Sudhir Mungantiwar Sarkarnama
विश्लेषण

Nashik Godavari : मंत्री मुनगंटीवारांचे म्हणजे ‘आग रामेश्वर अन बंब सोमेश्वरी’; नाशिकमध्ये नेमकं काय सुरुय ?

Arvind Jadhav

Nashik Political News : परंपरेनुसार शेकडो वर्षांपासून रामकुंड येथे दररोज गोदाआरती होते. भाविकही हजर असतात. मात्र, या धार्मिक कार्यक्रमाचा ‘इव्हेंट’ करण्याचा खटाटोप सध्या सुरू आहे. खरोखरच पुररेषेत दहा कोटी किंवा त्यापेक्षा अधिक पैसे खर्च करण्याची आवश्यकता आहे काय? नदी पात्रात तात्पुरते का होईना बांधकामे उभी राहतील. त्यातून हायकोर्टाच्या निर्णयाचा अनादर होणार नाही काय? यापूर्वी याच परिसरात झालेली शेकडो कोटी रूपयांची कामे, साहित्य वाहून गेले. या सर्व परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार दहा कोटी रूपयांचा निधी देण्यास एवढे अधिर कसे झालेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातो आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नाशिक दौऱ्यावर आले. त्यांनी रामकुंड येथे गोदापूजन केले. त्यापूर्वी राज्यपाल येऊन गेले होते. उद्धव ठाकरेंनी काळारामाचे दर्शन घेऊन गोदापूजन केले. आता लवकरच राहुल गांधी सुद्धा येतील. राजकारण्यांची ही चढाओढ लक्षात घेतल्यास निवडणुकीचा केंद्रबिंदू काय हे सहज लक्षात येते. यातूनच मग गोदाआरतीची परंपरा ‘इव्हेंट’मध्ये रूपांतरीत करण्याचा खटाटोप सुरू झाला. अर्थात गोदाआरती नव्याने सुरू होत नाही, पण, तिला हरीद्वारच्या धर्तीवर व्यापक बनवण्याची तयारी सुरू आहे.

नदीच्या उगमापासून फारच कमी अंतरावर रामकुंड असून, येथे नदीचे पात्र तुलनेत अरूंद आहे. अतिक्रमण, फेरीवाल्यांची रेलचेल अशी स्थिती आहे. आता गोदाआरती करण्यासाठी येथे नव्याने काही कामे करण्याची आवश्यकता असल्याचा खर्चीक शोध लावण्यात आला आहे. वनमंत्र्यांनी थेट सरकारी अधिकाऱ्यांची फौजच उभी केली. गोदाआरतीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कमिटीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, शहरातील तीन आमदार पदसिद्ध सदस्य आहेत.

याबरोबर महापालिका आयुक्त, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, बांधकाम खात्याचे अधिक्षक अभियंता, जलसंपदेचे कार्यकारी अभियंता, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी या अधिकाऱ्यासमवेत कार्यकारी अध्यक्ष म्हणून जयंत गायधनी, उपाध्यक्षपदी शांताराम भानोसे, नृसिंहकृपा दास, कार्यकारी सचिव मुकुंद खोचे, तर सदस्य म्हणून शैलेश देवी, डॉ. अंजली वेखंडे, चिराग पाटील, प्रतिक शुक्ल, प्रफुल्ल संचेती, राजेंद्र फड शिवाजी बोंदार्डे यांचा समावेश करण्यात आला. यात स्थानिक अथवा विरोधी पक्षातील नगरसेवकांकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले हे विशेष!

गोदाआरतीचा हा प्रशासकीय प्रवास अर्थकारणावर येऊन ठेपला असल्यानेच आता वाद-विवाद उफाळून येत आहेत. समिती सदस्यांमध्ये पुरोहित संघाच्या किमान पाच जणांचा समावेश करावा, अशी मागणी पुरोहित संघाकडून करण्यात येते आहे. गोदाआरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या अनिकेतशास्त्री महाराजांना स्थान मिळालेले नाही. दरम्यान, गोदाआरतीसाठी रामकुंडजवळच तात्पुरते स्वरूपात काही बांधकामे तयार करावी लागणार आहेत.

आरती करणाऱ्यांना ड्रेसकोड, रामकुंड ते दुतोंड्या मारूती याअंतरात मोठा झगमगाट करण्यात येणार आहे. एखाद्या इव्हेंटसाठी या जमेच्या बाजू आहेत. मात्र, रामकुंडात स्नान करणाऱ्या महिलांना वस्त्र बदलण्यासाठी जागा नाही, याची काळजी का घेतली जात नाही. रामकुंडात येणारे पाणी दुषीत असते. किमान येथील पाणी स्वच्छ कसे करता येईल, यासाठी निधीची आवश्यकता आहे. यासाठी काय करता येईला याचा विचार सुधीर मुनगुंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलेला नाही.

यापूर्वी भाजपाचे आमदार असताना बाळासाहेब यांनी जवळपास ३३ लाख रूपये गोदाआरतीसाठी खर्च केले होते. त्याचे काय झाले. हे सामान कुठे आहे, असे सवाल आता उपस्थित होत आहे. गोदावरीचा भावनिक व धार्मिक वापर करताना पैसांचाही पूर येतो. राज ठाकरे यांनी टाटा ग्रुपच्या मदतीने तयार केलेले गोदापार्क पुराच्या पाण्यात वाहून गेले. नदीपात्रातील प्रदुषण एक टक्काही कमी होत नाही. एवढचं काय तर तीर्थ म्हणून भाविकांना थेट नळाचे पाणी द्यावे लागते. लोकप्रतिनिधींचे, प्रशासनाचे यापेक्षा मोठे अपयश काय असू शकते?

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता लवकरच सिंहस्थ कुंभमेळ्याचे पडघम वाजण्यास सुरूवात होईल. त्यावेळी हजारो कोटी रूपये खर्चुन नाशिकच्या पायाभूत विकासात भर घालण्यात येईल. मात्र, गोदा घाटावर असा विकास करण्यास जागाच कुठे आहे? थोडीफार कामे केली की ती पुरात वाहून जातात. त्यामुळे सुधीर मुनगंट्टीवारांनी गोदाआरतीवर एवढा निधी, प्रशासनाची ताकद खर्च करण्यापेक्षा गोदा स्वच्छतेकडे लक्ष दिलेले कधीही बरे! भाजपसारख्या सर्वात मोठ्या हिंदुत्ववादी पक्षाने हिंदू पंरापरांचा इव्हेंट करण्यापेक्षा नदी स्वच्छ करून मूळावर घाव घालण्याची नवीन रीत निर्माण करावी, अशी भावना सध्या व्यक्त केली जाते आहे.

हा तर हायकोर्टाचा अवमान

गोदेचे स्वरूप अत्यंत अस्वच्छ झालेले आहे. यासाठी आम्ही हायकोर्टात लढा दिला. पुररेषेत कायमच काय पण तात्पुरतेही बांधकाम करू नये, असे स्पष्ट आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत. आता गोदाआरतीच्या निमित्ताने काही बांधकामे उभी राहीली तर हा हायकोर्टाचा अपमान ठरणार नाही काय, असा सवाल गोदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी उपस्थित केला.

राजकारणी व्यक्तींचे गोदाप्रेम नाटकी आहे. धर्माच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी आहे. अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहे. गोदाआरतीसाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यापेक्षा सरकारने अशा शेतकऱ्यांना मदत करावी, असा सल्ला जानी यांनी दिला. सिमेंट क्राँकीटीकरणामुळे नदीचे प्राकृतीक झरे बंद पडले. हे झरे सुरू झाल्याशिवाय नदीला स्वच्छ आणि नितळ पाणी मिळणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT