खेचून आणला होता. त्यावेळी विरोधकांनी त्यांच्याविरोधात कुजबूज मोहीम चालवली होती, मात्र त्यामुळे त्या विचलित झाल्या नव्हत्या. त्या प्रणिती शिंदे याच आहेत का, असा प्रश्न त्यांनी केलेल्या चंद्रकांतदादांच्या उल्लेखामुळे उपस्थित होत आहे.

महाविकास आघाडीतील (MVA) मित्रपक्षांना त्यांच्याकडून दिली जाणारी दुय्यम वागणूक नेहमी चर्चेत असते. निवडून आल्यानंतरही ती चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना त्या आता डावलू लागल्या आहेत, असे सांगितले जात आहे. यामुळेही त्यांची अडचण होऊ शकते.

लोकसभा निवडणुकीतही प्रणिती यांनी कौशल्य पणाला लावले होते. या मतदारसंघातून सलग दोनवेळा सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. सुशीलकुमार शिंदे यांनी चार-पाच महिन्यांपासून लेकीच्या विजयासाठी जुळजुळव सुरू केली होती. या वयातही ते गावोगावी फिरत राहिले. भाजपच्या (Bjp) तगड्या यंत्रणेचा सामना करून प्रणिती यांनी निवडणूक जिंकली. त्यांच्या विरोधातील भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी प्रचारादरम्यान सुशीलकुमार शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता.

त्यामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाली होती. राम सातपुते यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याबद्दल वापरलेली भाषा प्रणिती शिंदे यांनाच नव्हे तर समाजालाही आवडली नव्हती. मग आता प्रणिती शिंदे यांनी चंद्रकांतदादा यांच्याबद्दलही वापरलेला शब्द समाजाला आवडणार नाही, याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती.

पक्षीय राजकारणाचा भाग पाहिला तर चंद्रकांतदादा हे प्रणिती शिंदे यांचे विरोधक आहेत. मतदारांचे आभार मानण्यासाठी सध्या त्या गावांना भेटी देत आहेत. त्या भाजपवर टीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य नेत्यांवरही टीका करत आहेत. त्याला कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. एकमेकांवर टीका करण्याचा अधिकार राजकीय नेत्यांना असतो. मात्र ती वैयक्तिक अंगाने गेली की टीका करणाऱ्याचे हसू होते. त्याच्या सुसंस्कृतपणाबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात.

निवडणुकीचा निकाल लागून एक महिनाही झालेला नाही तोवर प्रणिती शिंदे यांचा तोल सुटला आहे. प्रणिती या काँग्रेस पक्षाच्या खासदार आहेत, यासह माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कन्या आहेत. याचे भानही त्यांनी ठेवणे गरजेचे आहे. गेल्या सलग दोन निवडणुकांमध्ये सोलापूरकरांनी भाजपला संधी दिली होती. भाजप खासदारांच्या निष्क्रियतेमुळे त्यांना निवडून दिल्याबद्दल सोलापूरकरांना पश्चाताप झाला होता. आपल्याही मतदारांवर तसाच पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये, याची काळजी प्रणिती यांनी घेतली पाहिजे. (Edited by : Sachin Waghmare )

SCROLL FOR NEXT