Rahul Gandhi Sarkarnama
विश्लेषण

Rahul Gandhi Vs BJP : आषाढी वारीत राहुल गांधी...; भाजप नेत्यांची एवढी 'मळमळ' का ?

अय्यूब कादरी

Maharashtra Politics : वारकऱ्यांसाठी आषाढी वारीला खूप मोठे महत्व असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघतात. वारीत सर्व जाती-धर्मांचे लोक सहभागी होतात.

आषाढीला पांडुरंगाचे दर्शन व्हावे, अशी आस त्यांना असते. परदेशी नागरिक, अभ्यासक, विचारवंतांवरही या वारीने भुरळ पाडली आहे. आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेही आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. त्यावरूनही राजकारण सुरू झाले आहे.

वारीत गरीब-श्रीमंत सारे सारखेच असतात. वारीला महत्व आहेच, आकर्षण आहेच. एखादा नेता सहभागी झाला किंवा नाही झाला तरी वारीचे महत्व कायम राहते. काही राजकीय नेते मात्र नको तिथेही राजकारण करत असतात. राजकारण करताना मर्यादा पाळल्या जाण्याचा हा काळ नाही. आपल्याला काय फायदा होईल, याचाच विचार हल्ली राजकीय नेते करू लागले आहेत.

त्यातूनच राहुल गांधी Rahul Gandhi यांच्या वारीत सहभागाला भाजपचे नेते रणजितसिंह निंबाळकर यांनी विरोध दर्शवला आहे. राहुल गांधी यांनी वारीत कॅट वॉक करू नये, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. शिंदे गटाचे नेते, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी राहुल गांधी यांच्या वारीत सहभागाचे स्वागत केले आहे, मात्र खोचक टिपण्णी करायला तेही विसरले नाहीत. राहुल गांधींनी मनोभावे वारीत सहभागी व्हावे, पांडुरंग वरून बघतोय, असे देसाई म्हणाले आहेत.

आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिरात मुख्य पूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना असतो. देशभरातील काही बडे नेतेही आषाढीवारीला न चुकता हजेरी लावतात. हा श्रद्धेचा विषय आहे. कुणी राजकारण करण्यासाठी किंवा राजकीय फायदा मिळवण्यासाठीच वारीत सहभाग होत असेल, असे लोकप्रिय विधान करता येणार नाही. विरोधकांना मात्र हीच भीती आहे.

गेल्या अनेक वर्षंपासून राहुल गांधी यांच्या विरोधात नियोजनबद्धरितीने प्रचार मोहीम राबवण्यात आला. त्यांना काहीही कळत नाही, असे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात विरोधकांना मोठे यशही आले, मात्र गेल्या काही वर्षांपासून परिस्थिती बदलली आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात केला जाणारा प्रचार बूमरँग होऊ लागला आहे.

राहुल गांधी यांनी 2022 मध्ये भारत जोडो यात्रा काढली. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पायी यात्रा करून त्यांनी देशाला, लोकांना, त्यांच्या समस्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला फायदाही झाला.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढली. हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप मुंबईत झाला. या दोन्ही यात्रांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला त्याचा फायदा झाला. राहुल गांधी यांची प्रतिमा बदलली, लोक, नेते त्यांना गांभीर्याने ऐकू लागले, हा या यात्रांचा सर्वात मोठा फायदा म्हणावा लागेल.

विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी संसदेच्या अधिवेशनात केलेले भाषण खूप गाजले. विरोधी पक्षनेत्याचे भाषण सुरू असताना पंतप्रधानांनी आपल्या आसनावरून उठून आक्षेप घेतला, हे बहुधा पहिल्यांदाच घडले असावे. पंतप्रधानच नव्हे, तर सत्ताधारी अन्य दिग्गज नेत्यांनीही आपल्या आसनांवरून उठून आम्हाला संरक्षित करा, अशी मागणी लोकसभेच्या अध्यक्षांकडे करताना दिसून आले.

याचा धुरळा अजून बसलेला नसताना राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे, शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय दिना पाटील होते.

शरद पवार Sharad Pawar यांनी राहुल गांधी यांना वारीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले, वारीचे महत्व समजावून सांगितले. राहुल गांधी यांनी त्याला मान्यता दिली आहे. येत्या 13 किंवा 14 तारखेला ते वारीत सहभागी होणार आहेत, वारकऱ्यांसोबत पायी चालणार आहेत. ते कुठून कुठपर्यंत, किती अंतर चालणार हे शरद पवार निश्चित करणार आहेत.

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक येत्या ऑक्टोबरमध्ये हेण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी झाले तर महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल, असा कयास विरोधकांनी बांधला असेल. त्यातूनच मग राजकारण सुरू झाले आहे.

राजकारणाने सर्व क्षेत्रांना व्यापून टाकले आहे. त्याचाच हा परिणाम आहे. लोक समजूतदार असतात. राजकारणाचा भाग म्हणून कुणी वारीत सहभागी होत असेल, तर लोक त्यांना थारा देणार नाहीत. कुणी मनोभावे वारीत सहभागी होत असेल आणि त्यावरूनही राजकारण केले जात असेल तर त्यांनाही लोक थारा देणार नाहीत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT