Sharad Pawar Sarkarnama
विश्लेषण

Pawar Demand To Government : शरद पवारांची शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडे मोठी मागणी; आता केंद्राकडे लक्ष...

Farmer Related News: जोपर्यंत या ४० टक्के निर्यात मूल्याचा निकाल होत नाही, तोपर्यंत कांदा उत्पादकांना न्याय मिळणार नाही.

सरकारनामा ब्यूरो

Purandhar Political News: सध्या राज्याच्या काही भागात दुष्काळी स्थिती आहे. आम्ही दुष्काळात चारा छावण्या सुरू केल्या, टॅंकरने पाणीपुरवठा केला. तसेच फळबागांना पाणी घालण्यासाठी अनुदान दिले. दुष्काळाच्या काळात आम्ही घेतलेले निर्णय हे सरकार का घेत नाही. हे सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. आम्ही शेतकऱ्यांचं ७६ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. तसा निर्णय आताच्या राज्यकर्त्यांनी घेतला पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. (Union government should waive farmers' loans : Sharad Pawar's demand)

पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट संचलित सवाई मंगल कार्यालयाचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात पवार बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी मंत्री शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप आणि पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

पवार म्हणाले की, देशातून कांदा निर्यात होतो. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने चाळीस टक्के निर्यातमूल्य लावले आहे. ते आजही कायम आहे. जोपर्यंत या ४० टक्के निर्यात मूल्याचा निकाल होत नाही, तोपर्यंत कांदा उत्पादकांना न्याय मिळणार नाही. कांदा उत्पादक हा जिरायती शेतकरी आहे. त्याच्या खर्चाचा विचार करून त्याच्या मालाला किमत देणं ही सरकारची जबादारी आहे. त्याची किमत मागणं हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. पण हे सरकार त्यासंबंधीचा निर्णय घेताना दिसत नाही.

कांद्याचा खर्च पाहता २४०० रुपये दर योग्य नाही. त्यात वाढ करणे गरजेचे आहे. पण सरकारने ४० टक्के निर्यातमूल्य रद्द केले पाहिजे. पण, तसा निर्णय आजचं सरकार घेताना दिसत नाही. सरकार आता साखर निर्यातीवरही बंधन आणू पाहत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत निर्यात शुल्क वाढविण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं. त्यामुळे उसालाही भाव मिळण्यात अडचण येऊ शकते. सध्याच्या सरकारकडून शेतकरी, कष्टकरी हिताच्या विरोधाची पाऊल टाकली जात आहेत, त्या सर्वच ठिकाणी आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे, असेही पवार यांनी नमूद केले.

पवार म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील वीर परिसरात पूर्वी आंब्याची झाडं फार होती. काही नातेवाईक या परिसरात होते, त्यांच्या भेटीच्या निमित्ताने आंबे खाण्यासाठी आम्ही या परिसरात यायचो. परिसरात झालेल्या वीर धरणामुळे बारामती, इंदापूर, पंढरपूर, फलटण या भागालाचा कायापालट झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT