Sharad Pawar-Hasan Mushrif - Samarjeet Shinh Ghatge  Sarkarnama
विश्लेषण

Samajeetsinh Ghatge News: समरजित घाटगेंनी का निवडला शरद पवार गटाचा मार्ग? मुश्रीफांचा पराभव करणे त्यांना शक्य आहे?

Rahul Gadkar

Kolhapur News : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते व सध्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे अपक्ष उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांच्या विरोधात 28 हजार 132 मतांनी निवडून आले होते. गेल्या दोन वर्षात राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत.

महायुती आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार हसन मुश्रीफ विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार समरजित घाटगे अशी लढत विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. जवळपास हे निश्चित झाले असून ही लढत केवळ घाटगे-मुश्रीफ नसून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार अशी होणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत हसन मुश्रीफ यांना पराभव करून आमदार होणार असा विडा उचललेल्या समरजीतसिंह घाटगे (SamarjeetSinh Ghatge) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 3 सप्टेंबर रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार असून आगामी विधानसभा निवडणूक ही अत्यंत टोकाची बनण्याची शक्यता आहे.

आतापासूनच घाटगे यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात रान उठवायला सुरुवात केली असून यंदाची निवडणूक दुरंगी असो वा तिरंगी त्यात समरजित घाटगे तुल्यबळ बनतील असाच अंदाज आत्तापर्यंत तरी आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना आतापर्यंत दुरंगी लढतीचा कमी फायदा आणि तिरंगी लढतीचा अधिक फायदा झाल्याचे दिसून येते. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ हे 2,881 मतांनी निवडून आले. तर 2004 च्या निवडणुकीत 1125 मतांनी निवडून आले. 2014 च्या निवडणुकीत 5934 मतांनी विजयी झाले.

तर 2009 ला तिरंगी लढत झाल्यानंतर ते तब्बल 46,412 व 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीत 28,132 मतांनी निवडून आले. 2019 आणि 2009 च्या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्याने त्याचा फायदा मुश्रीफ यांना झाल्याचे दिसून येते.

वास्तविक पाहता अलिकडच्या काळात समरजीत घाटगे आणि मुश्रीफ यांचा राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. एकमेकांना निवडणुकीत पाडण्याची भाषा दोन्ही उमेदवाराकडून होत आहे. अशातच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत घाटगे यांचा पराभव झाल्यानंतर भाजपमधून ते चांगलेच ऍक्टिव्ह झाले. मुश्रीफ यांच्या मागे ईडी लावण्यापासून ते आत्तापर्यंत मुश्रीफ यांच्या विरोधातच आहेत.

मात्र, मध्यंतरीच्या काळात राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट हा महायुतीत सहभागी झाला. त्याचवेळी घाटगे यांची कागल विधानसभा मतदारसंघात अडचण निर्माण झाली. दोन दिवस संपर्कक्षेत्राच्या बाहेर राहून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे संकेत देत त्यांनी नाराजी व्यक्त करून दाखवली. मात्र सध्या महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला जात असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे गोची झालेल्या समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय स्वीकारून ते मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा दिला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांच्या विरोधात घाटगे यांनी निवडणूक लढवली होती. पण त्याचा फायदा मुश्रीफ यांनाच झाला होता. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत घाटगे यांनी पाठिंबा दिल्यानंतर घाटगे यांचा गट मुश्रीफ यांच्या पाठीशी राहील अशी शक्यता कमीच आहे. कारण घाटगे यांच्या बाजूने शिवसेनेची मते होती. मात्र ती मते आता समरजीत घाटगे यांच्या पारड्यात पडणार हे नक्की आहे.

शिवाय संजय घाटगे यांच्यामुळे मुश्रीफ यांना मदत होते असा समज मतदार संघात आहे. हा समज पुसण्यासाठी संजय घाटगे यांनी निवडणुकीपूर्वीच मुश्रीफ यांना पाठिंबा दिला आहे. शिवाय संजय घाटगे यांच्या अन्नपूर्णा कारखान्याला मुश्रीफ सातत्याने मदत करत आहेत. त्याचे ऋण पाठिंबा देऊन फेडणे हे घाटगे यांना उचित वाटत आहे.

मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संजय घाटगे यांना मुश्रीफ यांच्या विरोधात 55000 मते पडली. ती मते आता घाटगे यांच्या पाठीशी राहतील असे नाही. कारण घाटगे यांच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून ही मते मिळवली होती. मात्र घाटगे मुश्रीफांच्या दारात गेल्याने घाटगे यांच्यावर अनेक कार्यकर्ते नाराज आहेत

कागलची जनता पहिल्यापासूनच पुरोगामी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मानणारी आहे. या विधानसभा मतदारसंघांमध्ये अल्पसंख्यांक आणि दलित मतदार अधिक आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केलेला संविधान बदलाचा प्रचाराची आग आज ही ग्रामीण भागात दुमसत आहे. त्यामुळे दलित समाजामध्ये महायुतीबद्दल प्रचंड नाराजी आहे.

अशातच मुश्रीफ यांच्या मागे असणारा अल्पसंख्याक समाज आणि दलित समाजाची मते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे वळवण्याचा डाव खुद्द शरद पवार यांचा आहे. शिवाय राजर्षी शाहू महाराज जनक घराण्यातील पुत्र म्हणून समरजीत घाटगे यांची ओळख असल्याने हे दोन समाज समरजीत घाटगे यांच्या बाजूने उभे राहतील असा अंदाज आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत समरजीत घाटगे यांचे राजकीय गुरू आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घाटगे यांना उमेदवारी देतील अशी आशा घाटगे यांच्या कार्यकर्त्यांना होती. मात्र त्यावेळी घाटगे अपक्ष लढले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळेल असा अंदाज कार्यकर्त्यांना होता. मात्र, सत्ता बदलामुळे महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला जात असल्याने पुन्हा एकदा घाटगे यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे. यावेळी कार्यकर्त्यांची नाराजी घाटगे यांना अंगावर घेण्यास परवडणार नाही.

मध्यंतरीच्या काळात राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादीचा समावेश झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या बद्दल मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे. शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर त्यांच्या जिव्हारी लागण्याने मुश्रीफ यांचा पराभव करण्यासाठी अनेक यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

त्याचा प्रत्येय लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. हाच प्रयोग कागल विधानसभा मतदारसंघात करून मुश्रीफ यांचा पराभव करण्यासाठी अनेक अदृश्य हात समोर आले आहेत. त्यामुळे कागलच्या राजकारणात रंगलेली ही राजकीय कुस्ती कोणाच्या पथ्यावर पडणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT