Ranajgajitsinh Patil, Archana Patil, Suresh Birajdar, Tanaji Sawant Sarkarnama
विश्लेषण

Dharashiv Lok Sabha Constituency : 'मित्रां'ची नाराजी दूर करण्याचे राणा पाटलांसमोर चॅलेंज!

अय्यूब कादरी

Dharashiv, 5 April : उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून लढण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज नेते तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे.

तत्पूर्वी, त्यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान आमदार पाटील यांच्यासमोर आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार (Suresh Birajdar) इच्छुक होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी संपूर्ण उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात गाठीभेटी दिल्या आहेत.

उमेदवारी देताना मात्र त्यांचा विचार करण्यात आलेला नाही, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सहा महिन्यांपासून प्रा. बिराजदार यांना तयारी करायला लावून उमेदवारी देताना ऐनवेळी त्यांना डावलण्यात आले, असा या कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे.

तिकडे शिवसेनेला जागा न सुटल्यामुळे आणि पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेचे काही कार्यकर्ते नाराज आहेत. तशा पोस्ट समाज माध्यमांमधून व्हायरल होत आहेत.

उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत राणाजगजितसिंह पाटील (Ranajgajitsinh Patil) यांनी बाजी मारली आहे. मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला तरीही उमेदवारी त्यांच्या घरीच राहिली आहे. हे त्यांचे यश असले तरी मित्रपक्षांतील काहीजण त्यामुळे नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान आता आमदार पाटील कसे पेलतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

जागा सोडवून घेण्यासाठी शिवसेनेनेही जोर लावला होता. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांना त्यात यश आले नाही. काही ठिकाणी विद्यमान खासदार असतानाही शिंदे गटाला जागा मिळत नसल्याचे, जाहीर केलेले काही उमेदवार बदलल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे धाराशिव मतदारसंघ शिंदे गटाला मिळेल, याची आशा मावळली होती. माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनीही उमेदवारीसाठी जोर लावला होता, मात्र त्याचा उपयोग झाला नाही,

धाराशिव मतदारसंघात तसे पाहिले तर महायुती प्रबळ आहे. मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार महायुतीचे आहेत. तुळजापूर (आमदार राणाजगजितसिंह पाटील), भूम-परंडा (डॉ. तानाजी सावंत), उमरगा (ज्ञानराज चौगुले), औसा (अभिमन्यू भोसले), बार्शी (राजेंद्र राऊत) या विधानसभा मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. केवळ धाराशिव-कळंब मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे कैलास पाटील हे आमदार आहेत.

राणाजगजितसिंह पाटील यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती. मोदी लाटेतही त्यांना साडेचार लाखांपेक्षा अधिक मते मिळाली होती. मतदारसंघात भाजपची बूथ लेव्हलपर्यंत सक्षम यंत्रणा आहे, कार्यकर्त्यांची फळी आहे. असे असले तरी आता नाराज झालेल्या कार्यकर्त्यांकडे त्यांना दुर्लक्ष करता येणार नाही.

अर्चना पाटील यांची लढत त्यांचे दीर, शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी आहे. खासदार राजेनिंबाळकर यांची लोकप्रियता मोठी आहे. जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणारा खासदार अशी त्यांची प्रतिमा आहे.

त्यामुळे राणाजगजितसिंह पाटील या निवडणुकीत कोणताही धोका पत्करतील, असे वाटत नाही. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून त्यांना सोबत घेण्यासाठी ते कोणती पावले उचलतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT