Uddhav Thackeray Vs Narayan Rane Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics : उध्दव ठाकरे अन् राणेंच्या फोनाफोनीवर शिक्कामोर्तब; ‘सबका साथ सबका विकास’ तो हाच...

Uddhav Thackeray Narayan Rane Talks Shiv Sena and BJP Relations : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्यचे नाव घेऊ नये, यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्याला फोन केला होता, असा दावा नारायण राणेंनी केला आहे.

Rajanand More

Maharashtra Politics : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा वादळ उठले. या याचिकेमध्ये सतिश सालियन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आमदारपुत्र आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आले. दिशावर सामुहिक बलात्कार करून हत्या झाल्याच दावा सालियन यांनी केला आहे. आदित्य यांच्यासोबत आणखी दोघांची नावे त्यांनी घेतली आहे. या याचिकेनंतर खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र मंत्री नितेश राणे आक्रमक झाले आहेत.

दिशा प्रकरणात आदित्यचे नाव घेऊ नये, यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्याला फोन केला होता, असा दावा नारायण राणेंनी केला आहे. राणेंचा हा दावा खासदार संजय राऊत यांनी खोडून काढला आहे. उद्धव ठाकरेंनी राणेंना फोन केला नाही, असे राऊतांनी स्पष्टपणे सांगितले. उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्याशी आपले बोलणे झाले आहे. त्यांनी असे कोणतेही संभाषण फोनवर झालेले नाही, असा दावा राऊतांनी केला आहे.

राऊत एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी राणेंच्या कुटुंबीयांकडूनच ठाकरेंना फोन आल्याचा मोठा दावा केला आहे. ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर नारायण राणेंना अटक झाली होती. त्यानंतर राणेंच्या कुटुंबातून ठाकरेंना फोन आला होता. त्यांची प्रकृती बरी नाही, सांभाळून घ्या, असे संभाषण झाले होते. त्यानंतर ठाकरेंनी पोलिसांना सूचना देत त्यांचा सुटका करायला लावल्याचा मोठा दावा करत राऊतांनी राणेंवर पलटवार करण्याचा प्रयत्न केला.

राणे असोत की राऊत, दोघांनीही केलेल्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे त्यांनाच ठाऊक. मात्र, हे नक्की की ठाकरे आणि राणेंमध्ये फोनाफोनी झाली होती. आता कुणाचा कुणाला फोन गेला, काय बोलणे झाले, या संभाषणामुळे पुढे काय घडलं... यावरून आरोप-प्रत्यारोप झडतच राहतील. पण नेतेमंडळी गरजेसाठी कट्टर राजकीय विरोधकांना हात जोडायला कधीही तयार असतात, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. यापूर्वीही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत, यापुढेही घडत राहतील. पण नळावरच्या भांडणासारखे या गोष्टी गावभर करणे, राजकीय संकेताला धरून नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा आहे, सबका साथ सबका विकास. हा नेत्यांनाही लागू होतोच की. राणे आणि ठाकरे हे कट्टर राजकीय शत्रू. एकमेकांशी बोलणे तर सोडाच पण समोर येणेही ते टाळतात. एकमेकांवर टीका करताना, आरोप करताना एकेरी भाषा, ठाकरी शैलीचा सर्रास वापर होतो. आव्हाने प्रतिआव्हाने दिली जातात. हे शत्रुत्व अधिक कसे वाढेल, याचाच प्रयत्न असतो. पण अशा स्थितीतही दोन्ही नेत्यांमध्ये गरजेसाठी फोनाफोनी होत असेल तर ‘सबका साथ सबका विकास’ या नाऱ्याला बळ मिळाल्याशिवाय राहत नाही.

मागील अडीच-तीन वर्षांत महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे बदलून गेले आहे. दोन मोठे पक्ष फुटले. अशक्यप्राय वाटणारी महाविकास आघाडी, महायुती अस्तित्वात आली. एकमेकांवर टीका करणारे नेते गळ्यात गळे घालू लागले. पण यामध्ये काही राजकीय संकेत पायदळी तुडवले गेले. आपआपसांत झालेल्या चर्चा, संवाद सार्वजनिक करू नयेत, हे संकेत पाळायला हवेत, असे अनेक नेते सांगतात. त्यानुसार ते वागतातही. कारण प्रत्येकाचे हात दगडाखाली आहेत. एकाने एक सांगितले तर दुसरे आणखी काहीतरी गौप्यस्फोट करण्यास तयारच असतात. त्यामुळे राजकारण अधिकच गढूळ होते. तसे ते बऱ्यापैकी झालेही आहे. पण तरीही खूप उशीर झालेला नाही. सगळ्यांच्या साथीने महाराष्ट्राचे राजकारणही अधिक प्रगल्भ व्हायचे असेल तर हे संकेत पाळावेच लागतील.  

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT