Raj Thackeray  Sakarnama
विश्लेषण

MNS Vardhapan Din 2024 : राज ठाकरे पवारांवर बरसले; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि भाजपला विसरले!

Sampat Devgire

Nashik MNS foundation day celebrations :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पक्षाचा अठरावा वर्धापन दिन नाशिकला साजरा केला. या वेळी पहिल्यांदाच त्यांनी उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि आपल्या विरोधकांचा उल्लेख टाळला. त्यांचा सर्व फोकस 'मनसे'चा कार्यकर्ता होता. या वेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबतच्या भूमिकेबाबत सस्पेन्स कायम ठेवला. राज ठाकरेंच्या भाषणात सद्यःस्थिती आणि विरोधकांचा खरपूस समाचार ठरलेला असतो किंबहुना त्यासाठीच त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या भाषणाकडे कान लावून बसलेले असतात. आजच्या वर्धापन दिनात राज ठाकरे यांनी सध्याचे फोडाफोडीच्या राजकारणावर कोरडे ओढले. या शिवाय त्यांनी शरद पवारांनाही लक्ष्य केले.

राज्यातील विविध पक्षांतील फाटाफूट आणि आजच्या राजकारणाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. अनेक राजकीय पक्ष निघाले मात्र खऱ्या अर्थाने पक्ष म्हणता येईल असे शिवसेना (Shivsena) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) हे दोनच पक्ष आहेत. यात कुणीही राजकारणातील नव्हता. या पक्षांतील कार्यकर्त्यांना राजकीय प्रतिष्ठा देण्याचे काम पक्षाने केले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडून येणाऱ्या लोकांची मोळी बांधली. ते लोक त्या पक्षात नसते तरीही निवडून आलेच असते. आजही शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे दोन्ही गट वेगळे असले तरी, आतून एकच आहेत, अशी टीका करून ठाकरे यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले.

मनसेला 18 वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत मनसेने अनेक आंदोलने केली. याचा उल्लेख करून ही आंदोलने यशस्वी झाली आहेत, पण विरोधक आणि माध्यमे मनसेला आरोपी करतात अर्धवट आंदोलने सोडल्याची टीका करतात. याबाबतचे आरोप राज ठाकरेंनी (Raj Thackeray) खोडून काढले. मोबाईलवर मराठी भाषा, दुकानांवर मराठी पाट्या, टोल नाके, मशिदींवरील भोंगे अशी अनेक आंदोलने यशस्वी झाली आहेत. त्याचे परिणाम लोकांना दिसून आले, पण राज्य सरकारच या विषयांवर ठोस भूमिका घेताना दिसले नाही, असा आरोप राज ठाकरेंनी केला. मशिदीवरील भोंग्यांचे आंदोलन केल्यावर मनसेच्या 17 हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याची त्यांनी आवर्जून आठवण करून दिली. आणि कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थापही दिली. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज ठाकरे यांनी भाषणात सर्व लक्ष कार्यकर्त्यांवर केंद्रित केले होते. कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, हा सल्ला देताना त्यांनी जनसंघ आणि भाजपचे (BJP) उदाहरण दिले. भाजपच्या कार्यपद्धतीचे थेटपणे कौतुक त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आजचे जे यश दिसत आहे, त्यामागे या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. 1952 पासून जनसंघ आणि 1980 पासून भाजप काम करत आहे. त्यातून आज मोदींचे यश दिसते. हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे. मनसेला 18 वर्षे झाली. कार्यकर्त्यांनी आजवर भरपूर साथ दिली. मात्र, तुम्ही पेशन्स ठेवा, मी तुम्हाला आमदार, नगरसेवक करेन, महाराष्ट्रात मनसेची सत्ता आणून दाखवेन, असा मोठा निर्धारही त्यांनी वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला. आजच्या राज ठाकरे यांच्या भाषणात हाच महत्त्वाचा संदेश म्हणता येईल. (Raj Thackeray have some patience)

मनसे लोकसभा निवडणूक (Loksabha Election) स्वतंत्र लढवेल की कुणा पक्षासोबत जाईल, आगामी काळात कोणते मुद्दे महत्त्वाचे असतील, याबाबत राज ठाकरे काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र, राज ठाकरेंनी भाषणात या विषयांना स्पर्श केला नाही. गुढीपाडव्याच्या भाषणात सविस्तर बोलेन, असे स्पष्ट केले. त्यामुळे लोकसभा निवडणूक तोंडावर असताना कार्यकर्त्यांनी कोणता झेंडा हाती घ्यावा आणि काय भूमिका घ्यावी, हे गुलदस्तातच आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT