Vasai Virar election 2025 Sarkarnama
विश्लेषण

Vasai Virar News: वसई-विरारमध्ये बदलाचे वारे! हितेंद्र ठाकुरांना 'चेकमेट' करण्यासाठी डाव

Hitendra Thakur vs Mahayuti: वसई-विरार शहर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रभागरचना तयार केली आहे. यात एकूण २९ प्रभाग असून, एकूण ११५ सदस्यसंख्येचा समावेश आहे. महापालिका स्थापनेनंतर बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता राहिली आहे.

सरकारनामा ब्यूरो

प्रसाद जोशी

वसई-विरार शहर महापालिका निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे आपलाच झेंडा पालिकेवर फडकणार, असा दावा प्रत्येक पक्षाकडून करण्यात आला असून राजकीय बदलाचे वारे वाहू लागले आहेत. कार्यकर्त्यांत नवी ऊर्जा निर्माण केली जात आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

वसई-विरार शहर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रभागरचना तयार केली आहे. यात एकूण २९ प्रभाग असून, एकूण ११५ सदस्यसंख्येचा समावेश आहे. महापालिका स्थापनेनंतर बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता राहिली आहे.

कोरोना काळापासून सार्वत्रिक निवडणुका रखडल्या. त्यामुळे येथे गेली पाच वर्षे प्रशासकीय राजवट आहे. महापालिका निवडणूक होणार असल्याचे जाहीर होताच नवी ऊर्जा प्रत्येक पक्षात निर्माण होऊ लागली आहे. प्रभागरचना तयार करण्यात आली आहे.

यात नवघर माणिकपूर प्रभागात पूर्वी ११ सदस्यसंख्या होती. मात्र, नव्या प्रभागरचनेत एक सदस्याने वाढ झाल्याचे बदल दिसून येत आहे. २९ प्रभागांत ४ तर एका प्रभागांत ३ सदस्यसंख्या असणार आहे. पूर्वी निवडून आलेल्या सदस्यांचे वॉर्ड बदलले गेले आहेत. त्यामुळे मतदार विखुरले असून नव्या मतदारांपर्यंत जाण्याचे आव्हान नव्या उमेदवारांसमोर असणार आहे

विधानसभेचे राजकीय चित्र पाहता, बहुजन विकास आघाडीच्या तीन उमेदवारांचा पराभव करून, नालासोपारा व वसईत भाजपचे उमेदवार निवडून आले तर बोईसर मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे विलास तरे यांचा विजय झाला.

बोईसर मतदारसंघातील अर्धा भाग हा वसई-विरार महापालिका क्षेत्रात येत असल्याने या भागातही महायुतीला फायदा मिळणार आहे. प्रशासकीय राजवट असली तरी वसई व नालासोपारा विधानसभा आमदारांनी विकासकामांकडे, तसेच पक्ष संघटनावाढीकडे लक्ष घालून जोमाने प्रयत्नांस सुरुवात केली आहे.

सर्व पक्षांनी कंबर कसली

नवे प्रकल्प ते नागरिकांच्या समस्या आदींचा पाठपुरावा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे अबाधित सत्ता राहिलेला बहुजन विकास आघाडी पक्षही कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा तयार करून, आगामी महापालिका निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी लोकांच्या दारी जात आहे. नवीन कामे अन् समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू लागला आहे. अशातच पक्षीय संघटनावाढीकडे प्रत्येक पक्षांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

पक्ष अदलाबदलीचे सत्र सुरू झाले आहे. भाजप-बहुजन विकास आघाडी, एकनाथ शिंदेंची शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची चुरस महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सुरू झाली आहे.

मनसेनेही पक्षवाढीकडे लक्ष दिले असून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रशासन दरबारी समस्यांचे गाऱ्हाणे मांडले जात आहे व कामे केली जात आहेत. त्यातच काँग्रेस पक्षही यंदाच्या निवडणुकीत ताकदीने उभे राहण्यासाठी सज्ज झाला आहे.

महाविकास आघाडी झाल्यास प्रभागरचनेत बदलाला चांगले वातावरण निर्माण होऊ शकते. दुसरीकडे पाहता महायुतीचे तीन आमदार महापालिका क्षेत्रात करत असलेली कामे, देण्यात आलेल्या आश्वासनामुळे जनतेच्या जवळ जात आहे व नाराज भाजप, शिंदेंच्या शिवसेनेकडे वळू लागले आहेत.

त्यामुळे सध्या तरी महायुतीचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. तर बहुजन विकास आघाडीनेही (बविआ) निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली असून, केलेल्या कामांचे अन् नव्या कामांचा पाठपुरावा घेणे , पक्षसंघटना मजबूत करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. परंतु भाजप राजकीय वर्चस्व निर्माण करत असल्याने बहुजन विकास आघाडीसमोर येणाऱ्या निवडणुकीत आव्हान ठरणार आहे.

हितेंद्र ठाकूर युती करणार?

‘बविआ’चे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली. त्यावेळी ते युती करणार अशी चर्चाही रंगली होती. मात्र, या चर्चेला ठाकुरांनी पूर्णविराम दिला होता. येत्या महापालिका निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडीसोबत युती करतील असे बोलले जाते. परंतु त्यांनी अद्याप भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. मात्र, ते स्वबळावर देखील निवडणूक लढवू शकतात, असे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.

एकीकडे महापालिका निवडणूक ही महायुतीची प्रतिष्ठेची झाली आहे. या ठिकाणी ‘बविआ’ला मात देण्यासाठी आतापासूनच जोरदार राजकीय डावपेच आखले जात आहेत. तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेनाही तयारी करून काळजीपूर्वक उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे महायुती घटक पक्षांना किती जागा सोडतील, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

बड्या नेत्यांच्या पक्षबदलाची चर्चा

भाजपमध्ये बहुजन विकास आघाडीचे तीन माजी नगरसेवक, पदाधिकारी अन् मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रवेश केला व वसई-विरार शहरात राजकीय हादरा दिला आहे. त्यातच मोठे नेते पक्षप्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे ते नेते कोण आहेत, कोणत्या पक्षातले आहेत? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकीची रणनीती कोणाच्या फायद्याची याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT