Eaknath Shinde, Devendra Fadnvis, Ajit Pawar  Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics : शिवसेना, राष्ट्रवादीत 'गौप्यस्फोटां'ची चढाओढ, तर तिकडे भाजपची लोकसभेची जय्यत तयारी

अय्यूब कादरी

Pune News : भाजप हा कायम इलेक्शन मोडवर राहणारा पक्ष आहे. निवडणूक जिंकण्यासाठीची एकही संधी हा पक्ष सोडू इच्छित नाही. तशा प्रकारची शिस्त भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही भिनलेली आहे. लोकसभेची निवडणूक २०२४ मध्ये होणार आहे. मात्र त्याची तयारी या पक्षाने खूप आधीच सुरू केली आहे.

इकडे भाजप( BJP) ची अशी तयारी सुरी असताना काँग्रेस निष्क्रय दिसत असून,शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट आरोप-प्रत्यारोप आणि दररोज काहीतरी वेगळे बोलून त्याला गौप्यस्फोटाचे नाव देत स्वतःचे हसे करून घेत आहेत.दुसरीकडे भाजप मात्र वर्षभरापूर्वीच निवडणुकीच्या तयारीला लागला असून, गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच लोकसभा मतदारसंघ प्रभारींची नेमणूक करून त्यांच्यावर संघटना बांधणीचा जबाबदारी टाकली होती.

विरोधी पक्षांमध्ये, विशेषतः काँग्रेसमध्ये नेमके याच्या उलटे चित्र आहे. निवडणूक तोंडावर आली तरी या पक्षात शांतता आहे. गटबाजी आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) पक्ष काही प्रमाणात कामाला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन्ही गट फुटीनंतरच्या न्यायालयीन लढाईत अडकले आहेत. शिवसेना फुटीच्या प्रकरणावरही विधानसभा अध्यक्षांसमोर सध्या सुनावणी सुरू आहे.

शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मोकळे आहेत फक्त भाजप आणि काँग्रेस. भाजपचे नेते कामाला लागले आहेत. काँग्रेस कधी कामाला लागणार, हे सांगता येत नाही. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी केलेल्या वातावरण निर्मितीचा फायदा काही राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेसला होताना दिसत आहे. महाराष्ट्रातही फायदा होणार की काँग्रेसचे नेते अंतर्गत गटबाजी, निष्क्रियतेमुळे ही संधी घालवणार, अशी शंका आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रातील १७ लोकसभा मतदारसंघांत संघटना बांधणीसाठी भाजपने गेल्या वर्षीच दिग्गज नेत्यांवर जबाबदारी सोपवली होती. लोकसभा प्रवास योजना असे त्याला नाव देण्यात आले होते. त्याअंतर्गत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यावर विदर्भातील सात जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नितीन गडकरी यांची प्रतिमा स्वच्छ आहे. शिवाय परफॉर्मिंग मिनिस्टर अशीही त्यांची ओळख आहे.

विदर्भात काँग्रेसचीही शक्ती आहे. त्यावर मात करण्यासाठी भाजपने गडकरी यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. राज्यात लोकसभेचे ४८ मतदारसंघ आहेत. त्यापैकी ४५ जागा भाजपला जिंकायच्या आहेत. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने महाराष्ट्रात मिशन ४५ अभियान राबवत आहे. यासाठी भाजपला शिवसेनेचा (Shivsena ) शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाची साथ मिळणार आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट दररोज समारोसमोर येत आहेत. एकमेकांवर यथेच्छ टीका आणि आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काहीतरी वेगळे बोलून त्याला गौप्यस्फोटाचे नाव देत आहेत. त्यामुळे त्यांचे हसे होत आहे. राज्यात पावसाअभावी भीषण परिस्थिती आहे. उरलीसुरली पिके अवकाळीच्या तडाख्याने नष्ट झाली आहेत.

विविध समाजांच्या आरक्षण आंदोलनांमुळे पेच निर्माण झाला आहे. असे असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीचे फुटीर गट इरेला पेटून दुसऱ्या गटांचा समाचार घेत आहेत. फुटीरांचे आरोप आणि तथाकथित गौप्यस्फोटांमुळे त्यांचे हसे होत असून उद्धव ठाकरे, शरद पवार यांची सहानुभूती वाढत आहे. अडचणीत सापडलेले शेतकरी आणि जनतेला आता या गौप्यस्फोटांमध्ये आणि आरोप-प्रत्यारोपांशी काही देणेघणे राहिलेले नाही. सद्यपरिस्थितीत भाजप निवडणुकीच्या दृष्टीने योग्य मार्गावर असल्याचे दिसत असून अन्य पक्षांची मात्र फरफट सुरू आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT