Shivsena UBT News SARKARNAMA
विश्लेषण

Shivsena Political News : ठाकरेंच्या शिवसेनेत राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या नेत्यांची वानवा?

सरकारनामा ब्यूरो

Shivsena UBT News : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यात वातावरण ढवळून काढण्याची जी ताकद आहे, ती मात्र इतर नेत्यांमध्ये दिसत नाही. ज्या दिवशी उद्धव स्वत: मैदानात उतरतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने सामना रंगणार आहे. ते आजतरी लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. लोकांमध्ये सहानुभूती आहे. प्रत्यक्षात त्यांचे मावळे विजय खेचून आणण्यासाठी किती ताकद लावतात हे पाहावे लागेल.

मुंबई ही महाराष्ट्राची लाईफलाइन आहे, असे म्हणतात की जे मुंबईत घडते. त्याचे पडसाद राज्यात उमटतात. मुळात शिवसेना (Shivsena) ही मुंबई-ठाण्याची अशीच प्रारंभी ओळख होती. ती आता पुसली आहे. प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचा विस्तार झाला आहे. अगदी ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेचा अध्यक्ष होण्यापर्यंत शिवसेनेच्या कार्यकर्त्याने यश मिळविले.

शिवसेनेने आजपर्यंत ज्या युती किंवा आघाडी केल्या आहेत. त्या पाहता या पक्षाला कोणाचेच वावडे नसते असा इतिहास सांगतो. हा पक्ष कधी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करतो तर कधी मराठीचा मुद्दा घेतो. तर कधी सर्वसमावेशक भूमिका घेऊन मैदानात उतरतो. याचे अलिप्त साक्षीदार म्हणून मतदार आहेतच.

भाजपबरोबर कधी युती केली तर कधी मोडली. आज युती मोडली असली तरी यापूर्वीही ‘आम्हाला कमळाबाई सोडून गेली,’ असे खुद्द बाळासाहेब ठाकरेंनीच म्हटले होते. त्याला किनार होती ती आणीबाणीत शिवसेनेने इंदिरा गांधी यांना दिलेला पाठिंब्याची. तसं सांगायचं तर शिवसेना नेहमीच रंग बदलत आली आहे.

अधिक जागा हव्यात

2019 च्या लोकसभेपर्यंत हा पक्ष भाजपबरोबर होता. पुढे विधानसभा झाली. निकाल आले आणि पुढे काय झाले हे सर्वांना ज्ञात आहेच. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ती चक्क दोन्ही काँग्रेसबरोबर एकत्र लढली. आता विधानसभेलाही तशीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

राज्यात आघाडीचे सरकार येणार हे छातीठोकपणे उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते सांगत आहेत. युती किंवा आघाडीचा एक नियम ठरलेला असतो. ज्याचे आमदार अधिक त्या पक्षाचा मुख्यमंत्री. त्यासाठी आघाडीत स्वपक्षाचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जातो. शिवसेना तशी तयारी करीत आहे का? हे पाहावे लागेल.

विदर्भात फायदा होईल का?

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे, संजय राऊत हे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची व्यूहरचना आखणे सुरू असल्याचे दिसते. शिवसेनेचे अधिक लक्ष मुंबईवर आहे. पूर्वी ते ठाण्यावरही होते. परंतु ठाण्यात आता एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांची डाळ शिजून देत नाहीत हे दिसून येत आहे. त्यांना टक्कर देणारा एकही नेता आज तरी त्यांच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात नाही. केदार दिघे, माजी खासदार राजन विचारे तसेच इतर नेते आहेत पण त्यांचा म्हणावा तसा प्रभाव पडत नाही.

कोकणातही रामदास कदम, नारायण राणे, उदय सामंत, क्षीरसागर यांच्यासारखे नेते आहेत. एकेकाळी कोकण बालेकिल्ला होता. बहुसंख्य आमदार तेथून निवडून यायचे. आता तशी शंभर टक्के गॅरेंटी देता येत नाही. मुंबईनंतर मराठवाडा, विदर्भ, पालघर आदी जिल्ह्यात या पक्षाला मोठ्या अपेक्षा आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तर राष्ट्रवादीची ताकद आहे. विदर्भात काँग्रेसची ताकद आहे. ज्या ठिकाणी यापूर्वी शिवसेनेचे आमदार निवडून आले होते त्या जागांवर शिवसेना दावा करेल. त्यामध्येही अदलाबदल होऊ शकते.

शिवसेनेला काही करून साठ तरी जागा निवडून आणाव्या लागतील तरच काही तरी करिश्मा करून दाखविला असे म्हणावे लागेल. काही असले तरी शिंदेच्या आमदारांविरोधात कडवी झुंज द्यावी लागणार आहे. एकदा का निवडणूक जाहीर झाली की चित्र समोर येईल. आज तरी आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, सुषमा अंधारे इतकेच चेहरे प्रसिद्धीची झोतात दिसतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मोठ्या सभा किंवा दौरे झाले आहेत, असे दिसत नाही.

एकीकडे शिंदे सरकारला शिंगावर घेतानाच दुसरीकडे फडणवीस यांच्यावरही ते टीका करीत आहेत. फडणवीस यांची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न ते करताना दिसतात. कारण शिंदे यांच्या इतकाच राग त्यांना फडणवीस यांच्यावरही आहे.

आज शिवसेनेची जी वाताहत झाली आहे. त्याला केवळ फडणवीस हेच जबाबदार आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. राऊत सांगतात ते खरं ठरेल का? फडणवीस त्यांच्या मतदारसंघात अडचणीत येतील का? तर ते अशक्य वाटते. शेवटी मतदारही शहाणे असतात. त्यांनाही मतदारसंघाचे फायदे तोटे कळतात. आमदार कोण असावा हे त्यांना पक्के माहित असते. फडणवीस यांनी मतदारसंघ बांधलेला आहे. तो इतक्या लवकर तुटेल असे वाटत नाही.

राजकारणात विरोधक लागतातच. त्याशिवाय मजा नाही. विधानसभेत अभ्यासू लोकप्रतिनिधी असायला हवेत. मग ते कोणत्याही पक्षाचे असो. जे लोकांचा आवाज आहे त्यांचा पराभव होऊ नये असे कोणालाही वाटते. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर आर पाटील यांच्यासारखे नेते सभागृहात हवेत असे लोकांना वाटायचेच ना? असे नेते स्वपक्षाइतकेच इतर पक्षातही तितकेच प्रिय होते. राऊत यांना वाटत असावे आघाडीच्या बाजूने वारे असल्याने फडणवीस यांचा पराभव होऊ शकतो.

पण, काहीवेळा तसे होत नाही. मोदी लाटेतही ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आर.आर.पाटील, जयंत पाटील असो की अन्य नेते निवडून आलेच होते ना? राऊत हे उद्धव ठाकरेंची ढाल बनून मैदानात लढत आहेत, पण त्यांचा प्रत्येक दावा खरा होईलच, असे काही सांगता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT