Pune news : काँग्रेसचे तीन वेळा आमदार राहिलेल्या संग्राम थोपटेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे. संग्राम थोपटेंनी परिस्थिती सुधारेल यासाठी खूप वाट बघितली. त्यानंतरही कॉँग्रेसकडून जिव्हारी लागण्यासारखी वागणूक त्यांना दिली. त्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसने घातलेली भर बघता त्यांनी घेतलेला निर्णय अजिबात कोड्यात टाकणारा नाही.
काँग्रेसने केलेले दुर्लक्ष आणि अपमान
पवारांच्या झंझावातापुढे पुणे जिल्ह्यात मोठमोठ्या नेत्यांनी लोटांगण घातल्यावरही थोपटेंनी काँग्रेस (Congress) टिकवली. त्यांचे वडील अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांचे कधीच जमले नाही. त्याचा परिणाम अर्थात संग्राम थोपटेंच्या कारकिर्दीवर झाला. पवारांच्या करिष्म्यापुढे राज्यात कायम लोटांगण घालणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी त्यांना कधीही मंत्री करण्याचे धाडस केले नाही. इतकेच नाही तर विधानसभेचे अध्यक्षपद देतो, असे सांगूनही ते पद त्यांना दिले नाही.
थोपटेंच्या आडवे आले वैर कायम
थोपटेंच्या राजकीय कारकिर्दीत हे वैर आडवे आले पण गरजेसाठी पवारांनाही त्यांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या आहेत. कारण सुप्रिया सुळेंचा बारामती लोकसभा मतदारसंघात थोपटेंची भोर मुळशी विधानसभा येते आणि म्हणूनच तिथल्या मताधिक्यासाठी अनेकदा थोपटेंना विनंती करावी लागली आहे. बहुतांश वेळा त्यांनी ती मदत केली आहे पण बदल्यात काहीही मिळालेले नाही. उलट पवार पुण्यातूनच अनेक वर्ष अजित पवार (Ajit Pawar), दिलीप वळसे आणि एखादे अशी 3-3 मंत्रिपद देत असल्याने भौगोलिक समतोल राखण्यासाठी थोपटेंना कायम थांबावे लागले. यावेळीही महाविकास आघाडीचा धर्म पाळत थोपटेंनी सुळेंना मदत केली आणि अजितदादांशी वैर ओढवून घेतले.
मांडेकरांना दिले जात होते बळ
थोपटेंनी लोकसभेत सुळेंचे काम केल्याने सुनेत्रा पवार तिथे पिछडीवर राहिल्या आणि अजितदादांनी थोपटेंना विधानसभेत घरी बसवून त्याचा बदला घेतला. मांडेकरांना तिथं आमदार करून त्यांनी एकप्रकारे थोपटेंची कारकीर्दच थांबवण्याचा प्रयत्न केला. आता मांडेकरांना वेळोवेळी देण्यात येणारे बळ हे थोपटेंना आणखी मागे सारणारे आहे.
भाजपला लोकसभेला फायदा
भाजपला थोपटेंचा कायम फायदाच होणार आहे. तिथे त्यांच्याकडे कोणीही तयार स्थानिक नेता नाही. बारामती लोकसभा जिंकायचे त्यांचे स्वप्न आणि ध्येय असल्याने थोपटे कामाचे ठरणार आहेत. शिवाय सध्याचे आमदार मांडेकर आणि पर्यायाने अजितदादा यांना चाप बसवण्याचा हा प्रयत्न असून त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.
थोपटे कुठल्या ट्रॅपमध्ये अडकले ?
थोपटेंकडे असलेला राजगड साखर कारखाना सध्या अडचणीत आहे. त्यांनी सरकारकडे कर्जही मागितले आहे. इतरही सहकारी संस्था अडचणीत आहेत. पण हवी तशी मदत होत नाही. तिकडे दादा जोर लावून त्यांच्या आमदाराला सेट करण्याचा मागे लागलेत, अशावेळी थोपटेंनी स्वतःचा भविष्याचा विचार करणं साहजिकच आहे आणि म्हणूनच त्यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय कोड्यात पाडणारा नाही. आता थोपटे तर जाणार आहेत पण याचा फटका काँग्रेसला बसणार आहे. पक्ष अडचणीत असताना अनुभवी आणि तरीही तरुण सहकारी बाहेर पडत असल्याने पक्षाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळेच काँग्रेसमध्ये अनेकांची कोंडी झाली आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.