Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray News : हिंदुहृदयसम्राटांच्या स्वप्नाला उद्धव ठाकरे तडा घालवणार ? मशालीसाठी करावी लागणार कसरत

Rahul Gadkar

Kolhapaur News : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात कोल्हापुरातून करत असत. शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिली सभा ऐतिहासिक बिंदू चौकात पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणगले लोकसभा मतदारसंघावर आपले दोन्ही खासदार असावेत, अशी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांची इच्छा होती. हिंदुहृदयसम्राट हयात असताना हे स्वप्न पूर्ण झाले नाही. मात्र त्यांच्यानंतर कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर शिवसेनेने बाजी मारली. सध्या शिवसेनेत दोन गट आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना.

शिवसेनेच्या फुटीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर प्रहार सुरूच ठेवला आहे. बाप चोरला म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. असे वारंवार अधोरेखित केले आहे.

एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर भगवा फडकवण्याचं ध्येय महायुतीपुढे आहे. तर महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाकडे मिळवून या मतदारसंघावर शिवसेनेचा ठाकरे गटाचा गड कायम ठेवायचा आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसची मनधरणी करत ठाकरे गटापुढे आणि भाजपची समजूत काढत शिवसेनेच्या शिंदे गटापुढे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण करण्यासाठी मोठे आव्हान असणार आहे.

महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे जाण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठांसह स्थानिक नेत्यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला मिळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. दोन दिवसांच्या चर्चेत हा गड काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या जागेसाठी ठाम आहेत. वास्तविक पाहता पश्चिम महाराष्ट्रातून महाविकास आघाडीमधून ठाकरे गटासाठी दोन जागा मिळत असल्याची माहिती आहे. त्यातील हातकणंगलेची जागा स्वाभिमानीला सोडणार येणार आहे. तर कोल्हापूर मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा असला तरी काँग्रेस त्यासाठी आग्रही आहे.

पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर काँग्रेस ज्या मुद्द्याच्या आधारे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर दावा करत आहे. तो मुद्दा गृहीत धरला तर सध्याच्या घडीला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा आणि दोन विधान परिषदेचे आमदार आहेत. या जोरावरच काँग्रेसने दावा केला आहे. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सहा आमदार या जिल्ह्यात होते. तर 2019 लोकसभेला दोन खासदार होते. त्यामुळे घरोघरी धनुष्यबाण पोहोचलेला आहे. त्याचा फायदा शिवसेनेला शिंदे गटाला होणार असला तरी ठाकरे गट घराघरात कधी पोहचणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ठाकरे गटाकडे कोल्हापूरची जागा मिळवण्याशिवाय पर्याय नाही. जर ही जागा काँग्रेसकडे गेल्यास पश्चिम महाराष्ट्रतील ठाकरे गटाचा गड ढासळण्याची भीती ठाकरे गटाला आहे.

शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे मशाल आहे. सध्या ही जागा काँग्रेसला सोडल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला घरोघरी मशाल पोचवण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. जर ठाकरे गटाने आत्ताच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेऊन उमेदवार दिल्यास लोकसभेच्या निमित्ताने ठाकरे गटाची मशाल घराघरात पोहोचणार आहे.

त्याचा फायदा निश्चितच विधानसभा निवडणुकीत होईल.करवीर निवासिनी श्री अंबाबाई चे देवीचे दर्शन घेऊन हिंदुहृदयसम्राट लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडत होते. हीच गोष्ट आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरची जागा आपल्याकडे घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा शिवसेनेला सुवर्णयुग आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस शून्यावर गेलेली समजून आले नाही. आता हा मतदारसंघ जर काँग्रेसकडे गेल्यास पुन्हा काँग्रेसला या जिल्ह्यात बळ मिळू शकते. अशी भीती शिवसेनेच्या ठाकरे गटात देखील आहे. जर लोकसभेला ठाकरे गटाचा उमेदवार नसेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट मशाल चिन्ह घेऊन घराघरात पोहोचणार का? असाही प्रश्न ठाकरे गटामध्ये आहे.त्यामुळे ठाकरे गट कोल्हापूरच्या जागेसाठी ठाम आहे.

त्याचबरोबर कोल्हापूर महापालिकेची निवडणूक असो किंवा नुकतीच झालेली कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक असो या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि तत्कालीन वेळी महाविकास आघाडीत असलेले नेते हसन मुश्रीफ हे मातोश्री मॅनेज करत आपली उमेदवारी घालवली असल्याचा आरोप माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी केला होता. हा डाग पुसून काढण्यासाठी या ठाकरे गट ठाम राहणे गरजेचे आहे. लोकसभा मतदारसंघात ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा उमेदवार राहिल्यास मशाल या चिन्हावर ठाकरे गटाला पोषक वातावरण राहणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

तर महायुती आघाडीमध्ये ही हीच परिस्थिती आहे. कोल्हापूर आणि हातकलंगले लोकसभा मतदारसंघ हा शिंदे गटाकडेच राहील असे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरच कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार ठरणार हे निश्चित मानले जात आहे. छत्रपती घराण्यातील उमेदवार असल्यास या ठिकाणी भाजप उमेदवार बदलाच्या हालचाली करत असल्याची माहिती आहे. असा परिस्थितीत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे स्वप्न पुन्हा एकदा सत्यात उतरण्यासाठी काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited By : Sachin Waghmare )

SCROLL FOR NEXT