Shashikant Shinde News: विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरी मागे टाकत आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात संघटनात्मक बदलाचे वारे वाहणार असल्याची संकेत खुद्द शरद पवारांनीच वारंवार दिले होते. याची सुरुवात आता थेट प्रदेशाध्यक्षपदापासून झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री आणि वरिष्ठ नेते जयंत पाटलांनी (Jayant Patil) प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार 'प्रदेशाध्यक्ष'पदाच्या 'खुर्ची'वर त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या, तितक्याच ताकदीच्या,अनुभवी आणि राजकारणाच्या मुशीत कसलेल्या शशिकांत शिंदेंना बसवणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. पण त्यांच्या राजीनाम्यानंतर या पदासाठी रोहित पवार, राजेश टोपे,अनिल देशमुख,जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेत्यांची नावं आघाडीवर होते. पण आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीनंही धक्कातंत्र वापरत शशिकांत शिंदे यांचं नावं पुढं आणलं आहे.
शशिकांत शिंदेंना 'प्रदेशाध्यक्ष'पदाच्या 'खुर्ची'त बसवण्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवारांनी साहजिकच पुढील काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थातंर्गत महापालिका,जिल्हा परिषदा,पंचायत समिती,नगर पंचायती निवडणुकांचा पूर्ण विचार केला असणार आहे. यावेळी पवारांनी निश्चितच शिंदेंच्या जमेच्या बाजूही तपासल्या असणार आहेत. टका
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या मोठ्या बंड आणि अनेक विश्वासू नेत्यांनी साथ सोडल्यानंतरही शशिकांत शिंदेंनी (Shashikant Shinde) शरद पवारांसाठी खंबीरपणे किल्ला लढवला.एक एक सहकारी पवारांना सोडून जात असताना शिंदेंनी सातारा जिल्ह्याचा गड अभेद्य ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
शशिकांत शिंदेंनी शरद पवारांची राष्ट्रवादी पक्ष अडचणीत असताना किंवा पक्षाच्या अडचणीच्या काळात फक्त साथच दिली नाही,तर पक्ष किंवा साहेब देतील ती जबाबदारी सक्षमपणे सांभाळली. याच स्वभावामुळे शरद पवारांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा शिंदेंकडे सोपवण्यासाठी हिरवा कंदील दिला असण्याची शक्यता आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मु्द्दा वादळी ठरण्याची शक्यता असताना शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत कायम सकारात्मक भूमिका घेतलेल्या शिंदेंना प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली आहे. पक्षाच्या पाठबळामुळे त्यांनी माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला.नवी मुंबई आणि मुंबई परिसरात शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांचे मोठं नेटवर्क उभे केले आहे. ही पण शिंदेंची जमेची बाजू ठरली असणार आहे.
शशिकांत शिंदेंनी राजकीय क्षेत्रात वाटचाल करतानाच सामाजिक चळवळीतलं लक्ष कमी होऊ दिलं नाही. त्यांनी महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचं सचिवपद, महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल मजदूर संघांचं अध्यक्षपद, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालकपद, राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार यूनियन अध्यक्षपद, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे कामगार संघाचं अध्यक्षपद यांसारख्या विविध जबाबदार्याही राजकारण करताना सांभाळल्या आहेत. ही त्यांची बाब पवारांनी हेरली असणार आहे.
शशिकांत शिंदेंनी जावळी विधानसभा मतदारसंघाचे दोन पंचवार्षिक व त्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे दोन पंचवार्षिक आमदार राहिले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. सध्या शशिकांत शिंदे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत.
शशिकांत शिंदेंनी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी जनता दरबार सुरू करून सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राजकारणातील महत्त्वाचा मोहरा व संघर्ष योद्धा म्हणून त्यांची ओळख आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून तत्कालीन आमदार शालिनीताई पाटील यांचा पराभव करत 'जायंट किलर'ही ठरले होते.
तसेच लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी अचानकपणे भाजपच्या उदयनराजेंविरोधात निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्यानंतर साहेबांचा आदेशाचं पालन करताना कुठलेही आढेवेढे न घेता तयारी सुरू केली.एव्हाना उदयनराजेंसारखा ताकदवान ज्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्यातील सत्ताधारी महायुतीनं पूर्ण ताकद पणाला लावली होती,त्यांच्याविरोधात टफ फाईट दिली.
ते लढलेच नाही,तर एकवेळी अशी आली होती की,उदयनराजेंचीही धडधड वाढली होती. शिंदेंना या निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी या चिन्हांमधील घोळाचाही मोठा फटका बसल्याची चर्चा होती. अवघ्या 32 हजार 771 मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
शरद पवार यांच्याशी जवळून संपर्क आल्यानंतर त्यांनी पक्षसंघटनेत काम करण्यास सुरवात केली. माथाडी कामगारांच्या प्रश्नांमुळे त्यांची पक्ष कार्यालयाकडे आणि नेत्यांकडे वर्दळ वाढली. त्यांच्यातील नेतृत्व गुणांची चुणूक शरद पवार यांनी पाहिल्यानंतर त्यांचा जीव या तरुण नेतृत्वावर जडला. पक्षाने टाकलेला विश्वास आणि सोपविलेली जबाबदारी त्यांनी नीटनेटकी पार पाडली.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केल्यावर त्यांनी कोणताही पुढचा मागचा विचार न करता पक्षात उडी घेतली आणि थेट साहेबांना मला कोणतीही जबाबदारी द्या, मी ती प्रामाणिकपणे पार पाडेन, अशी ग्वाही दिली. साहेबांनी पक्ष संघटना बळकट करण्याचे आणि वाढविण्याचे आदेश दिले आणि त्यांनी ते लीलया पार पाडून दाखविले.
जावळी आणि मुंबईत दहा वर्षांत केलेल्या चांगल्या कामगिरीच्या पाठबळामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर सातारा जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष हे खुले आव्हान म्हणून स्वीकारलेल्या आमदार शशिकांत शिंदे यांनी मग जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या संस्थांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली आणण्यास सुरवात केली. तत्कालीन पालकमंत्र्यांशी समन्वय ठेवत जिल्ह्यातील प्रत्येक गावात पक्षसंघटना वाढीस लावली.
सातारा जिल्ह्यातील अगदी गावपातळीवरील दूध सोसायटी,विकास सोसायटी,ग्रामपंचायतींवर पक्षाचा झेंडा फडकवला. जिल्ह्यामधील पंचायत समित्यांदेखील पक्षाच्या विचारांच्या कार्यकर्त्यांकडे सोपविल्या आणि जिल्हा परिषदेत पक्षाची सत्ता आणली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदेंच्या नावाची जोरदार चर्चा असून मंगळवारी होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणातील महत्त्वाचा मोहरा व संघर्ष योद्धा म्हणून ओळख असलेल्या शशिकांत शिंदेंच्या रुपानं एक अनुभवी, मुत्सद्दी, कार्यकर्त्यांशी थेट कनेक्ट,सामाजिक संघटनांचं नेतृत्व केलेल्या नेत्याला पवारांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.