shivajrao adhalrao Atul deshmukh dilip mohite  sarkarnama
विश्लेषण

Atul Deshmukh Resign Bjp : अतुल देशमुखांच्या राजीनाम्याचा फटका महायुतीलाच; विजयाची वाट बिकट

Uttam Kute

Shirur News : भाजपचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि खेड-आळंदी विधानसभेचे निवडणूक प्रमुख अतुल देशमुख यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत पक्षाला रविवारी (ता.८) रामराम ठोकला. त्यामुळे शिरुर लोकसभेचे (shirur loksabha) राजकीय समीकरण आता बदलले आहे. खेड तालुक्यातील भाजपचा आक्रमक चेहरा देशमुखांच्या राजीनाम्याने शिरुर लोकसभेतील महायुतीच्या उमेदवाराला काहीसा धक्का तर आघाडीला दिलासा मिळाला आहे.

बदलत्या राजकीय परिस्थितीत आपले हाडवैरी स्थानिक आमदार खेड-आळंदीचे अजित पवार राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते- पाटील यांच्या नेतृत्वात काम करावे लागणार असल्याने देशमुखांनी पक्ष सोडला. पण, त्याला कारणीभूत ठरली आढळराव यांची शिरुर लोकसभेची उमेदवारी.

कारण आघाडीचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुरचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांना पराभूत करण्यासाठी अजित पवारांनी ही जागा शिंदे शिवसेनेकडून नुसती घेतलीच नाही, तर तेथील उमेदवार सुद्धा त्यांनी त्या पक्षाचा घेतला. म्हणजे शिंदे शिवसेनेचे उपनेते आढळराव (shivajrao adhalrao pati) यांना राष्ट्रवादीत घेऊन पक्षाचे तिकिट दिले. तेथेच देशमुखांच्या पक्ष सोडण्याची बीजे रोवली गेली.

आक्रमक स्वभावाचे आमदर मोहिते (dilip mohite )आणि आढळराव गेल्या वीस वर्षाचे कट्टर राजकीय वैरी.पण,उमेदवारी मिळताच दोन पावले मागे येत आढळरावांनी मोहितेंशी मांडवली केली. त्यामुळे त्यांच्या प्रचारास मोहिते राजी झाले. खेड तालुक्यात तो त्यांच्याच नेतृत्वात होणार आहे. हे निमित्त त्यांचे हाडवैरी आणि त्यांच्यासारखाच स्वभाव असलेले देशमुख यांना मिळाले अन् त्यांनी राजीनाम्याचे हत्यार उपसले. त्यामागे पक्षाने केलेले दुर्लक्ष आणि विरोधकांना दिलेले बळ हे ही मोठे आणि मुख्य कारण आहे. त्याचे संकेत त्यांनी पक्षाच्या लोकसभा निवडणूक समन्वय बैठकीकडे पाठ फिरवून काही दिवसांपूर्वीच दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशमुखांच्या भाजप सोडण्याचे मोठे पडसाद खेड तालुक्याच्या राजकारणात उमटणार आहेत. कारण ते प्रतिनिधीत्व करीत असलेल्या तालुक्याच्या पश्चिम भागातील जिल्हा परिषद गटावरच नाही तर त्या भागासह तालुक्यावरही त्यांचे प्रभूत्व आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केलेले आहे.गतवेळची आमदारकीची निवडणूक अपक्ष लढवित त्यांनी ५५ हजार मते घेतली होती.त्यांना मानणारे तरुण कार्यकर्ते गावागावात आहेत. त्यांच्यासह त्यांनी भाजप सोडल्याने त्याचा पहिला फटका पक्षाला या लोकसभा निवडणुकीतच बसणार आहे.नंतर तो विधानसभा, जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणुकीतही दिसणार आहे. त्यातही विधानसभेला,जर मोहिते पुन्हा उभे राहिले तर त्यांची वाट आणखी बिकट असणार आहे.

देशमुखांनी तुतारी फुंकली तर अजितदादांची अडचण

देशमुख यांची मोहितेंशी जानी दुश्मनी असल्याने ते अजित पवार राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर आता दोन पर्याय आहेत ते म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेनेचा. मात्र ते राष्ट्रवादीतच जाण्याची शक्यता जास्त आहे. तसे झाले तर शिरुरमध्ये युती तथा शिवाजी आढळरावांचे टेन्शन या लोकसभेला वाढणार असून आघाडीच्या कोल्हेंना बळ मिळणार आहे. त्यातून कोल्हेंना पराभूत करण्याच्या अजितदादांच्या चॅलेंजच्या वाटेत अडथळाही निर्माण झाला आहे. दरम्यान, शिरुरमध्ये मंगलदास बांदल यांची उमेदवारी वंचित बहूजन आघाडीने रद्द केल्याने कोल्हेंना अगोदरच दिलासा मिळाला आहे. देशमुखांचे भाजप सोडणे हे त्यांच्या आणखी पथ्यावर पडले आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT