Sanjay Shinde-Narayan Patil-Rashmi Bagal Sarkarnama
विश्लेषण

Karmala Politics : करमाळ्यात आमदारकीच्या इच्छेला कोण मुरड घालणार?

Vijaykumar Dudhale

Solapur, 25 May : मागील विधानसभा निवडणुकीत (2019) करमाळ्यात एकमेकांसमोर उभे ठाकलेले आमदार संजय शिंदे आणि बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी होते. दोघांनीही निंबाळकरांसाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत आमदारकीच्या इच्छेला कोण मुरड घालणार की महायुतीत पुन्हा बंडखोरी होणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Loksabha Constituency) आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde), माजी आमदार जयवंतराव जगताप, रश्मी बागल (Rashmi Bagal) हे मातब्बर नेते निंबाळकर यांच्या बाजूने होते, तर माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) आणि स्थानिक नेत्यांनी मोहिते पाटलांची खिंड लढवली. मात्र, या निवडणुकीत अनेक समीकरण दिसून आली तर अनेक छुप्या गोष्टीही घडल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुळात करमाळ्यात निवडणुकीच्या तोंडावर रश्मी बागल यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला, तर माजी आमदार नारायण पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक गर्तेत अडकलेल्या मकाई साखर कारखान्याला नवसंजीवनी मिळावी, यासाठी रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या शीर्षस्थ नेत्याकडून कारखान्याला मदत करण्याचा शब्दही बागल कुटुंबीयांना मिळाला होता. मात्र, लोकसभेच्या मतदानाला अवघे काही दिवस उरले असतानाही त्याची पूर्तता होत नव्हती, त्यामुळे बागल गटात चलबिचल वाढली होती.

बागल कुटुंबीयांची नाराजी ओळखून मतदानाच्या चार दिवस अगोदर मकाई कारखान्याला आर्थिक मदत मिळाली. त्यानंतर बागल आणि शिंदे यांनी निंबाळकर यांच्यासाठी जोरदार प्रचारयंत्रणा राबवत त्यांना जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा केली. त्याचवेळी करमाळ्याच्या राजकारणात महत्वपूर्ण घटना घडली होती. मुंबईहून आलेल्या भाजपच्या नेत्याने महायुतीच्या स्थानिक दोन नेत्यासोबत एका हॉटेलमध्ये एक बैठक घेतली. त्यानंतर वेगानं सूत्रं हलली. ती गोष्ट प्रत्यक्षात आली तर रश्मी बागल या विधानसभेला शांत राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाविकास आघाडीकडून नारायण पाटील यांनी तालुक्यातील स्थानिक नेत्यांना सोबत घेत धैर्यशील मोहिते पाटील यांचा किल्ला लढवला. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता करमाळ्यातून महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, राजकीय परिस्थितीत पुन्हा उलथापालथ झाली तर ऐनवेळी दुसराही उमेदवार येऊ शकतो. त्यानंतरही पाटील यांची दावेदारी अधिक मजबूत असणार आहे. कारण, शरद पवार आणि जयंत पाटील यांनी त्यांना तसा शब्दही दिलेला आहे.

महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले संजय शिंदे हे विद्यमान अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारीवर संजय शिंदे यांचा हक्क पहिला असणार आहे. मात्र, रश्मी बागल यांनीही विधानसभा निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे रश्मी बागल महायुतीचा धर्म पाळून थांबणार की पुन्हा अपक्ष म्हणून मैदानात उतरणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असणार आहे. भाजप प्रवेशावेळी पक्षश्रेष्ठींकडून त्यांना विधानसभा उमेदवारीसंदर्भात कल्पना दिल्याची चर्चा आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे संजय शिंदे यांना उमेदवारी मिळाली, तर रश्मी बागल काय करणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT