MLA Santosh Bangar Sarkarnama
विश्लेषण

MLA Santosh Bangar : आमदार बांगरांच्या चांगुलपणावर त्यांचे वादग्रस्त वागणे वरचढ

अय्यूब कादरी

Shiv Sena : ''शिवसेनेशी ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली, त्यांच्यावर पुन्हा कधीच गुलाल उधळला गेला नाही. माझी सर्व आमदारांना कळकळीची विनंती आहे, त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांकडे परत यावे, साहेब तुम्हाला शंभर टक्के माफ केल्याशिवाय राहणार नाहीत. शिवरायांचा भगवा, बाळासाहेबांनी जो भगवा आपल्या खांद्यावर दिला आहे, त्याला आबाद ठेवण्याचे काम आपण करावं, ही कळकळीची विनंती आहे. उद्धवजी ठाकरे साहेब तुम आगे बढो, हम तु्म्हारे साथ है...''

काही आठवतंय का? परभणीत (Parbhani) आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी काढलेल्या मिरवणुकीत जोरजोरात रडून आवाहन करणारे हे आहेत शिवसेनेचे (Shiv Sena) कळमनुरीचे (जि. हिंगोली) आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar). त्यांचे नाव सातत्याने कोणत्या ना कोणत्या वादात येत असते. सर्वात मोठी गंमत अशी की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी जोरजोरात रडत असे आवाहन करणारे हे आमदार बांगर त्यानंतर काही दिवसांनंतरच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गोटात सामील झाले होते. सतत वादात अडकत असले तरी त्यांच्या प्रेमळ स्वभावाचेही दर्शन अधूनमधून घडत असते. त्यांच्या मतदारसंघातीवल एका गावातील विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी त्यांचे वाहन थांबवून कबड्डी खेळासाठीच्या किटची मागणी केली होती. आमदार बांगर यांनी ती मागणी तत्परतेने पूर्ण केली होती. मुलांना खेळांसाठीच्या सुविधांबाबत सरकार, क्रीडा विभाग किती उदासीन आहे, हे त्या प्रकरणावरून अधोरेखित झाले होते.  

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही त्यांच्या प्रेमळ स्वभावाची प्रचिती आली. अधिवेशनामुळे बंदोबस्तासाठी राज्यभरातील पोलिस, अधिकारी नागपुरात दाखल झाले आहेत. विविध संघटनांचे मोर्चे, आंदोलनांमुळे पोलिसांना दिवसभर बंदोबस्तासाठी थांबावे लागते. अधिवेशनात एकेदिव शी पोलिसांना जेवण मिळाले नव्हते, आमदार बांगर यांनी स्वखर्चाने पोलिसांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी पोलिसांना जेवण वाढलेही होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आमदार बांगर यांचे कौतुकही झाले. असे असले तरी त्यांचे वादग्रस्त वागणे त्यांच्या चांगुलपणावर वरचढ ठरत आहे. एखाद्या आमदाराने अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली किंवा हात उगारला तर ते संतोष बांगरच असणार, असे लोकांच्या पटकन लक्षात येते. आमदार बांगर आणि वाद यांचे नाते इतके घट्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार बांगर हे मुंबईतून मतदारसंघात परतले होते. परभणी येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार, असे त्यांनी जाहीर केले होते. डबडबलेल्या डोळ्यांनी अन्य आमदारांना उद्धव ठाकरे यांच्याकडे परत येण्याची साद त्यांनी घातली होती. पुढे काय झाले? तर ते स्वतःचा शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. समाज माध्यमांवर त्यांची खिल्ली उडवण्यात आली होती. या फुटीर आमदारांविषयी 50 खोके एकदम ओके ही घोषणा रूढ झाली. बांगर यांनाही असा अनुभव आला. एका कार्यक्रमात त्यांच्यासमोर ती घोषणा देण्यात आली. त्यामुळे त्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला होता.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बांगर यांनी नगरसेवक ते आमदार असा राजकीय प्रवास केला आहे. शाखाप्रमुख म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 2009 मध्ये ते जिल्हाप्रमुख झाले. 2019 मध्ये त्यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आमदार बांगर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. शिंदे आणि 40 आमदार गुवाहाटीवरून परत आल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक झाली, त्यावेळीही ते ठाकरे यांच्यासोबत होते. विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी मात्र ते शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदावरून त्यांची हकालपट्टी केली होती. अधिकाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ, समाज माध्यमांत धमक्या अशा प्रकारांमुळे सतत चर्चेत असतात.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT